भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील मुर्धागाव ते उत्तन मार्गावरील रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने ते रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हे काम बंद झाल्यास मीरा भाईंदर महानगरपालिकेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मुर्धा गाव ते उत्तन मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मे. नवीन मेरिको या कंपनीला हे काम सोपवण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करणे, अतिक्रमण काढणे, मिठागरे, कांदळवन, वनविभाग आणि वृक्षतोड परवानगी घेणे इत्यादी कामाची जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेला देण्यात आली होती. मात्र बराच कालावधी उलटूनही पालिकेकडून परवानग्या घेण्यात दिरंगाई होत असल्याने तसेच स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने होणाऱ्या विरोधामुळे हे काम बंद करण्याची वेळ एमएमआरडीएवर येत होती. या कामातील अडथळे दूर करण्यासाठी एमएमआरडीएने मीरा भाईंदर पालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. तरीही तोडगा निघत नसल्याने अखेर हे कामच रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला, त्या स्वरूपाचे पत्रदेखील त्यांनी पालिकेला पाठवले आहे.
परंतु हे काम अर्धवट स्थितीत बंद केल्यास या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल, अशी भीती पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे. हे काम पालिकेमार्फत पूर्ण करण्याचे ठरवल्यास पालिकेकडे तितका निधी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता एमएमआरडीएने पूर्वीप्रमाणे काम सुरू करण्याची विनंती करणारे पत्र पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना पाठवले आहे.
हे काम रद्द झाले असले तरी ते पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच यात सकारात्मक प्रतिसाद येऊन काम लवकर पुर्ण होईल.
– दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका
एमएमआरडीएने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरसुद्धा येथील स्थानिक आमदारांनी त्यासाठी योग्य पाठपुरावा न केल्यामुळे हे काम बंद पडले आहे. या सगळय़ाचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
– हसमुख गेहलोत, उपमहापौर, मीरा-भाईंदर महानगरपालिका