वसई पूर्वेतील गोखिवरे ते सातिवली परिसरातील समस्या जटिल
वसई : टाळेबंदीतून शिथिलता मिळाल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे, तर दुसरीकडे वसई पूर्वेतील गोखिवरे येथील मुख्य रस्त्याच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाहने उभी केली जात आहेत. यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
वसई पूर्वेकडील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर गोखिवरे, फादरवाडी नाका, रेंज ऑफिस, सातिवली, भोयदापाडा या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. अरुंद रस्ते, रस्त्यामध्ये उभी असलेली वाहने, बेकायदा वाहन थांबे यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे करोनाकाळात सर्व नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने इतर वाहनांची गर्दीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथील समस्या अधिकच जटिल बनू लागली आहे. त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. गोखिवरे येथील मुख्य रस्त्यावर सुरुवातीला केवळ एका लेन मध्ये बसेस व इतर वाहने उभी केली जात होती. आता दुसऱ्या लेनमध्ये सुद्धा वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी दररोज मोठय़ा संख्येने वाहने अडकून पडत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.
मागील महिनाभरापासून वसई पूर्वेतील भागात मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गोखिवरे नाका ते सातिवलीपर्यंत ही वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह आजूबाजूला रस्ते ओलांडून जाणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
बेकायदेशीर पद्धतीने वाहने उभी केली जात असतील तर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाईल. तसेच त्या ठिकाणच्या भागात जलवाहिन्यांचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याबाबत पालिकेशीही चर्चा केली आहे.
– शेखर डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई