तीन वर्षे शुश्रूषा करणाऱ्या अश्विनी खानविलकर यांचा अनुभव सुहास बिऱ्हाडे वसई : सदैव हसतमुख राहून समाधानी आयुष्य जगणाऱ्या लता मंगेशकर या जीवनाबाबत प्रचंड आशावादी होत्या. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मानसिक थकवा कधीच जाणवत नसे. उलट दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका पाहून त्या खळखळून हसत. करोनाने गाठेपर्यंत त्यांनी छायाचित्रणाची आवड जपली होती, अशा शब्दांत गेली तीन वर्षे त्यांची शुश्रूषा करणाऱ्या अश्विनी खानविलकर यांनी लतादीदींच्या अखेरच्या दिवसांतील आठवणी जागवल्या. भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती २०१९ मध्ये खालावल्यापासून खासगी परिचारिका असलेल्या अश्विनी खानविलकर या ‘प्रभुकुंज’मध्येच राहून पूर्ण वेळ लतादीदींची सेवा करत होत्या. मूळच्या विरार येथे राहाणाऱ्या अश्विनी यांनी त्या काळातील लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. ‘करोनाकाळात वृत्तवाहिन्यांवरील बातम्या भडक असल्याने त्यांनी त्या पाहाणे थांबवले होते. मात्र समाजमाध्यमांवर त्या सक्रिय असायच्या. मयूरेश पै यांच्यामार्फत त्या ट्विटरवर संदेश टाकायच्या. करोनामुळे भेटीगाठींवर मर्यादा आल्या होत्या. मात्र फोनवर त्या छान गप्पा मारत,’ असे अश्विनी यांनी सांगितले. ‘दीदींची स्मरणशक्ती अतिशय चांगली होती. बालपणीच्या आठवणींच्या गप्पांमध्ये त्या रंगून जात. जगण्याबद्दल सकारात्मकता पुरेपूर भरली असल्यामुळे त्या वयाची शंभरी नक्कीच पूर्ण करतील, असे आम्हाला वाटले होते,’ असे त्या म्हणाल्या. दीदी रात्री उशिरा झोपायच्या आणि त्यांची सकाळदेखील उशिरा व्हायची. त्यांची गाणी साऱ्या जगातील लोक ऐकत असले तरी त्या मात्र स्वत:ची गाणी ऐकत नसत. दिवसभर टीव्हीवर विनोदी आणि गुन्हेगारी तपासावरील मालिका त्या पाहायच्या आणि मनसोक्त हसायच्या. लतादीदींना छायाचित्रण आवडायचे. त्यामुळे टीव्ही चालू असताना त्यावरील दृश्ये टिपून त्या ती उत्तम संपादित करायच्या आणि संबंधित कलाकाराच्या व्हॉटसअॅपवर पाठवायच्या, अशी आठवणही खानविलकर यांनी सांगितली. चित्रफितीबाबत नाराजी लता मंगेशकर या आजारी असताना त्यांना रुग्णालयात नेतानाची एक चित्रफीत सध्या व्हायरल झाली आहे. त्याबद्दल अश्विनी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.