करोनाच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना गुलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस), फुप्फुसातील फायब्रोसिस, हृदय किंवा मूत्रपिंडातील समस्या, रक्तवाहिन्यांत गुठळ्या होणे, न्यूमोनिया आणि अगदी अशक्तपणा यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांत दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात हे पचनक्रियेसंबंधी त्रास असणाऱ्यांचे आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असून मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे आणि वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतही त्याच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. दीर्घकालीन परिणामांमध्ये पचनसंस्थेसंबंधित विकारही उद्भवू शकतात, असे निदर्शनास आले असून कोविडमधून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना भूक न लागणे किंवा भूक वाढणे, ओटीपोटात वेदना होणे, आंबटपणा, अतिसार आणि उलटय़ा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. योग्य वेळी उपचार न घेतल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. वेळीच निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच औषधोपचाराने या विकारांवर मात करता येऊ शकते, अशी माहिती पोटविकारतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली पाचक प्रणालीमध्ये यकृत, स्वादुपिंड आणि पित्त मूत्राशय यांच्यासह जठर-आतडय़ांच्या व्यवस्थेचा (जीआय) समावेश आहे आणि कोविडने शरीराच्या इतर अवयवांनाच नव्हे तर जठर-आतडय़ांच्या व्यवस्थेमध्येही (गॅस्ट्रोइन्टेस्टाइनल ट्रॅक्ट) व्यत्यय येत असल्याचे दिसून येते. जीआय ट्रॅक्टचे कार्यात व्यत्यय आल्याने शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थ शोषून घेण्याच्या कामात अडथळा निर्माण होतो. गॅस्ट्रोइन्टेस्टाइनल ट्रॅक्टच्या रक्तस्रावामुळेही रुग्णांचा अंत होऊ शकतो. लहान मुले आणि प्रौढांना मधुमेहाची लागणही होऊ शकते. काय काळजी घ्याल? * रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थाचे सेवन करा : ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे आणि सर्व प्रकारचे धान्य अशा संतुलित आहाराचे सेवन करा. जंक फूड, मसालेदार, प्रक्रिया केलेले, खारट आणि चवदार पदार्थ खाणे टाळा. काबरेनेटेड पेये आणि कोबीवर्गीय भाज्यांचे सेवन करणे टाळा. फायबरयुक्त आणि हेल्दी फॅट्सचे सेवन करा. आतडय़ाचे चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रोबायोटिक्सचे सेवन करा. पाणी पिण्यास विसरू नका आणि हायड्रेटेड राहा. मद्यपान आणि धूम्रपान करू नका. * अन्न योग्यरीत्या चावून खा : अन्न योग्य प्रकारे चावून न खाल्ल्याने आम्लपित्त होऊ शकते. म्हणून हळूहळू खा आणि आपण जे अन्न खातो त्यातील पोषणमूल्यांकडे लक्ष द्या. अन्न नीट चावून खाल्ल्याने लाळ निर्माण होण्यास मदत होते. ज्यामुळे आपल्या तोंडात पाचक प्रक्रिया सुरू होऊ शकते. * व्यायाम आणि तणावमुक्त राहा : शारीरिकरीत्या सक्रिय राहाणे आणि जॉगिंग, धावणे आणि चालणे यांसारख्या व्यायाम प्रकाराचा दैनंदिन जीवनात समावेश करा. यामुळे हृदयातील जळजळ, आंबटपणा आणि बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होऊ शकतात. योगा आणि मेडिटेशनचा पर्याय वापरून तणावमुक्त राहा.