प्रतिमा जोशी इंद्रजीत इमरोज याची ओळख जगाने केवळ अमृताचा जोडीदार, सखा, प्रियकर इतकीच का ठेवावी? अमृता प्रीतमसारखी भारतीय साहित्याचा मानदंड ठरलेली सशक्त प्रतिभाशाली लेखिका ज्याच्या सहवासात सुख शोधते, आपल्या शब्दांशी इमान राखण्यासाठी ऊर्जा मिळवते.. तो माणूस स्वत:सुद्धा तशाच उंचीचा, प्रगल्भ जाणिवेचा आणि प्रतिभेचा असणार ना! अब ये घोंसला घर चालीस साल का हो चुका है तुम भी अब उड़ने की तैयारी में हो इस घोंसला घर का तिनका-तिनका जैसे तुम्हारे आने पर सदा तुम्हारा स्वागत करता था वैसे ही इस उड़ान को इस जाने को भी इस घर का तिनका-तिनका तुम्हें अलविदा कहेगा। हेही वाचा >>> प्रश्न विचारण्याचं धाडस हे शब्द आहेत इंद्रजीत इमरोज या कवीचे. नुसता कवी नाही, चित्रकार कवी. चित्रकार नि कवी तर तो होताच, पण दोन-चार दिवसांपूर्वी तो हे जग सोडून गेला तेव्हा त्याच्या मृत्यूच्या बातम्यांच्या शीर्षकातसुद्धा त्याचा उल्लेख ‘अमृता प्रीतम यांचा जोडीदार’ असाच केला गेला. त्याचे स्वत: चे असे अस्तित्व इतके का मागे लोटले जावे ? शेवटचे श्वास नि:श्वास घेत असलेल्या अमृताला जो तिच्या उशाशी बसून ‘इस घोंसला घर का तिनका-तिनका, जैसे तुम्हारे आने पर सदा तुम्हारा स्वागत करता था; वैसे ही इस उड़ान को- इस जाने को भी इस घर का तिनका-तिनका तुम्हें अलविदा कहेगा। हेही वाचा: मैं तुम्हें फिर (फिर) मिलूँगी.. इतके हळुवार पण कठोर सत्य स्वीकारून सांगू शकत होता, त्याची ओळख जगाने केवळ अमृताचा जोडीदार, सखा, प्रियकर किंवा आजच्या भाषेत लिव्ह इन पार्टनर इतकीच का ठेवावी? अमृता प्रीतमसारखी भारतीय साहित्याचा मानदंड ठरलेली, भारतीय स्त्रीचा आवाज बनलेली एक सशक्त प्रतिभाशाली लेखिका ज्याच्या सहवासात सुख शोधते, मनाची स्थिरता मिळवते, आपल्या शब्दांशी इमान राखण्यासाठी ऊर्जा मिळवते.. मैं तैनु फिर मिलुंगी म्हणते तो माणूस स्वत:सुद्धा तशाच उंचीचा, प्रगल्भ जाणिवेचा आणि प्रतिभेचा असणार ना! तल्लख आणि तरल प्रतिभेच्या स्त्रीचा सखा होणे, तिच्या निर्मितीला प्रवाही राखण्याचे पर्यावरण रोजच्या रहाटीत शाबूत ठेवणे हे असे उगा कोणालाही आवाक्यात घेता येईल असे कामच नव्हे. आणि असे जगताना स्वत:ची निर्मिती, स्वत:ची कला जोपासत राहणे हे मोठया क्षमतेचे लक्षण आहे. का बनवली गेली इमरोजची अशी प्रतिमा? अमृताने कधी तसा ‘फील’ दिला होता त्याला किंवा जगालासुद्धा तिच्या वागण्या बोलण्या लिहिण्यातून? इमरोजने कधी प्रदर्शन केलेले आठवते त्याच्या अमृताबरोबरच्या सहजीवनाचे? ते फारसे कधी बोललेत एकमेकांविषयी? असतीलच बोलले समजा तर त्यात कोणते भाव होते? हे प्रश्न अनेक अर्थानी महत्त्वाचे आहेत. हेही वाचा: स्त्रीदु:खाची