|| प्राजक्ता म्हात्रे

आज स्वयंपाक करता करता अचानक मनात विचार आला तो स्वयंपाकघरातील भांडय़ांचा. आपल्या स्वयंपाकघरात भांडी एकमेकांच्या साथीने, गुण्यागोविंदाने चविष्ट आणि कलात्मक पदार्थ बनवण्यासाठी किती संगठित होऊन काम करत असतात. त्यातील काही ठरलेल्या जोडय़ा म्हणजे पोळपाट-लाटणं, तवा-कालथा, कढई-झारा, खल-बत्ता, चमचा-वाटी. थोडय़ा आधीच्या काळात गेलो तर कप-बशी, पाटा-वरवंटा, तांब्या-पेला, उखळ-मूस ही भांडी किंवा साधनेही कायम एकमेकांच्या साथीनेच काम करायची.

तसं पाहिलं तर प्रत्येक भांडय़ाला धडपड करावी लागते असं नाही, जसं की वाटी-चमचा. वाटीतील पदार्थाचा आस्वाद देण्यासाठी चमच्यालाच धावाधाव करावी लागते. पण वाटी तो पदार्थ सांडू न देता आपल्या उदरात त्या पदार्थाला मावून घेत स्थिर ठेवते. म्हणूनच चमचा खात्रीशीर पदार्थ उचलू शकतो.

पोळपाट स्वत: मजबूत आणि स्थिर राहून लाटण्याला आपले काम करून देत चपातीला भक्कम आधार देतो. त्यामुळे लाटणे पोळपाटाच्या आधारे चपातीला गोल गरगरीत बनवते. तवा-कालथ्याचेही तसेच. तवा गॅसवर स्वत: आगीवर तळपत चपातीला शेकवत असतो, तर कालथा ती चपाती योग्य प्रमाणात शेकून निघावी यासाठी संयमाने चपातीची किंवा भाकरीची उलथापालथ करतो. जर तवा तापला नाही तर चपाती किंवा भाकरी शेकणार नाही आणि जर कालथ्याने उलथापालथ केली नाही तर त्या चपातीचा किंवा भाकरीचा कोळसा होऊन जाईल. अथवा करणाऱ्या व्यक्तीला चटके सहन करावे लागतील. कढई झाऱ्याचेसुद्धा हेच नाते. उकळत्या तेलात कढई आणि झाऱ्याच्या भरवशावर पुरी कशी टम्म फुगते. तसेच इतर गोड तिखट अनेक तळण्याच्या पदार्थाचा चटपटीतपणा या कढई- झाऱ्याच्या सहवासात तयार होत असतो.

खल-बत्त्यात आपण काही ठेचतो तेव्हा खल स्थिर राहून बत्त्याचे वार सहन करतो आणि बत्त्यालाही प्रतिमार लागतोच की! पण त्यातूनच वेलचीचा सुगंध दरवळतो, लसूण खमंग फोडणीसाठी ठेचून तयार राहतो, आल्याचा, मिरीचा औषधी गुण कुटल्यामुळे द्विगुणित होतो. ठेच्याची लज्जतही या साधनांमुळे जिभेवर रेंगाळत राहते.

हे झाले जोडप्यांची संगत. पण चपाती/भाकरी, पुरी किंवा इतर तळणीचे पदार्थ पूर्णत्वास जाण्यासाठी चपातीच्या भांडय़ांचं कुटुंब किंवा तळणीच्या पदार्थाचं कुटुंबच राबत असतं. चपाती तयार होण्यासाठी स्वयंपाकघरात पिठाचा डबा, परात, तेलाची वाटी, मळण्याच्या पाण्याचं भांडं, गॅसची शेगडी, पोळपाट-लाटणं, तवा-कालथा आणि चपाती ठेवण्याचा डबा एवढय़ा भांडय़ांचं एक कुटुंब राबत असतं. अशा बऱ्याच पदार्थासाठी विशिष्ट भांडय़ांचं टीमवर्क स्वयंपाकघरात चालतं.

ही भांडी नक्कीच पदार्थ बनवत असताना एकमेकांशी संवाद करत असणार. रोज स्वयंपाक करत असणाऱ्या चाणाक्ष सुगरणीला त्या प्रत्येक भांडय़ाचा आवाजही माहीत असतो, जसे- तवा कालथ्यावर पडल्यावर होणारा आवाज, चमचा-वाटीचा संवाद, खल-बत्त्याची काथ्याकूट, भाकरी थापताना योग्य वळण घे सांगणाऱ्या परातीच्या आवाजातील संदेश, एखादं भांडं हातातून सटकून किंवा कोणत्याही कारणाने पडलं तर आवाजावरून कोणत्या भांडय़ाने थयथयाट केला आहे हे स्वयंपाकघरातील मालकिणीला अचूक समजतं. एकमेकांत अनेक जिन्नसांची चव एकरूप होऊन कशी रुची वाढते हे मिक्सरची घरघर सांगत असते. कुकरची शिट्टी पदार्थ झाल्याची सूचना घरभर पोहोचवते. या भांडय़ांमध्येही राग-लोभ, रुसवे-फुगवेही होत असतील अशी कल्पना करू या. तसेच भांडय़ाला भांडं लागणं हे या भांडय़ांवरूनच तर बोललं जातं.

भांडय़ांमध्ये पदार्थ आले की तेही भांडय़ांसोबत संवाद साधू लागतात. जसं की फोडणीचा चुर्र आवाज सांगत असतो आज पदार्थ नेहमीपेक्षा स्पेशल झाला पाहिजे. आमटी-रश्शाची रटरट घाई करा भुका लागल्यात सगळ्यांना सांगत असावी. दूध किंवा चहा उकळून येणारा फस्स् आवाज सांगतो- धावा गॅस बंद करा नाहीतर मी पडलोच.

प्रत्येक भांडय़ाचं कार्य पदार्थ बनविण्यासाठी महत्त्वाचं असलं तरी त्याच्या जोडीच्या भांडय़ाच्या कार्याशिवाय तो पदार्थ बनविण्याची क्रिया होऊ  शकत नाही. तसेच टीम वर्कनेच पदार्थात योग्य रूप, रुची, रंग, खमंगपणा येतो, हा सहजीवनाचा किती मोठा धडा मिळतो या स्वयंपाकघरातील भांडय़ांमधून.

prajaktaparag.uran@gmail.com