लोकसभेत अविश्वास ठरावावर सलग सात तास चर्चा करण्याचे ठरलेले होते. सकाळी अकरा वाजता चर्चा सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदस्य आपापले मुद्दे मांडतील आणि प्रथेप्रमाणे पंतप्रधान त्यांच्या मुद्दय़ांना उत्तरे देतील. लोकसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले; पण तेवढय़ात सदस्यांनी आक्षेप घेतला. सात तासांत चर्चा होणे शक्यच नाही. आम्हाला पुरेसा वेळ मिळायला हवा. कुठेही अविश्वास ठरावावरील चर्चा एका दिवसात संपवली जात नाही. अध्यक्षांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला; पण सदस्यांनी त्यांचा हेका काही सोडला नाही. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार उठले आणि सदस्यांना म्हणाले, ‘‘चर्चा एका दिवसाचीच असेल. आता तर टी ट्वेन्टीचा जमाना आहे. वीस षटकेच खेळायची असतात. कुठे तुम्ही जुन्या जमान्याची गोष्ट करता. पाच पाच दिवसांचा कसोटी सामना कोण बघतो का?..’’ अविश्वासावरील चर्चा म्हणजे खरोखरच टी ट्वेन्टीचाच सामना होता. अनेक सदस्यांना एक एक मिनिटात त्यांचे भाषण आवरावे लागले. कैरानाच्या खासदार तबस्सूम बेगम यांचे पहिलेच भाषण होते, त्यांनाही कसेबसे तीन मिनिटे मिळाली. काही सदस्यांना संधी मिळावी म्हणून पंतप्रधानांनाही बसून राहावे लागले

डॉक्टर गडकरी!

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला रस्तेबांधणी, राष्ट्रीय महामार्ग, परिवहन व्यवस्था या विषयांवरील प्रश्न सदस्य विचारत होते. प्रत्येक प्रश्नाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धडाधड उत्तरे देत होते. गडकरींना त्यांच्या खात्याची माहिती असतेच. त्यात नवल काहीच नाही, पण त्यांना तांत्रिक बाजूही बारकाईने ठाऊक असते. रस्त्यावर डांबर वापरले तर काय होते? अन्य रसायनांचे मिश्रण केले तर काय परिणाम होता? ही रसायने कोणकोणती?.. अशी सगळी माहिती त्यांनी खडाखडा मंत्र म्हटल्यासारखी सभागृहाला सांगितली. बिहारच्या खासदाराची तक्रार होती की, त्याच्या मतदारसंघात रस्त्याची कामे झालेली नाहीत. त्यावर गडकरी म्हणाले, चोवीस तासांत काम करतो.. पण मला रस्ते बांधायला जमीन तर द्या.. गडकरींचा हा कामाचा झपाटा आणि त्यांची या विषयातील सखोल माहिती बघून प्रभावित झालेल्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन गडकरींना म्हणाल्या, ‘‘गडकरी, तुम्हाला या विषयातील डॉक्टरेट द्यायला हवी!’’ उपस्थित सदस्यांनी मनापासून स्वागत केले.

हम तो हम है.

शत्रुघ्न सिन्हा नेहमीच आपल्या तोऱ्यात असतात. सभागृहात येतानाही ते ऐटीत येतात. पडद्यावर हिरोने एन्ट्री घ्यावी तसे. ते अविश्वास ठरावाविरोधात मतदान करणार असे मानले जात होते. मोदी-शहा जोडगोळीविरोधात थेट लढाई लढण्याची हिंमत त्यांनी केली नाही. साइड हिरोप्रमाणे त्यांनी खऱ्या हिरोचे म्हणणे ऐकले आणि पक्षाचा मान राखला; पण शत्रुघ्न सिन्हा भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी मानवी विक्रीविरोधातील विधेयक लोकसभेत आणले आहे. या विषयासंदर्भात बिहारमध्ये सिन्हा यांची संस्थाही काम करते. त्यासंदर्भात आयोजित केलेल्या चर्चासत्रात शत्रुघ्न सिन्हाही होते. त्यांनी भाजपच्या मंदिर अजेंडय़ालाच छेद दिला. ‘‘मला मंदिर बांधण्यात कोणताही रस नाही. मानवी मंदिराची निर्मिती हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे’’.. हिरोचा प्रतिवाद कोण करणार?

