वसई: वसई-विरार महापालिकेचे लसीकरण कूर्मगतीने सुरू असताना त्यातील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. पालिकेच्या केंद्रावर साठा असला तरी ऑनलाइन नोंदणी कऱ्ण्यासाठी तेवढा साठा अॅपवर दाखविण्यात येत नसल्याचे उघड झाले आहे. हा एकप्रकारचा घोटाळा असून त्याची चौकशी करण्याची मागमी मुख्यमंत्र्यांकडे कऱ्ण्यात आली आहे.
लस नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. लस नसल्याने पालिकेने गेल्या काही दिवसांपासून केवळ लशींची दुसरी मात्रा देण्यास सुरवात केली आहे. परंतु साठा कमी येत असल्याने नागरिकाना तासनतास केंद्राबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. पालिकेला जेवढा लशींचा साठा येतो त्यातील ५० टक्के लशी या ऑनलाईन द्याव्या लागतात तर ५० टक्के लशी या थेट केंद्रावर देण्यात येतात. केंद्रावर रांगा लावूनही लस मिळत नसल्याने नागरिक ऑनलाईन लस मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. कोविन अॅपवरून ऑनलाइन लशींची नोंदणी करता येते. परंतु प्रत्यक्षात अॅपवर लशींचा साठा कमी दाखवला जात असल्याच्या तक्रारी आहेत. नालासोपारा येथील मनसेचे कार्यकर्ते मनिष सामंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मंगळवारी पालिकेकडे कोविशिल्ड लशींचा एकूण ४ हजार ५०० एवढा साठा आला होता. हा साठा १५ केंद्रावर वितरीत करण्यात आला. विरारच्या नारिंगी आरोग्य केंद्रावर ३०० लशींचा साठा आल्याचे पालिकेने प्रसिध्दीपत्रकात म्हटले होते. त्यातील ५० टक्के लशी ऑनलाइनसाठी राखीव होत्या. म्हणजे १५० लशी कोविन अॅपवर दाखवणे गरजेचे होते. पंरतु अॅपवर केवळ २४ लशी दाखविण्यात आल्याचे सामंत यांनी तक्रारीत म्हटले आहे. असाच प्रकार विरारच्या निदान लसीकरण केंद्रावर घडला होता. निदान केंद्रावर ४५० लशींचा साठा दाखविण्यात आला होता. पण प्रत्यक्षात अॅपवर १२ लशी दाखविण्यात आल्या होत्या. या लशी जातात कुठे त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ऑनलाईन लशी कमी दाखवल्या तर नोंदणी होणार नाही आणि मग त्या लशी वशिलेबाजीने वितरित केल्या जातात असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा वाळके यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना माध्यमांशी न बोलण्याची सक्त ताकीदही त्यांनी दिली आहे.
पालिकेचे लसीकरण केवळ १४ टक्के
दरम्यान पालिकेचे लसीकरण अतिशय संत गतीने सुरू आहे. बुधवार २८ जुलै पर्यंत केवळ १४.१ टक्के नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले होते. त्यात पहिली मात्रा २ लाख ३४ हजार ८२५ जणांना (१०.५ टक्के) जणांना आणि दुसरी मात्रा ८१ हजार ९२५ जणांना (३.७ टक्के) जणांना देण्यात आली आहे. लशींचा साठा नसल्याने पुढील काही दिवस केवळ लशींची दुसरी मात्राच देण्यात येणार असल्याचे पालिकेने बुधवारी सांगितले.