‘निवडणुका जाहीर झाल्या-झाल्या मित्र पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण होते, पण दोन-तीन दिवसात सारे सुरळीत होईल. तरीही लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णयस्वातंत्र्य आहे. किती समजूतदारपणा दाखवायचा हे त्या-त्या पक्षाने ठरवायचे आहे,’ असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जावडेकर रविवारी पुण्यात आले होते. जागावाटपाच्या मुद्दय़ावरून महायुतीतील मित्र पक्ष वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहेत का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.  
जावडेकर म्हणाले, ‘‘निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर वेगवेगळे पक्ष आपल्या भूमिका आपापल्या शैलीत मांडतात. परंतु लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्हाला जे अद्भुत जनसमर्थन मिळाले ते मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या महायुतीला मिळाले आहे. त्याची कदर सर्व पक्षांना आहे. तरीही लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपल्या निर्णयाचे स्वातंत्र्य आहे. किती समजूतदारपणा दाखवायचा हे त्या-त्या पक्षाने ठरवायचे आहे.’’