पहिल्या टप्प्यात ५०० कर्मचाऱ्यांना समाविष्ट करणार
भाईंदर : मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात सातत्याने भेडसावत असलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्याकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळातील सुरक्षारक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात ५०० कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात येणार असून या संदर्भातील प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. १ ऑक्टोबर २०२० रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली आहे. यात एकूण १५ पोलीस ठाण्याचा समाविष्ट करण्यात आला असून ४ पोलीस ठाण्यांची निर्मिती अद्यापही प्रस्तावित आहे. सध्या स्थितीत पोलीस आयुक्तालयात १ हजार ७३५ पोलीस कर्मचारी व ३५८ पोलीस अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या स्थापनेपासून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता विविध स्वरूपांच्या उपाययोजना आखण्यात येत आहेत.
मात्र या योजना आखत असताना मनुष्यबळाचा तुटवडा ही बाब सातत्याने समोर येत आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून राज्याची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्यामुळे नवे पोलीस कर्मचारी मिळणे आयुक्तालयाला कठीण होत आहे. या सर्व घटकांचा परिणाम आता पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामावर होऊ लागल्याने गुन्हेगारांवर आळा आणणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षारक्षकांना पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी घेतला आहे. याकरिता त्यांनी प्रस्तावदेखील तयार केला असून सुमारे ५०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. हे कर्मचारी पोलीस विभागात होमगार्डप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याकरिता मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम करण्यास वापरण्यात येणार आहेत, तर या संदर्भात तयार केलेला प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्याकरिता शासनाजवळ आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिली.