कोट्यवधीचा खर्च वाया जाण्याची शक्यता

विरार :  पालिकेने मोठा गाजावाजा करत कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील रस्ते स्वच्छतेसाठी दोन यांत्रिक सफाई वाहने खरेदी केली. सफाई करताना रस्त्यावरील धूळ उडू नये यासाठी पाण्याची फवारणी केली जाते. मात्र यात लागणारे पाणी मिळविण्यासाठी पालिकेच्या वाहनांला   वणवण करावी लागत आहे.  हे यंत्र व्यवस्थित हाताळले नाही तर ते खराब होऊन कोट्यवधी रुपये वाया जातील अशी शक्यता वर्तविण्यात येते.

वसई-विरार महानगर पालिकेला क्लीन एअर प्रोग्रामसाठी शासनाकडून ३२ कोटींचा निधी आला आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील स्वच्छता करण्यासाठी दोन अत्याधुनिक सफाईयंत्रे खरेदी केल्या आहेत. ही वाहने अत्याधुनिक स्वरूपाची असल्याने पालिका क्षेत्रातील रस्ते व पदपथालगत व दुभाजकाच्या लगत असलेला कचरा व धुळीचे योग्यप्रकारे संकलन केले जात आहे. ही वाहने उभी करण्यासाठी आणि वाहनात पाणी भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा पालिकेने उभारल्या नसल्याने  सध्या ही वाहने अग्निशमन विभागाच्या केंद्रावर उभी केली जातात. सकाळी त्या ठिकाणाहून पाणी भरूनच ही वाहने निघतात मात्र रस्त्याच्या मध्येच स्वच्छता करताना पाणी संपते.  नुकतेच वसई येथे एका ठिकाणी स्वच्छता करताना पाणी संपले होते. अशावेळी नवघर येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी जाऊन पाणी भरून घ्यावे लागले. वाहनांना लागणारे पाणी भरण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने या वाहनांना पाण्यासाठी  वणवण करावी लागत आहे.

पाणी भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही

साफसफाई करताना धुळीचे कण  हवेत पसरून वायू प्रदूषण होऊ नये म्हणून यावर स्प्रिकलर्सद्वारे पाणी फवारणी करण्यासाठी टाकी बसविण्यात आली आहे.  त्यासाठी जवळपास ५०० ते ६०० लिटर इतके पाणी  लागते. स्वच्छता करताना पाणी संपते अशावेळी पाणी भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने चालकाला वाहन घेऊन पाण्यासाठी  वणवण फिरावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

या यंत्रात केवळ २०० लिटर पाण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक नळ, महापालिका अग्निशमन दलाची कार्यालये, प्रभाग समिती कार्यालय याठिकाणी पाणी भरण्यासाठी सांगितले आहे. – वसंत मुकणे, सहायक आरोग्य अधिकारी वसई विरार महानगर पालिका