वसई: करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रिक्षांमधून जनजागृती करण्याचा तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. प्रशासन करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे नागरिकांना याच गांभीर्य नसल्याने ते निष्काळजीपणे वागत असल्याने करोनाचा फैलाव वाढत असल्याचा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. त्यामुळे इतर उपाययोजनांबरोबर नागरिकांमध्ये करोनाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील सहा पोलीस ठाणे आणि पालिका मिळून एकूण ३० रिक्षांतून जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय करोना नियमांचे उल्लंघन करण्यासाठी ४८ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.