फटकळ वाटणारे, पण परखड भाष्य करण्याचा अजित पवार यांचा हातखंडा काही औरच. त्याला निमित्त ठरले ते कोल्हापुरातील एका कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या नावावरून केलेले भाष्य. तसे ते त्यांनी आधीही एकदा केले होते. एका क्रीडा कार्यक्रमाला मनोमीलनानंतरची धनंजय महाडिक- सतेज पाटील यांची उपस्थिती होती. तरुणपणाकडून प्रौढत्व-पोक्तपणाकडे झुकलेल्या कोल्हापुरातील नेतृत्वाचा उल्लेख करीत अजितदादांनी अजूनही यांना ‘मुन्ना-बंटी’ म्हणवून घ्यायला कसे बरे चालते, असा बोचरा प्रश्न उपस्थित केला होता. यातून ज्याने त्याने काही बोध घ्यावा ही त्यांची सुप्त अपेक्षा. पाच-सहा वर्षांच्या कालावधीनंतर यात काहीच फरक दिसला नसल्याने परवाच्या कार्यक्रमात पवार यांनी बंटीला आता बंटी झाले तर असे गमतीदार विधान केल्यावर हास्यकल्लोळ उडाला खरा; पण तोवर सतेज पाटील यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून झाले होते. याच वेळी ऋतुराज पाटील हे आमदाराचे नाव कसे भारदस्त आहे हे विशिष्ट लकबीत बोलून दाखवत अजितदादांनी नाममहिमा वा नामकथा सुरूच ठेवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरत जाधवको गुस्सा क्यूँ आता है..!

अभिनेते आणि मराठी नाटय़ परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम राज्यभरातील नाटय़गृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. कारण तमाम रंगकर्मीची ही गेल्या अनेक वर्षांची सार्वत्रिक व्यथा आहे. प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना रत्नागिरीतील एकमेव स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटय़गृहाबाबत हाच अनुभव गेल्या शनिवारी आला आणि त्यांनीही त्याबद्दल तीव्र नापसंती नोंदवली. जाधव यांच्या ‘तू तू मी मी’ नाटकाचा प्रयोग गेल्या शनिवारी सावरकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता; पण वातानुकूलन यंत्रणा नीट काम करत नसल्याने थोडय़ाच वेळात प्रेक्षक आणि कलाकारांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. पहिला अंक संपल्यानंतर काही प्रेक्षकांनी तिकीट खिडकीवर जाऊन संयोजकांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. जाधव यांच्यापर्यंत हा विषय गेला. त्यांनाही रंगमंचावर अभिनय करताना हा त्रास सहन करावा लागला होताच. त्यामुळे नाटकाचा दुसरा अंक सुरू होण्यापूर्वी जाधवांनी प्रेक्षकांना सहन करावा लागत असलेल्या त्रासाबाबत मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्याचबरोबर नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळपणाबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. येथील सर्व यंत्रणा सुधारेपर्यंत आपण रत्नागिरीत नाटकाचा प्रयोग करणार नाही, अशी घोषणा त्यांनी संतप्त सुरात केली. उपस्थित प्रेक्षकांनीही त्यांच्या भावनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, अशोक सराफ यांनीही या नाटय़गृहाच्या गैरव्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत; पण परिस्थितीत सुधारणा दूरच, जाधवांच्या नाटकाचा प्रयोग लांबल्यामुळे वातानुकूलन कमी झाल्याचा कांगावा नगर परिषद प्रशासनाने केला आहे.

शरद पवार यांनाही पराभूत करू..

राष्ट्रवादी काँग्रेसचे जावळी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य  दीपक पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पराभूत केल्याशिवाय मी निवृत्त होणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेने शिवेंद्रसिंहराजे समर्थक खवळले. साताऱ्यात गुरुवारी काढण्यात आलेल्या एका मोर्चाच्या वेळी कार्यकर्त्यांचा हा रोष पाहायला मिळाला. ‘आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आमदारकीला पाडायला जन्माला आला पाहिजे. त्यांना पराभूत करण्याची ताकद कोणातही नाही. अगदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जरी आमदारकीसाठी साताऱ्यातून त्यांच्याविरोधात उभे राहिले तरी आम्ही त्यांना पराभूत करू, अशी आवई ठोकली. त्यावर आधी उदयनराजे यांच्याकडे बघा, असा सल्ला शिवेंद्रसिंहराजे यांना देण्यात आला.

नानांचा दावा आणि जिल्हाध्यक्षाची पाठ

कर्नाटक सीमेवरील सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे सलग दोन वेळा पराभूत झाल्यामुळे आता ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात यावी, असा आग्रह काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या उत्साही कार्यकर्त्यांनी धरला आहे. नव्हे, तर या जागेवर इच्छुक म्हणून स्वत:चे नाव पुढे दामटण्याचा प्रयत्न होत आहे. यातूनच शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे या गुरुशिष्यांच्या पुढच्या पिढीत वाद झाला होता; परंतु कर्नाटकातील यशानंतर बळ आलेल्या काँग्रेसने आक्रमक होऊन सोलापूरची जागा तर सोडाच, पण माढा लोकसभेच्या जागेवरही दावा करायला सुरुवात केली आहे. सोलापुरात झालेल्या काँग्रेसच्या निर्धास्त मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभेची सोलापूरची जागा राष्ट्रवादीला सोडणे शक्यच नाही, पण राष्ट्रवादीच्या वाटय़ातील माढय़ाच्या जागेवरही दावा सांगितला. शिवाय जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व अकरा जागा लढवून जिंकण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना सज्ज राहण्यास सांगितले. पटोले यांचे हे विधान राष्ट्रवादीला डिवचण्यासाठी होते की त्यामागे पक्षात नवीन जोम, उत्साह निर्माण करण्याचा हेतू होता, हे कळले नाही. कारण इकडे नाना पटोले मोठमोठय़ाने बोलत असताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे बसायला एका कोपऱ्यात जागा मिळाल्याने नाराज होऊन निघून गेल्याचे दिसून आले.

 (सहभाग : सतीश कामत, विश्वास पवार, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi ajit pawar mla satej patil in the program commentary politics ysh
First published on: 23-05-2023 at 00:02 IST