विरार : वसई विरार महानगर पालिकेने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे. पण या कामामुळे रस्त्यावरील वृक्षाचे आरोग्य धोक्यात आले आहे. डांबरी रस्ते करताना पालिकेच्या ठेकेदाराने डांबरी करताना झाडांचे बुंधेच डांबराने लेपून टाकल्याने झाडांच्या मुळांना पाणी मिळणार नसल्याने काही दिवसातच ही झाडे मरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसई विरार महानगर पालिका वृक्ष संवर्धनासाठी कोणत्याही ठोस उपाय योजना राबविताना दिसत नाही. करोना काळात पालिकेकडून वृक्षारोपण झाले नाही. शहरातील झाडे संवर्धन करण्याचे काम पालिकेचे असताना उलटपक्षी पालिकेकडूनच झाडांना इजा पोहाचावाल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतेच पालिकेने शहरातील झाडांना सुशोभित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सर्व झाडांना रंग मारण्याचे काम सुरु आहे. दरम्यान पालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीचे काम सुद्धा सुरु आहे. रस्ते दुरुस्ती करताना झाडाच्या बुंध्या जवळ एक मीटरचा भाग सोडून रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे झाडाला पाणी घालणे सोयीचे होते. तसेच जमिनीतील आद्रता कायम ठेवता येथे. पण पालिकेच्या ठेकेदाराने चक्क झाडांचे बुंधेच डांबरीकरणाने भरायला लावले आहेत. यामुळे झाडांना पाणी जरी घटले तरी ते पाणी जमिनीत मुरले जाणार नाही. सध्या कडक उन्हाचे दिवस असल्याने मानवाप्रमाणे झाडांना सुद्धा पाण्याची गरज आहे. पण पालिकेच्या ठेकेदाराने ही सोय ठवली नाही. यामुळे काही दिवसातच ही झाडे सुकून मरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरार पूर्व सेंट पीटर शाळेच्या जवळ असलेल्या सर्व वृक्षांच्या बाबतीत हा प्रकार झाला आहे. यामुळे येथील झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे. या अगोदर याच पद्धतीने काही प्रमाणात झाडे सुकून मेल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे पालिकेने तातडीने कारवाई करून या झाडांवरील डांबरमुक्त करावे अशी मागणी होत वृक्ष प्रेमी करत आहेत.
यासंदर्भात माहिती देताना वृक्ष प्राधिकरण विभागाच्या उपायुक्त नयना ससाणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने त्यांनी पाहणी करून कारवाई केली जाईल असे सांगितले.