वसई: वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक वॉक करण्यासाठी सायकल ट्रॅकवर येतात. मात्र नालेसफाईच्या दरम्यान निघालेला गाळ हा थेट सायकल ट्रॅकवर आल्याने वॉक करण्यासाठी व सायकल चालविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. त्यातच आता पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण सायकल ट्रॅक चिखलमय झाला आहे.

वसई पश्चिमेतील परिसरात सनसिटी परिसरातून गास गावाकडे जाणार रस्ता आहे. हा रस्ता अतिशय मोकळा व येथील वातावरण ही मोकळे आहे. या रस्त्यावर नागरिकांना विनाअडथळा सायकल चालविता यावी यासाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. यासाठी पालिकेने ७२ लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे.

सध्या शहरात प्रदूषणाचे वाढते प्रमाण  रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य सदृढ राहण्यासाठी पालिकेने हा प्रकल्प उभारला आहे.सनसिटी येथील सायकल ट्रॅक वर दररोज सकाळ- संध्याकाळ हजारोच्या संख्येने नागरिक धावणे, वॉक, सायकलिंग यासाठी येत असतात. मात्र या सायकल ट्रॅक ला लागूनच नाला गेला आहे. या नाल्याची पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचे काम सुरू आहे. त्यातून निघालेला गाळ हा कडेला टाकून देण्यात आला होता.

नुकताच पालिकेने तो गाळ उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र गाळ उचलताना योग्य ती काळजी न घेतल्याने त्यातील संपूर्ण चिखल हा सायकल ट्रॅकवर येऊन पडला आहे. त्यामुळे येथे वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. आता अधूनमधून पाऊस ही सुरू झाल्याने संपूर्ण सायकल ट्रॅकवर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तर तिथे गाळ असल्याने मुख्य रस्त्यावर जाऊन काही नागरिक चालतात त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता आहे असेही नागरिकांनी सांगितले आहे.

दुर्गंधीने नागरी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता

सायकल ट्रॅकवर एक मोकळा श्वास व व्यायाम होण्याच्या दृष्टीने नागरिक येत आहेत. मात्र संपूर्ण दुर्गंधी युक्त गाळ हा ट्रॅकवर पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे. पालिकेने नागरी आरोग्याचा विचार करता तातडीने ट्रॅकची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठेकेदाराचा निष्काळजीपणा

गाळ उचलून नेण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे. मात्र ठेकेदाराचा या कामात निष्काळजीपणा व वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आगरी कोळी सेनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश कडुलकर यांनी केला आहे. गाळ उचलताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. याआधी संपूर्ण गाळ हा झाडांच्या मुळावर टाकून देण्यात आला होता. याबाबत स्वच्छता निरीक्षक व प्रभागीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओला गाळ उचलताना रस्ते खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो सुकून गेल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. सनसिटीच्या रस्त्यावर गाळ पडल्याची तक्रार आली असून त्याठिकाणचा रस्त्यावर पडलेल्या गाळ काढून स्वच्छता केली जाईल. – नानासाहेब कामठे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन)