मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक वादळी वाऱ्यात महावितरणची वीज व्यवस्था कोलमडून पडते.महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान तर होतेच याशिवाय त्याचा फटका वीज ग्राहकांना ही बसतो. महावितरण अशा उद्भवणाऱ्या घटनांमधून कोणत्याच प्रकारचा बोध घेत नसून नियोजन प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने राबविले जात नाही.त्यामुळे महावितरणची वीज व्यवस्था स्मार्ट कधी होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वसई विरार शहराचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वीजेची मागणी ही अधिकच वाढत आहे. वसई विरार शहरासह वाडा या विभागात वसईच्या मंडळामार्फत वीज पुरवठा केला जात आहे. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी, नागरीसेवा, पथदिवे असे सुमारे साडे दहा लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत.

या सर्व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. मात्र सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात महावितरण अजूनही मागे आहे.जसा काळ बदलतो तसा बदल ही अपेक्षित असतो मात्र तसा बदल महावितरणच्या वितरण व्यवस्थेत तसा झालेला दिसून येत नाही. आजही शहरात अनेक ठिकाणी उघडी रोहित्र, लोंबकळत्या वीजतारा, उघड्या वीज पेट्या (डीपी बॉक्स ), वीज वाहिन्या भूमिगत नसणे, अतिभारीत रोहित्र अशा अनेक समस्या कायम आहेत.  त्याचा परिणाम विविध घडलेल्या घटनांमधून समोर आला आहे. सद्यस्थितीत सर्वच दैनंदिन कामे ऑनलाइन स्वरूपात झाल्याने आताच्या काळात वीज अधिकच महत्वाची बनली आहे. वीज नसेल तर अनेक कामे खोळंबून पडतात. याचा अनुभव अनेकदा सर्वसामान्य वीज ग्राहक तसेच औद्योगिक क्षेत्राला आहे.

मे २०२१ मध्ये वसई विरार शहराला तौक्ते वादळाचा फटका बसला होता.यात वादळामुळे विविध ठिकाणी विद्युक्त वाहक तारा , खांब , रोहित्र व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. यात उच्चदाब वाहिनीचे २१०, लघुदाब वाहिनीचे ६४२ विजेचे खांब पडले व वाकले. तर ३८ रोहित्र व ४७ मिनीपिलर नादुरुस्त झाले होते. उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या तुटून पडल्या होत्या. त्यानंतर विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची जास्त गरज असल्याचे अधोरेखित झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम क्षमन प्रकल्प याशिवाय  कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची आखणी केली गेली. या प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यात उच्च दाबाच्या ३०७ किलोमीटर आणि लघुदाबाच्या ७६६ किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या जाणार होत्या. मात्र तौक्ते वादळी वारे येऊन चार वर्षे उलटून गेली त्यानंतर अनेकदा वादळी वारे आले तरी देखील त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे.

महावितरणने बदलत्या काळाच्या ओघात वीज वितरण प्रणालीत सुधारणा आणायला हवी, मात्र वीज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा न केल्याने आजही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. वीज ग्राहकांना चांगली वीजसेवा मिळावी ही महावितरणचे प्राधान्य असायला हवे,  मात्र त्याउलट चित्र वसई विरारच्या भागात आहे. अगदी पाऊस सुरू होताच वसई विरार शहरातील वीज गायब होते असे सत्र वर्षानुवर्षे सुरूच आहे. नुकताच शहराला वादळी वारे अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वात आधी कोलमडून गेली ती महावितरणची वीज वितरण व्यवस्था.

वीज वाहक तारा तुटल्या, ४० ठिकाणी विजेचे खांब कोसळले, रोहित्रात बिघाड झाला. त्यामुळे बहुतांश भागातील लाखो वीज ग्राहकांना विजेविना रात्र काढावी लागली. यात ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, लहान मुलं यांचे प्रचंड हाल झाले. इंटरनेट सेवा ही ठप्प झाली होती. इतकी आपत्तीजनक स्थिती निर्माण होत असतानाही वीज व्यवस्था बळकट करण्यासाठी पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. एखाद्या आपत्तीजनक परिस्थितीनंतर पाहणी दौरे करून भूमिगत करण्याच्या मोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र सत्यात उतरविण्यास प्रयत्न होत नाहीत.

वीज व्यवस्था बळकटीकरण आवश्यक

वसईचा बहुतांश भाग किनार पट्टीचा आहे. अर्नाळा, राजोडी, कळंब, भुईगाव असा किनार पट्टीचा परीसर आहे. त्यामुळे वादळी वारे या सारखे प्रकार पावसाळ्यात घडतात.

यासाठी महावितरणने शहरातील वीज वितरण व्यवस्था भूमिगत करण्यासह अन्य आधुनिक यंत्रणा उभारून बळकट करणे गरजेचे बनले आहे. केवळ स्मार्ट वीज मीटर  लावून यंत्रणा स्मार्ट होणार नाही तर प्रत्यक्षात त्या दृष्टीने उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. आजही सर्वसामान्य वीज ग्राहक स्मार्ट मीटर पेक्षा आम्हाला सुरळीत वीज पुरवठा करा अशीच मागणी करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्योगाला ही फटका

सातत्याने तांत्रिक बिघाड अन्य विविध कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होतो. याचा सर्वाधिक फटका औद्योगिक क्षेत्राला बसतो. वसईत पंधरा हजारा पेक्षा अधिक लहान मोठे उद्योग कारखाने आहेत. यात चार ते पाच लाख इतके कामगार येथे काम करतात.खऱ्या अर्थाने येथील अर्थ चक्र उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु विजे अभावी येथील उद्योग ही आता अडचणीत सापडत आहेत. तीन ते चार तास कधी कधी त्याहून जास्त काळ वीज जाते अशा वेळी उद्योग चालविणे मोठे आव्हानात्मक झाले आहे. जर महावितरणचा भोंगळ कारभार असाच राहिला तर येथील अर्थ चक्र कोलमडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.