वसई : वेतन वेळेत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासूनच अचानक संप पुकारला आहे. या संपामुळे शहरातील परिवहन सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.

वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. तसेच ४० ई बस चा समावेश आहे. दररोज बसेस मधून ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात.

मात्र परिवहन सेवेत काम करणारे चालक व वाहक यांना ठेकेदाराकडून वेळेत वेतन आणि वेतन वाढ यासह इतर सुविधा मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानकपणे संप पुकारला आहे. त्यामुळे सकाळपासून पालिकेची परिवहन सेवा ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जो पर्यंत वेतन दिले जाणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

प्रवाशांचे हाल

मागील काही महिन्यापासून पालिकेच्या परिवहन बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. मात्र मंगळवारी सकाळपासून परिवहन सेवा ठप्प असल्याने कामावर निघालेले चाकरमानी यासह शाळकरी विद्यार्थी व अन्य प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले आहेत. तर काही ठिकाणी परिवहन बस नसल्याने ऑटोरिक्षाला रांगा लावून स्थानक व कामाचे ठिकाण गाठावे लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. जे काही प्रश्न असतील ते सामंजस्य पणे सोडवून त्यातून तोडगा काढावा व प्रवासी सेवा सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

आर्थिक घडी विस्कटल्याने अडचणी

मागील साडेचार वर्षांपासून आम्ही ही सेवा देत आहोत. जवळपास ४६५ इतके कर्मचारी आहेत. त्यांना नियमितपणे वेतन दिले जाते. मात्र यावेळेस महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक, महिला बालकल्याण व अन्य निधीची देयके अदा झाली नाहीत त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे वेतन देण्यास विलंब झाला असल्याचे बस व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. यातून तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.