उत्कट, सर्जक अभिव्यक्ती व्यक्तीच्या खासगी जीवनाकडे भिंग लावून बसलेल्या, शरीर हे फक्त वासनेचे दार आहे इतक्याच भावनेने त्याकडे बघणाऱ्या, चौकटीतील व्यवहारी नात्यांपालीकडे काही असू शकते याची तीळमात्र कल्पना आणि अनुभव नसलेल्या समाजाकडून कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन साचेबद्ध पद्धतीने होणार यात काहीच नवल नाही. पण भारतीय समाजाचे वैशिष्टय असे की इथला प्रागतिक प्रवाहसुद्धा पुष्कळदा कर्मठ प्रतिमासृष्टीचा प्रभाव बाळगून समोर जे दिसते, ऐकू येते त्याचा अन्वयार्थ लावताना दिसतो. तसा अन्वयार्थ लावताना मग नव्या - जुन्या चौकटी परस्परांना छेदत जातात आणि मूल्य हे व्यक्तीकेंद्री की समूहजीवनाची चौकट शाबूत राखणारे यात गोंधळ व्हायला सुरुवात होते. मग एकीकडे स्त्रीच्या बहुसहचर असण्याच्या स्वातंत्र्याची बाजू घेतली जाते आणि त्याच वेळी कौटुंबिक चौकटीतील स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून नात्यांची आणि न्याय अन्यायाची मांडणी केली जाते. हे असे होणार याबद्दल उपहास असण्याचे कारण नाही. कारण समाजात एकाच वेळी निरनिराळे प्रवाह वाहत असतात, व्यक्तींच्या संख्येइतक्याच नानाविध प्रवृत्ती अस्तित्वात असतात आणि अशा नानाविध प्रकृतीच्या व्यक्तींनीच समाज नावाची एक ‘अब्सर्ड आयडेंटिटी’ बनलेली असते नि प्रागतिक असोत की सनातनी सारेच त्याचा हिस्सा असतात. हेही वाचा: लग्नाविना सहजीवन! असा समाज फक्त भारतातच नाही, तो जगभर आहे. जगण्याचे यमनियम आणि चौकटी तो जपत असतो. या चौकटीत व्यक्तीची ओळख जात, धर्म, वंश, वर्ण, वर्ग आणि लिंग याच ढोबळ वर्गवारीत असते. व्यक्तीचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व हे कायम सार्वजनिक नियमांद्वरे प्रश्नचिन्हांकित केले जाते. व्यक्ती आणि समष्टी यांच्यातील हे द्वंद्व जेवेढे कमी संघर्षांचे तेव्हढा तो समाज खुला आणि मोकळा! म्हणूनच ढोबळ वर्गवारीतील लिंग या वर्गातील ओळख ही फक्त नर, मादी आणि पारिलगी एव्हढयापुरतीच मर्यादित केलेली दिसते. आई, आजी, मावशी, आत्या, मुलगी, भाची इत्यादी नाती वगळली तर बाकी दोन स्त्री-पुरुषांचे एकत्र येणे हे लैंगिकच असणार किंवा असते हा या चौकटीच्या पायाचा विचार. ते शंभर टक्के चुकीचे नसले तरी पूर्णपणे खरेही नाही आणि त्याचबरोबर माणसासह सर्व प्राणिमात्रात पोटाच्या भुकेप्रमाणे लैंगिक वासना हीही मूलभूत प्रवृत्ती आहे हेही तितकेच खरे. म्हणजे माणसे केवळ लैंगिक सुखासाठीच एकत्र राहतात असे नव्हे तर त्यांना परस्परांचा सहवास अनेक कारणांसाठी हवासा असतो / आश्वासक असतो. आणि अशा नात्यामध्ये किंचितही लैंगिक भावना उपजू नये अशी धारणा हीसुद्धा निसर्गाच्या