पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ ऑक्टोबर २०१४ रोजी जयप्रकाश नारायण यांच्या जयंती दिनाच्या मुहूर्तावर मोठा गाजावाजा करून पंतप्रधान आदर्श ग्राम योजनी सुरू केली. खासदारांनी विकासासाठी ही गावे दत्तक घेऊन त्यांचा कायापालट करावा अशी ही योजना. या महत्त्वाकांक्षी योजनेचे महाराष्ट्रात काय झाले, गावांचा किती विकास झाला, खासदारांनी त्या कामात किती योगदान दिले, याचाही आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. एकंदरीत, महाराष्ट्रातील गावांचे विकासाची केंद्रे होण्याचे स्वप्न अजूनही अपुरेच राहिलेले आहे, असेच दिसते..

कोकण : रत्नागिरीत कोटय़वधींचे कागदी घोडे

onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
Kumar Ketkar, Kumar Ketkar opinion,
भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, माजी खासदार कुमार केतकर यांचे परखड मत
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

आंबवडे (ता. मंडणगड) :

हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव. ते दत्तक घेतले भाजपचे खासदार अमर साबळे यांनी. गावाचा मंजूर आराखडा, कदाचित राज्यातील सर्वात मोठा, ३७३ कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी गेल्या फेब्रुवारीअखेर हास्यास्पद रकमेची, १९ लाख ४२ हजार रुपयांची प्रत्यक्ष कामे पार पडली. काही वर्षांपूर्वी गावाची पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळली. सतत पाठपुरावा करूनही अद्याप ती पडीक अवस्थेतच आहे. गावात फक्त पाच स्वच्छतागृहे आहेत.

गोळवली (संगमेश्वर) : माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे हे जन्मगाव. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतले. गावासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा आराखडा तयार. त्यापैकी जेमतेम पावणेदोन कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली. त्यातील बराचसा निधी गोळवलकर गुरुजी स्मारकासाठी इमारत, संरक्षक भिंत, रस्ता इत्यादीवर खर्च. उरलेल्या गावाला निधीचा फारसा लाभ नाही. गोयल यांनी गावातील शाळेसाठी दिलेली सौर ऊर्जा योजना बंद.

आसूद (दापोली) : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी दत्तक घेतलेले गाव. सुमारे २८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर. त्यापैकी अवघ्या सुमारे १९ लाख रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली असून ती मुख्यत्वे जिल्हा परिषद स्तरावरील.

रामपूर (चिपळूण) : काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी दत्तक घेतले. साडेदहा कोटी रुपयांच्या आराखडय़ापैकी केवळ सुमारे १८ लाख रुपयांची कामे सुरू. ही योजना म्हणजे निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहे, अशी खासदार दलवाई यांचीच टीका. शासनाने या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यायला हवा होता. त्याऐवजी सध्या उपलब्ध असलेल्या राज्य किंवा केंद्र सरकारच्या योजनांमधूनच या गावांसाठी प्राधान्याने निधी वापरण्याची सूचना आहे. तो फारसा मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत या गावामध्ये जायचे म्हणजे लाज वाटते, असे ते म्हणतात.  वाटूळ (राजापूर) : अजून आराखडाही तयार नाही.

उत्तर महाराष्ट्र : कामाचा वेग आणि रखडपट्टी

गोंदूर (जिल्हा धुळे) : दत्तक घेतले संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी. गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सव्वा कोटींच्या निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी. पण वीज जोडणीच नसल्याने प्रकल्प कार्यान्वित नाही. गाव विकास आराखडय़ात दोन कोटी ३६ लाखांची ५१ विविध कामे निश्चित. पैकी २८ कामे पूर्ण, तर २३ कामे रखडलेली.

