सुहास बिऱ्हाडे

वसई : वसई- विरार शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या ‘अमृत २ योजने’अंतर्गत ४९४ कोटींच्या २ भागांत ई-निविदा महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. शहराला अतिरिक्त आणि जास्त दाबाने पाणी वितरित करण्याचे पुढील ३० वर्षांचे नियोजन करून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई – विरार शहराला दररोज २३१ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्ष लिटर्स, उसगाव धरणातून २० आणि पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. लवकरच ‘एमएमआरडीए’तर्फे सूर्या पाणी प्रकल्पातून अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र सध्याच्या जलवाहिन्या या जुन्या झाल्या असल्याने सतत गळती होऊन त्या फुटत असतात. तसेच योग्य दाबाने पाणी नागरिकांना मिळत नाही. याशिवाय शहरात नवनवीन वसाहती तयार झाल्या असून तेथे नवीन जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. यासाठी सध्याच्या जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा व नवीन भागात जलवाहिन्या टाकण्यासह नऊ जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.