भाईंदर : उत्तनच्या येडू कंपाउंड परिसरात सहा वर्षीय मुलाचा पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उत्तन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किरण हर्षद कॉलर(६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. काशिमीरा येथे राहणारा किरण काही दिवसापूर्वीच आपल्या आईसोबत तो उत्तन येथील येडू कंपाउंड येथे आपल्या आजीकडे राहायला आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेलला किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे त्याची आई शोध घेत होती.यावेळी घराजवळील एका डबक्याच्या शेजारी त्याची चप्पल पडल्याचे दिसून आले.त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय झाल्याने कुटुंबीयांनी याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली.

हेही वाचा : बेकायदेशीर विक्री, तरुणींच्या जीवाला धोका; वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार

त्यानुसार अग्निशमन विभागाने डबक्यात शोध मोहीम राबवली असता त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.त्यानंतर याबाबतची माहिती उत्तन पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा :विरारमध्ये  २१ वर्षीय तरुण  तलावात बुडाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिन्याभरात दुसरी घटना

मिरा भाईंदर महापालिका हद्दीत पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून महिन्याभरात दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या समोर आले. यापूर्वी २२ जुन रोजी पेणकर पाडा भागातील नागरी वस्तीत असलेल्या खड्ड्यात बुडून श्रीयांश मोनू सोनी(५) या मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे.त्यामुळे शहरातील खड्ड्याच्या सुरक्षेबाबतचा गंभीर निर्माण झाला आहे.