शिक्षकाचा मुलगा

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला, १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनाच्या वेळी ते राजकारणात आले. त्यांनी ग्वाल्हेरच्या व्हिक्टाोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली होती.

१३ दिवसांचे पंतप्रधान

१६ मे १९९६ रोजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी त्यांना भाजपच्या वतीने सरकार बनवण्यास पाचारण केले त्या वेळी भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष होता. पण त्यांचे सरकार १३ दिवसच चालले. कारण कुणीच त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले नाही.

१३ महिन्यांचे पंतप्रधान

वाजपेयी यांचा १९ मार्च १९९८ रोजी दुसऱ्यांदा शपथविधी झाला. त्या वेळी तेरा महिन्यांनी त्यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठरावावर १७ एप्रिल १९९९ रोजी पराभव झाला. दोनदा विश्वासदर्शक ठरावात हरणारे वाजपेयी यांचे एकमेव सरकार होते.

कारगिलचे भूत

वाजपेयी यांनी ११ मे १९९८ रोजी पोखरण येथे दोन अणुचाचण्या केल्या. अमेरिकेने त्यावेळी व्यापार व इतर निर्बंध लागू केले. अणुचाचण्यांनंतर वाजपेयी यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर बस राजनयातून पाकिस्तानशी दोस्तीचा हात पुढे केला,मात्र त्यानंतर तीनच महिन्यांनी पाकिस्तानने मे १९९९ मध्ये कारगिल युद्ध छेडले.

मुशर्रफ व वाजपेयी शिखर बैठक

१९९९ मध्ये वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांचा तिसऱ्यांदा शपथविधी झाला. त्या वेळी त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना पाचारण केले. आग्रा येथे जुलै २००१ मध्ये वाजपेयी व मुशर्रफ यांच्यात शिखर बैठक झाली  पण त्यात काही मार्ग निघू शकला नाही.

मोदींशी कडवट संबंध

अटलबिहारी वाजपेयी व तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांचे संबंध फार चांगले नव्हते. २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगली झाल्या त्या वेळी मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी वाजपेयींची अपेक्षा होती व त्यांनी मोदींना राजधर्म पाळण्याचा इशाराही दिला होता. पण लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांना पाठिंबा दिल्याने त्या वेळी मोदी गुजरातमध्ये सत्तेत राहिले.

धर्मनिरपेक्ष नेते

अटलबिहारी वाजपेयी हे खरे धर्मनिरपेक्ष नेते होते. त्यांनी  अडवाणींनी १९९१ मध्ये काढलेल्या रथयात्रेपासून स्वत:ला दूर ठेवले. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ते अयोध्येत उपस्थित नव्हते. बाबरी मशीद पाडायला नको होती असे मत अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केले होते.