हर्षद कशाळकर आपल्याकडे अनेक भागांना काही विशिष्ट कृषी उत्पादनांचे वरदान लाभले आहे. हवामान, जमीन पोषक ठरल्याने या भागातील या विशिष्ट पिकांचे उत्पादन आणि दर्जा या दोन्हीतही गुणात्मक फरक दिसून येतो. अलिबागचा पांढरा कांदाही असाच. आता या कांद्याला लवकरच भौगोलिक मानांकन मिळणार आहे. असे मानांकन मिळल्यानंतर या कृषी उत्पादनाला दर्जा प्राप्त होत त्याचे विपणन अधिक परिणामकारक होते. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्यला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात नुकताच एक करार करण्यात आला. लवकरच पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे या काद्यांला खऱ्या अर्थाने राजाश्रय प्राप्त होणार आहे. अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर अलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. पूर्वी अलिबाग तालुक्यात १०० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड होत असे. यंदाही अलिबाग तालुक्यात जवळपास २०६ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठय़ा प्रमाणात लागवड होत असते मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाही. जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती जवळपास केली जात नाही. मात्र अलिबाग तालुक्यात परिस्थिती काहीशी वेगळी असते. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकतो. त्यामुळे शेतकरी पांढरा कांदा यासारख्या पिकांची लागवड करतात. सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक बियाण्यांचा वापर करून या कांद्याची लागवड केली जाते. या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. अलिबाग तालुक्यात २०६ हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. दरवर्षी भात कापणीनंतर डिसेंबर महिन्यात या कांद्याची लागवड केली जाते. साधारणपणे अडीच महिन्यात कांद्याचे पीक तयार होते. स्थानिक महिला विशिष्ट पद्धतीने या कांद्याच्या माळा विणतात आणि नंतर आकारमानानुसार विणलेल्या या पांढऱ्या कांद्याच्या माळा बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. हा कांदा उन्हाळ्यातील दोन ते तीन महिनेच बाजारात विRीसाठी असतो. याच कालावधीत शेतकरी स्वतच पुढील वर्षांतील लागवडीसाठी कांद्याचे बियाणे तयार करतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीने या पिकाची लागवड केली जात असे. मात्र अलिकडच्या काळात कांदा लागवडीसाठी वाफा पद्धतीचा वापर केला जाऊ लागला आहे. तसेच शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि स्प्रिंक्लर पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा वापर टाळून केवळ सेंद्रिय खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. जिल्ह्यात एकरी २४ एवढे विR मी उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. यातून एकरी दोन लाखांपर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचे कृषी विभागाने केलेल्या पहाणीत समोर आले आहे. राज्यात अकोला, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर आणि पालघर तालुक्यातही पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र अलिबागचा पांढरा कांदा अन्य उत्पादनाच्या तुलनेत चव आणि औषधी गुणधर्मामुळे उजवा ठरतो. या कांद्याला असलेल्या मागणीमुळे अलिकडच्या काळात राज्यात इतरत्र उत्पादित होणारे पांढरे कांदे अलिबागचे कांदे म्हणून विRी केले जात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत या कांद्याची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भावही मिळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भौगोलिक मानांकन अशा उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे, ज्यामध्ये त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता ही त्याच्या मूळ भौगोलिक स्थानावरून ओळखली जाते. इतर कांदे व अलिबागचा पांढरा कांदा यांच्या गुणधर्मात फरक काय आहे हे जाणून घेण्यासाठी अलिबागमधील पांढऱ्या कांद्याचे भौगोलिक मानांकन करण्याचे कृषि विभागाने ठरवले आहे. मानांकन देण्याची विनंती बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठाने शास्त्रज्ञांची नेमणूक देखील केली आहे. हे शास्त्रज्ञ आता आलिबागच्या पांढऱ्या कांद्याचा अभ्यास करून त्याला मानांकन देणार आहेत. मानांकनाचे प्रमाणपत्र दिले जाईल. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला एक नाव मिळेल व त्याची वेगळी ओळख निर्माण होईल, यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबेल आणि अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे ‘ब्रँडिंग’ही होईल. औषधी गुणधर्म पांढरा कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. यात मिथाइल सल्फाइड आणि अमायनो अॅसिड असते. हे ‘कोलेस्टेरॉल’ही नियंत्रणात ठेवते तसेच हृदयाच्या तRोरींपासूनही दूर ठेवते. रोज कांदा खाल्लय़ाने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे अॅनिमियाही दूर होतो असे जाणकार सांगतात. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल, तर ताजा कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज पांढरा कांदा खाल्लय़ाने ‘इन्शुलिन’ निर्माण होते. harshad.kashalkar@expressindia.com