पाणी निचऱ्याचे नैसर्गिक मार्ग बंदिस्त झाल्याने अडचणी

वसई : वसई पूर्वेतील भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महार्गावर पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी विविध ठिकाणी नाले तयार करण्यात आले आहेत.परंतु हे नाले बेकायदा माती भराव व कचरा टाकून बुजविले जात असल्याने महामार्ग पाण्याखाली जाण्याचा धोका कायम राहिला आहे. नुकताच झालेल्या तौक्ते वादळ व   पावसात यामध्ये महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात पाणी साचल्याचा प्रकार दिसून आला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा गुजरातसह इतर विभागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. मागील काही वर्षापासून पावसाळ्यात महामार्गवर घोडबंदर पुलापासून ते विरार फाट्यापर्यंत विविध ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक मार्गावर नाले तयार करण्यात आले आहेत. मात्र या नाल्यात  व नाल्याशेजारी  माती भराव, इतर ठिकाणचा टाकाऊ कचरा आणून टाकला जात असल्याने नाल्याचीरुंदी कमी होऊन पाणी जाण्याचे मार्ग बंद होऊ झाले आहेत.यामुळे सातत्याने महामार्ग हा पाण्याखाली जाऊ लागला आहे. दरवर्षी तहसिल विभाग व महामार्ग प्राधिकरण यांच्या तर्फे महामार्गरील नाल्यांची स्वच्छता केली जाते. मात्र यावर्षी नालेसफाईच झाली नसल्याने अडचणी निर्माण होत आहे.

वसईत सुरुवातीच्याच पावसात महामार्गावरची पाणी निचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे महामार्गावरील पेल्हार ते वसई फाटा येथे जागोजागी भर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. यातून वाहने काढताना ही अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेषत: रात्रीच्या सुमारास येथून ये जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत काम पाहणाऱ्या आय आर बी च्या बांधकाम विभागाने पाणी वाहून जाणाऱ्या मार्गांची सफाई चांगल्या प्रकारे केली नाही . तसेच बांधण्यात येणारी गटारे हि अर्धवट ठेवल्याने स्नेह पेट्रोल पँपासमोरील गटारांच्या उघड्या सळ्या दिसून येत असून त्याठिकाणी कचरा ही साचून राहिला आहे. तर महामार्गाच्या कडेने अनेक कच्ची पक्की बांधकामे निचऱ्याला अडथळा ठरत आहेत. बिजगुणन केंद्राजवळील  जो नाला आहे त्याच्या कडेनेही अनेक बांधकामे उभी राहत असल्याने नाल्याचीरुंदी कमी होत असल्याने आजच्या घडीला तो ओसंडून वाहून महामार्गावरील सखल भागातून प्रवाहित होत आहे . तर दुसरीकडे मालजीपाडा येथील भागातही अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे.याचा फटका येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना  बसत आहे यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी वाहनधारकांकडून व चालकांकडून करण्यात येत आहे.