अवनखेड (ता. दिंडोरी) : खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे दत्तक गाव. आदर्श ग्राम योजनेंतर्गत वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध, परंतु ग्रामस्थांची शिवार, वस्ती रस्त्यांची मागणी अपूर्ण. गावात जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी, आरोग्य उपकेंद्र, व्यायामशाळा आणि अंगणवाडीची उभारणी. तंबाखू, गुटखा विक्री बंद. विकास आराखडय़ातील ६० पैकी ३२ कामे पूर्ण झाल्याचे सरकारी अधिकारी सांगतात. उर्वरित १९ कामे रखडलेली.

हातेड (ता. चोपडा) : खासदार रक्षा खडसे यांनी दत्तक घेतलेले गाव. गावात शुद्ध पेयजल योजना सुरू. त्या अंतर्गत शुद्ध पाण्याचा २० लिटरचा जार केवळ सहा रुपयांत नागरिकांना पुरवला जातो. खासदार निधीतून आरोग्य केंद्रासाठी १० लाख रुपये, सुलभ शौचालयासाठी २० लाख, जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीसाठी २५ लाख तसेच गावातील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत गावात तीन हायमास्ट दिवे. चौकाचे सुशोभीकरण.

भोरस (ता. चाळीसगाव) : खा. ए. टी. पाटील यांचे हे दत्तक गाव. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, खडीकरण, क्रीडांगणाची निर्मिती, नाल्यास संरक्षण भिंत, स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण, गाय गोठा, बकरी गोठा शेड उभारणी, विहीर पुनर्भरण आदी कामे रखडलेली. लोकसहभागातून नाला खोलीकरण, नदीसफाई झालेली नाही. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प अद्याप झालेला नाही. गावात पायाभूत सुविधांचा खडखडाट. योजनेमुळे गावात दारूबंदी.

रायगडात निधीची कमतरता

चिंचोटी (अलिबाग) : दत्तक घेतले खा. किरीट सोमय्या यांनी. आजवर पशुवैद्यकीय तपासणी, आरोग्य तपासणी मेळावे, एवढीच ‘विकासकामे’ पार पडली. घरघरांत विद्युत एलईडी दिवे, पाणी शुद्धीकरण योजना असे किरकोळ उपक्रमही राबविले गेले.

दिवेआगर (श्रीवर्धन) : अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे दत्तक गाव. गावात सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक बसवणे, गावातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह, शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचे वाटप, महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप आदी उपक्रम. भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम पूर्ण. जलशुद्धीकरण प्रकल्प आणि बांबू प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे काम निधीची कमतरता आणि लोकसहभागाअभावी अपूर्ण.

बांधापाडा (उरण) : खासदार श्रीरंग बारणे यांचे दत्तक गाव. वेशीवर स्वागत कमान, तीन अंगणवाडय़ांचे नव्याने बांधकाम, शाळांना संगणक वाटप, स्वच्छतागृहांचे बांधकाम हे उपक्रम राबविले.

पश्चिम महाराष्ट्र : कामांचा अर्धा टप्पा पूर्ण

पेरीड (ता. शाहूवाडी) : खासदार राजू शेट्टी यांचे दत्तक गाव. एकूण कामे ६७. पूर्ण कामे ४७. निम्मा निधीही खर्च नाही. दुसऱ्या टप्प्यातील ११३ पैकी १९ कामे पूर्ण. ‘पंतप्रधानांची भंपक योजना’ या शब्दांत राजू शेट्टी यांचे कोरडे.

राजगोळी खुर्द, कसबा तारळे (ता. चंदगड) : खासदार धनंजय महाडिक. राजगोळीत ८३ पैकी ४२ कामे पूर्णत्वाकडे. कसबा तारळेत मंजूर आराखडय़ातील १४० पैकी ६० कामे पूर्ण.

सोनवडे (ता. शाहूवाडी) : राज्यसभा सदस्य संजय राऊ त यांचे दत्तक गाव. आराखडय़ातील ७९ पैकी ४४ कामे पूर्ण. तीन कोटी तीन लाखांपैकी एक कोटी ५६ लाख रुपये खर्च. खासदार निधीतून ९ कामे निवडली. एकाच कामासाठी १० लाख रुपये देऊ  केले आहेत.

येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) : दत्तक घेतले राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी. आराखडय़ातील १४१ पैकी ६७ कामे पूर्ण. खासदार निधीतून ठरलेली तिन्ही कामे अपूर्ण, पण ५४ लाखांची तरतूद.

विदर्भ : विकास दृष्टीक्षेपाबाहेरच..

सायखेडा, अकोला बाजार (वाशीम) : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची दत्तक गावे. सायखेडय़ात जलसंधारणाची कामे, रस्ते विकास आणि वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरही कामे पूर्ण. अकोला बाजारमध्ये काही फरकच नाही.

यावली शहीद, कळमखार (अमरावती) : खासदार आनंदराव अडसूळ यांची दत्तक गावे. राज्य शासनाच्या १५७ कोटी रुपयांच्या गुरुकुंज मोझरी विकास आराखडय़ातही यावली गावाचा समावेश आहे. येथील १६ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यात भुयारी गटार, दोन्ही शाळांचे डिजिटायझेशन, माती परीक्षण केंद्र, प्रार्थना सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, या कामांचा समावेश. गावात ३०० शौचालयांचे बांधकाम. कळमखार गावात घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत. मुख्य मार्गावर कचऱ्याचे ढीग. नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले.

करमोडा : शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दत्तक घेतलेले गाव. मुख्य रस्त्याची समस्या निकाली. अंतर्गत व इतर रस्त्यांची समस्या कायम. १२ लाख खर्च करून ग्रामपंचायत भवन उभारले. शाळा व व्यायामशाळेचे नूतनीकरण. केळी उत्पादकांना ३१ लाखांचे अनुदान. शेततळय़ांची निर्मिती. गाव हागणदारीमुक्त व गटारीमुक्त. महिलांना शिलाई मशीनचे वाटप. आरोग्याच्या सुविधा, मुबलक पाणी, रोजगारनिर्मितीचा अभाव.

रिधोरा (ता. काटोल) : शिवसेना खासदार कृपाल तुमाने. शौचालय बांधकाम योजनेतून सुमारे २० घरांनाच शौचालये. देशी दारू दुकान बंद. काही रस्त्याची कामे पूर्ण. तलावाचे सौंदर्यीकरण, गावातील मुख्य रस्ता सिमेंट करण्याचे काम आणि प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी केंद्र आणि वाचनालय स्थापन झाले नाही.

तिरोडा (वर्धा) : खासदार रामदास तडस. जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे गावात आनंद. मात्र केवळ जलशुद्धीकरण संयंत्राचे काम मार्गी. काही कामांचे टेंडरही निघाले नसल्याचे सांगण्यात येते.

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना, जनधन योजना यांसारख्या योजनांना स्थानिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार प्रयत्न करूनही या तीनही गावात १०० टक्के लोकांना विमा संरक्षण मिळू शकलेले नाही.

गाव तसं भलं..

खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये काही ठिकाणी विकास कामांना गती आहे. तर काही गावांमध्ये विकासकामांना सुरुवात होऊन ती रखडली आहेत. तर काही गावकऱ्यांच्या मदतीने विकासकामे सुरू आहेत.

गोळवलीची आंबवडेवर आघाडी

रत्नागिरी जिल्हय़ात या कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत खर्ची पडलेल्या निधीची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक कै. गोळवलकर गुरुजींच्या गोळवली गावाने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावापेक्षा चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. गोळवलीमध्ये आत्तापर्यंत सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर आंबडवे गावासाठी अवघा सुमारे १९ लाख रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. गोळवलीपेक्षा या गावाची योजना एक वर्ष उशिरा सुरू झाली हे मान्य करूनही दोन गावांसाठी उपलब्ध झालेल्या निधीतील फरक किती तरी जास्त आहे.

