भाईंदर : राज्यातील शासकीय शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्याकरिता पहिली व दुसरी इयत्तेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केले. आदर्श शाळा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. करोनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या मानसिक समस्या दूर करण्याकरिता प्रत्येक शाळेत स्वतंत्र समिती गठित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात आदर्श शाळा योजना सुरू करण्यात आली आहे. यात राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये २१ व्या शतकात टिकून राहण्यासाठी कौशल्ये विकसित व्हावीत, पाठय़पुस्तकाच्या मर्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात, शिक्षणाप्रति समाज सक्रिय व्हावा, सरकारी शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढावा, पटसंख्या वाढावी हा हेतू आहे. यासाठी राज्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणाअंतर्गत आदर्श शाळांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात निवडलेल्या ४८८ शाळांसाठी ४९४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेच्या शुभारंभासाठी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळा क्रमांक ४ व ५ या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळेत आल्या होत्या. आदर्श शाळा योजनेअंतर्गत डोळे तपासणी, मासिक पाळी मार्गदर्शन आणि वैद्यकीय तपासणी आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister education mira bhayander municipal school students teachers parents study education ysh
First published on: 09-03-2022 at 02:50 IST