रावसाहेबांचा बोलण्यात कोण हात धरणार ? ते एकदा म्हणाले होते, ‘ मी म्हणजे बारा भोक्क्षाचा पाना आहे’ पाहिजे तो स्क्रू त्याने आवळता येतो. मग ते पुढे पुढे मंत्री झाले. रेल्वेमंत्री म्हणून आता त्यांना या खात्यावर प्रभाव निर्माण व्हावा एवढा त्यांच्या भाषणाचा परिणाम जाणवू लागला आहे. अगदी रेल्वेमंत्री अश्विनीकुमारही त्यांच्या खुमासदार भाषण शैलीवर फिदा असतात. नुकतेच ते लातूर येथे आले आणि त्यांच्यासमोर काही मागण्या मांडण्यात आल्या. लातूर- गुलबर्गा या मार्गाचे सव्र्हेक्षण करण्याची मागणी त्यांनी मान्य केली. अन्य मागण्यांबाबत बोलताना ते म्हणाले, ‘२०२४ मध्येही मी रेल्वेमंत्रीच होईन. तेव्हा आता काही मागण्या बाकी ठेवा. असंही उधारी बाकी ठेवल्याशिवाय आपलं दुकान चालत नसतंय.’ मुख्यमंत्री तर तुमचेच आहेत भर बैठकीत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले सत्ताधाऱ्यांना कधीच पसंत पडत नसतात आणि सत्तेत सहभागी आपल्यातीलच दुसऱ्या गटाने प्रश्न विचारणे तर त्याहून अधिक नापसंतीचे कारण ठरतात. नगर जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत याची प्रचीती आली. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, शिवसेनेतील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले या सत्ताधाऱ्यांसह विरोधी काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे बैठकीला उपस्थित होते. पालकमंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना बैठक लवकर आटोपती घेण्याची सूचना केली. अधिकाऱ्यांनीही मंत्र्यांचा कल लक्षात घेऊन वेगाने सादरीकरण सुरू केले. मात्र मध्येच आमदार कानडे यांनी अवकाळी, गारपीट, अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना अद्यापि मिळाली नाही, याकडे लक्ष वेधले. खासदार सदाशिव लोखंडे यांनीही त्याला दुजोरा देत शेतकऱ्यांमध्ये याबद्दल आक्रोश असल्याचे सांगितले. मंत्री विखे यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली तसे त्यात तथ्य असल्याचे आढळून येऊ लागले. वातावरणाचा रोख बदलत असल्याचे लक्षात येताच मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीच्या काळात कशा अडचणी येत होत्या, त्या सध्याचे सरकार कसे दूर करत आहे, याची माहिती देण्यास सुरुवात केली. भाजप नेते कर्डिले यांनीही, मुख्यमंत्री तुमच्याच गटाचे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे ना?ह्ण अशी विचारणा करत खासदार लोखंडे यांना गप्प केले. अकलूजची चमक-धमक. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार वर्षांपूर्वी फूट पडून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे कुटुंबीयांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार आणि मोहिते-पाटील यांच्यात अधूनमधून शह-प्रतिशहाचे राजकारण होते. त्याची प्रचीती पुन्हा एकदा प्रत्ययास आली आहे. झाले असे की, शरद पवार हे आपले नातू आमदार रोहित पवार यांना सोबत घेऊन बारामतीहून पंढरपूरकडे हेलिकॉप्टरने आले होते. हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर रोहित पवार यांनी अकलूजची ती पूर्वीची चमक आणि धमक आता मावळल्यासारखी दिसून आली, असा चिमटा काढत अकलूजकर मोहिते-पाटील यांना डिवचले. परंतु त्यास मोहिते-पाटील यांनीही अकलूजमध्ये लगेचच सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर देऊन हिशेब चुकता केला. मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने अकलूजमध्ये आयोजिलेल्या ताराराणी महिला केसरी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी संयोजक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पवारांचा नामोल्लेख टाळून, अकलूजने आपली चमक-धमक वेळोवेळी दाखवून दिली आहे. मग तो कुस्तीचा आखाडा असो वा राजकारणाचा आखाडा, ही चमक आणि धमक जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत,तोपर्यंत अकलूजकर राज्याला आणि देशाला दाखवून देतील, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. दी की दि.. दीपक केसरकर हे कोल्हापूर जिल्ह्याचे जसे पालकमंत्री तसेच त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाचा कारभार आहे. मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याचे काम या विभागाचे. पण या खात्याच्या मंत्र्यांच्या ऱ्ह्स्व, दीर्घ चुका होत असल्यास कोणाला दोष देणार ? झाले असे की, एकाच दिवशी कोल्हापूरमध्ये विविध शासकीय कार्यक्रम होते. एका पत्रिकेत दीपक केसरकर तर दुसऱ्या समारंभाच्या पत्रिकेत दिपक केसरकर असा उल्लेख होता. आता नेमके मंत्र्यांच्या नावात ‘दी’ की ‘दि’ वापरावे याचा सल्ला मराठी भाषा विभागाकडून घेण्याची वेळ कोल्हापूर जिल्हा प्रशासनावर आली आहे. (संकलन : सुहास सरदेशमुख-मोहनीराज लहाडे, दयानंद लिपारे, एजाज, हुसेन मुजावर)