केळीवेळीचा कायापालट

विदर्भातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी केळीवेळी गावाला दत्तक घेतले. कबड्डीची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या या गावाने अनेक मोठे खेळाडू दिले आहेत. शासनाच्या योजनेतून गाव हागणदारीमुक्त झाले, घरकुल बांधण्यात आली. विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी ३४ लाखांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला. सभागृह, व्यायाम शाळा झाली. ब्रिटिशकालीन गाव तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण झाले. गावाला मुबलक पाणीपुरवठा करण्यात येतो. शेततळय़ांच्या निर्मितीतही केळीवेळी अग्रेसर आहे. केळीवेळी ते गिरजापूपर्यंतच्या रस्त्यासाठी ५ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे काम सुरू आहे.

गडकरींच्या पाचगावात ‘वायफाय’!..

नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले, चारही बाजूंनी दगडखाणींनी घेरलेले उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव देशातील पहिले वायफाय सेवायुक्त गाव ठरले आहे. खाणीमुळे पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पुन्हा कायम करण्यासाठी वृक्षलागवड मोहीम राबवण्यात आली. गडकरी यांनी काही बडय़ा कंपन्यांच्या सीएसआर फंडातून या गावात विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. ८० टक्के कामे मार्गी लागली आहेत. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा नव्याने बांधण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररीची सोय करण्यात आली. बंधारा, रुग्णवाहिका, समाज भवन, शेतकरी भवन, गावातील ९९ टक्के शेतकऱ्यांना वीज जोडण्या, इंटरनेटसाठी फायबर ऑप्टिक केबल टाकण्यात आली.  शौचालय, युवकांसाठी व्यायाम शाळा इमारत व साहित्य देण्यात आले आहे.

चंदनखेडय़ात सरकारी योजना

खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दत्तक घेतलेल्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या गावात साडेतीन वर्षांत शौचालयाचे बांधकाम शंभर टक्के करण्यात आले आहे. मधमाश्या पालन केंद्राअंतर्गत येथे उत्कृष्ट काम सुरू आहे. रस्ते, शाळा, सिंचनाच्या सोयी, शुद्ध पिण्याचे पाणी, वाचनालय, विहीर, हातपंप, अंगणवाडी, ग्रामस्थांना रोजगाराच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेततळे व शेतबोडींची कामे सर्वाधिक केली गेली आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीनेही या गावात अतिशय चांगले काम करण्यात आले आहे.

येवली व्यसनमुक्त

गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार अशोक नेते यांनी येवली गाव दत्तक घेतले. येथे खासदार निधीतून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वॉटर आरओ प्लान्ट लावण्यात आला आहे. शौचालय बांधकामाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. वाचनालय, रस्त्यांची कामे केली आहेत. आतापर्यंत २५ लाखांचा खासदार निधी या गावात खर्च करण्यात आलेला आहे. व्यसनमुक्तीचे सर्व कार्यक्रम राबवून हे गाव व्यसनापासून मुक्त करण्यात आले आहे. साक्षरता अभियानात हे गाव राज्यात प्रथम आले आहे. या गावात शंभर टक्के साक्षर लोक आहेत. इतरही अनेक कामे येथे सुरू आहेत.

लोकसहभागातून विकासकामे

केंद्राच्या सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्य़ातील वडगाव-शिंदे, कासारी आणि कोळवडे ही तीन गावे पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी दत्तक घेतली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात वडगांव-शिंदे या गावाची निवड शिरोळे यांनी केली. आरोग्य सेवा, स्वच्छता, कचरा निर्मूलन, स्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठा, शेतीविकास, स्वयंरोजगारनिर्मिती, भूजल विकास, सौर ऊर्जा प्रकल्प आदींचा या गावासाठी आराखडा तयार करण्यात आला. गावासाठी आतापर्यंत एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.