शिवसेनेला सत्तेत जाण्याची कोणतीही घाई नाही. आगामी काळात सत्तेच्या राजकारणाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाबाबतचा सावध पवित्रा रविवारी येथे व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयातील दाव्याचा निकाल लागेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हणजे बेळगाव हा भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. तर, स्थानिक टोलप्रश्नाचा उल्लेख करून ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेने पाहिलेले टोलमुक्त महाराष्ट्रचे स्वप्न नवे सरकार पूर्ण करेल व टोल मुक्त महाराष्ट्राची सुरुवात कोल्हापूरपासून होईल,असा विश्वास व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळण्यासाठी ठाकरे यांनी करवीरनिवासिनी महालक्ष्मीला साकडे घातले होते. साकडे फेडण्यासाठी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे हे उभयता रविवारी दुपारी करवीरनगरीत दाखल झाले. येथील विमानतळावर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.