वसई: पावसाळा तोंडावर आला असल्याने तयार झालेले मीठ सुरक्षित ठेवण्यासाठी मीठ उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे. वसईच्या विविध ठिकाणच्या मिठागरात तयार झालेले मीठाच्या राशीवर गवत व त्यावर कापड टाकून बंदिस्त केले जात आहे.
वसई विरार च्या भागात मोठ्या प्रमाणात पारंपारिक मीठ व्यवसाय केला जात आहे. वसईतील जूचंद्र, नायगाव, उमेळे, उमेळमान, राजावली, नवघर पूर्व परिसर , पाणजू, यासह इतर ठिकाणी मीठ पिकविले जाते. यंदाही अवकाळी पावसाला तोंड देत विविध ठिकाणच्या मिठागरात मीठ उत्पादकांनी मशागत करून मीठ तयार करण्यात आले आहे.
फेब्रुवारी ते मे अखेर पर्यँतचा मीठ उचलण्यासाठीचा महत्वाचा हंगाम असतो यावेळी तयार झालेले मीठ व्यापाऱ्यांकडून खरेदी केले जाते.
मात्र मे महिन्याच्या सुरवातीलाच अवकाळी पावसाने फटका दिल्याने मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. याशिवाय मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कधीही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आता उरले सुरले मीठ सुरक्षित राहावे यासाठी मीठ उत्पादकांची धावपळ सुरू असून ते बंदिस्त करण्यास सुरूवात केली आहे.तयार केलेली मिठाची रास कोसळू नये व योग्य रित्या त्यावर चारही बाजुंनी सपाटीकरण करण्यात आले आहे. ते गवताचे आवरण देऊन नंतर कापड टाकून ते बंदिस्त केले जात आहे. असे मीठ उत्पादकांनी सांगितले आहे.
मीठ उत्पादन घट
खाड्यांचे झालेले दुषित पाणी यामुळे पाण्यातील खारट पणा हा कमी झाला आहे. तर दुसरीकडे कामगार कमतरता, उत्पादन खर्चात झालेली वाढ, बाजारमंदी , पूरस्थिती, वातावरण बदलाचा फटका अशा एक ना अनेक कारणांमुळे मीठ उत्पादन करण्याचे प्रमाण आता फारच कमी झाले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे उत्पादनात घट होत आहे.
अवकाळीमुळे तयार मिठाचे पाणी
विशेषतः मे महिन्यात अधिक उष्णतेची तीव्रता असल्याने काळात मिठाची डिग्री तयार होण्यास पोषक वातावरण असते.वाढत्या उन्हाच्या उष्णतेमुळे कोंड्या मध्ये मीठ ही चांगलेच तयार झाले होते. परंतु मध्येच अवकाळी पाऊस झाला त्यामुळे तयार मीठ बाहेर काढण्या आधीच त्याचे पाणी झाले असे मीठ व्यावसायिकांनी सांगितले आहे.