नियमांत बसत नाही. समाज, व्यक्ती अशा कात्रीमध्ये कायम सापडलेल्या दिसतात. त्यातूनच प्लातोनिक लवसारखे भोंगळ विचार पुढे येतात. हेही वाचा: मोठं सत्य इतके सारे विवेचन अमृता आणि इमरोझ यांच्या बाबतीत का करायचे, तर त्यांच्या नात्यांकडे पाहताना आपण सारेच या गुंत्यात अडकून आपापल्या पद्धतीने त्यांचे मोजमाप करतो, गुणगान गातो किंवा त्यांच्यावर टीका करतो. एकाच घरात ते वेगवेगळया खोल्यांत राहत असेही आत्यंतिक कर्मठ शुद्धतेच्या कल्पनांतून ठासून सांगितले जाते तर दुसरीकडे प्रीतम सिंह यांची पत्नी असूनही सज्जाद, साहीर आणि इमरोज अशा अनेक पुरुषांवर ही बाई ‘लफडी’ करते असा उपहास केला जातो तर आणखी कुठे हे हाइप केलेले नाते आहे अशी टीका होताना दिसते. हेही वाचा: वाचायलाच हवीत : मनस्वी जगण्यातून उमटलेला आत्मस्वर! कोणी केली ही हाइप? माझ्या मते जुने सुटले नाही आणि नवे धड समजले नाही अशा आणि सोबतीचा अर्थच गळी न उतरलेल्या, सोशल मीडियामध्ये भसाभस लिहीत सुटलेल्या माणसांनी इम्रोजची एक आभासी प्रतिमा तयार केली आहे. मालकी हक्क न गाजवणाऱ्या पुरुषाची स्वप्ने स्त्रिया पाहत असतात. नैसर्गिक चेतनेतून अन्य व्यक्तीविषयी वाटणारी जवळीक व्यक्त करण्याची मुभा नसलेल्या स्त्रिया असतात, बुद्धिमान स्त्री जोडीदार असावी अशी आस असणारे पुरुष असतात, लग्नाच्या बंधनात नसूनही एकत्र राहता यावे अशी इच्छा असणारेही पुरुष असतात. असे स्त्री- पुरुष सर्व क्षेत्रांत, सर्व स्तरांत, सर्व ठिकाणी असतात. अशांच्या कल्पनेने साकारलेले अमृता इमरोज यांचे चित्र नुकत्याच रेघोटया मारायला शिकलेल्या एखाद्या लहान मुलाने भिंतीवर गिरबटून ठेवावे आणि त्यातून काहीच बोध होऊ नये, कारण त्यात मुळात काही बोध नसतोच.. तसे झाले आहे. अमृताविषयी प्रेमाने उसासे टाकणाऱ्या किती जणी आपल्या परिचयातील एखाद्या स्त्रीचे असे जगणे मान्य करतील आणि किती पुरुष मनस्वी स्त्रीचे खरे मित्र बनून राहतील? काही नाती ही त्या विशिष्ट व्यक्तींच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वातून आकार घेतात. त्याचे सार्वत्रिकीकरण करणे हे न झेपणारे आव्हान पेलण्यासारखे आहे. याचा अर्थ दुसऱ्या कोणी तसे जगू नये असे नाही. मात्र त्यासाठी पुरेशी प्रगल्भता आणि हृदयात अपार प्रेम नि आदर यांचा साठा आपल्यापाशी आहे ना याची खातरजमा स्वत: च करून घ्यावी लागेल. कोणतेही रूढ बंधन नसलेले तरीही सर्व बंधनांपेक्षाही वर जाणारे सर्व कासोटय़ांना सामोरे जाणारे उच्च दर्जाचे नाते हे मानवी नातेसंबंधांतील सर्वाधिक नितळ आणि स्वच्छ नाते असते.. तिथपर्यंत माणसाचा प्रवास पोहोचो. (लेखिका ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका आहेत.)