पप्पू पप्पू..

भाजपचे लोक राहुल गांधींना फारसे गांभीर्याने घेत नाही. कुठल्याही पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्षांना राहुलविषयी प्रश्न विचारला, की ते नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देतात. राहुल नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नाही, असा त्यांचा आविर्भाव असतो. त्यांचाच कित्ता त्यांचे कार्यकर्तेही गिरवतात. लोकसभेत राहुल गांधी भाषण द्यायला उभे राहिले. त्यांनी सुरुवात करायचा अवकाश सत्ताधारी बाकांवरून चिरक्या आवाजात ‘पप्पू पप्पू’ असे आवाज यायला लागले; पण राहुल गांधींनीच स्वत:ला पप्पू म्हणवून घेतले. ‘तुम्ही मला पप्पू म्हणता; पण मला तुमचा राग येत नाही,’’ असे राहुल म्हणताच सत्ताधारी बाकावरील चिरके आवाज अवाक्  झाले. त्यानंतर राहुल यांनी पंतप्रधानांना झप्पी देऊन सगळ्यांनाच सर्द करून टाकले. राहुल यांनी कोणताही मुद्दा उपस्थित केला, की भाजपचे खासदार ऑ ऑ असा प्रतिसाद देतात. एखाद्या लहान मुलाने मोठी गोष्ट केली की, आपण त्याला -काय सांगतोस – असे खोटय़ा आश्चर्याने विचारतो तसाच काहीसा प्रकार सत्ताधारी बाकांवरून तासभर सुरू होता.

वायफाय गुरू..

संसदेत वायफायची सुविधा असावी, अशी मागणी बरेच दिवस होत होती, ती अखेर पूर्ण झाली ती ‘गुगल गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्यामुळे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभाध्यक्षांनी सदस्यांना ‘वायफाय’ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. आता सदस्यांना संसदेच्या आतमध्ये मोबाइलवर इंट्रानेटद्वारे इंटरनेट सर्फिग करता येणार आहे; पण त्यांना पाहता येतील फक्त सरकारी वेबसाइटच. ही काळजी मात्र अहलुवालियांनी घेतलेली आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळेच खासदारांना ही सुविधा मिळू शकली. त्यांच्या या प्रयत्नाचे महाजन यांनी कौतुक केले. पुढच्या काळात कदाचित संसदेचा कारभारही पेपरलेस होऊ शकतो. आत्ता कागदांवरच कोटय़वधींचा खर्च करावा लागत आहे तो तरी वाचेल.

जावडेकरांचे स्मित..

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर समोरच्या व्यक्तीला दुखावत नाहीत. त्याचे म्हणणे पटले नाही तर ते फक्त स्मित करतात आणि मुद्दा सोडून देतात. स्मित हे जावडेकरांचे माणसे जोडून ठेवण्याचे रहस्य असावे. शिक्षण हक्क सुधारणा विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले. त्यावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनी विधेयकाला विरोध केला नाही; पण जावडेकरांना नाहक लक्ष्य बनवले. रॉय खोचकपणे म्हणाले, ‘‘जावडेकरांनी मनुष्यबळ खात्याचा कारभार अत्यंत खुबीने सांभाळलेला आहे. संघाच्या अजेंडय़ाला थोपवणे म्हणजे सोपे काम नव्हे. संघाचे प्रचारक असताना जावडेकरांनी ही कमाल केली आहे..’’ सौगातांच्या टिप्पणीवर जावडेकर काहीच बोलले नाहीत. बोलणार तरी काय? त्यांनी त्यांचा हुकमी एक्का बाहेर काढला. जावडेकरांनी नेहमीचे स्मित केले आणि विषय सोडून दिला. विधेयकावरील चर्चेला उत्तर देऊन विधेयक मंजूरही करून घेतले.