वसई : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार २९ प्रभागात ११५ नगरसेवक असणार आहेत.या प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहे आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि शासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभागांची रचना कशा प्रकारे करण्यात यावी यासंदर्भात परिपत्रक काढले होते. वसई विरार महापालिका क वर्गामध्ये मोडत असल्याने येथील प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून केल्या जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेने आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत यापूर्वी २१ मे २०२२ रोजी काढली होती. व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर १ जून ते ६ जून २०२२ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर १३ मे २०२२ रोजी पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ आरक्षणाची अधिसूचना महापालिकेने प्रसिद्ध केली.त्यावेळी सदस्य संख्या ११ ने वाढवून १२६ करण्यात आली होती. मात्र तेव्हा निवडणुका झाल्या नव्हत्या.
आता नव्या निर्देशानुसार ४ सदस्यांची प्रभाग रचना केली आहे. यासाठी २०११ च्या लोकसंख्येचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार पालिकेने प्रभागरचना प्रारूप आराखडा तयार करून मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी प्रारूप आराखड्याला मान्यता मिळाल्याने प्रारूप प्रभाग रचना पालिकेने जाहीर केली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्याने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अशी आहे प्रभाग रचना
आता जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात साधारणपणे ४० ते ४५ हजार इतकी लोकसंख्या असणार आहे. यात २८ प्रभाग हे ४ सदस्यांचे तर एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असणार आहे. २९ प्रभागात ११५ नगरसेवकांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. या प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत नागरिकांना हरकती व सुचना नोंदविता येणार आहेत.
राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये उत्साह
वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २०२० च्या जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. मात्र करोनाच्या संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली. पाच वर्षांनंतर निवडणूका होणार असल्याने राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.