दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com भारतात शेतीला बेभरवशाचा व्यवसाय म्हटले जाते. आजही आपल्याकडे जमीन, हवा, पाणी, बियाणे, रोगराई या प्रत्येक पातळीवर आमची शेती परीक्षा देत असते. यातूनच शेतीसाठी अंदाज वर्तवण्याचेही एक शास्त्र फार पूर्वीपासून आपल्याकडे तयार झाले. यामध्ये विज्ञानाच्या जोडीने ग्रामीण जगात गुढी पाडव्याच्या वेळी शेतीचे पंचांग वाचण्याची एक परंपरा अनेक ठिकाणी आहे. या पंरपरेविषयी.. यंदाच्या हंगामामध्ये खरीप, रब्बीचा पेरा साधण्यासाठी चांगला पाऊस होणार असला तरी पीकवाढीच्या टप्प्यात पावसाची कमी अधिक हुलकावणी असेल. पावसाच्या नऊपैकी चार नक्षत्रांचे वाहन पर्जन्यसूचक असले तरी ऐन पीक वाढीच्या टप्प्यामध्ये असलेली नक्षत्रे कमी पावसाची असल्याचा अंदाज या वर्षीच्या पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे. चैत्र महिन्यात होणारी गारपीट, कमीअधिक पाऊस वळवाचा असला तरी हा पाऊस गर्भाळ नक्षत्रातील असल्याने याचा फटका पिकांना पोसण्याच्या अवधीत बसू शकतो.. ही सगळी चर्चा कुठल्या शेतीविषयक हवामान अंदाजाविषयी नाही तर गुढीपाडव्याला अनेक गावांत केल्या जाणाऱ्या शेतीविषयक पंचांगाच्या वाचनातील आहे. भारतीय उपखंडातील शेतीचे गणित मान्सूनवर अवलंबून आहे. जरी सिंचन व्यवस्थेने पाणी देण्याची व्यवस्था बारमाही झाली असली तरी पीक लागवड, वाढ आणि बहार येण्यासाठी ज्या हवामानाची गरज असते ते हवामान प्रामुख्याने भारतीय उपखंडामध्ये मान्सूनच्या आगमनातून मिळते. भारतीय शेतीही निसर्गाशी निगडितच असल्याने आजही ग्रामीण भागात गुढी पाडव्याला होत असलेल्या सामूहिक पंचांग वाचनातून मिळते. पुढील हंगामाचे पर्जन्यमान, पीकमान, जनावरांसाठी चाऱ्याची तजवीज या पंचांगावाचनातून मिळणाऱ्या सल्ल्यावर करण्याची प्रथा कालपरवापर्यंत शेतकऱ्याची होती. अलीकडच्या काळात हवामान विभागातून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. यंदा मान्सून ९८ टक्के असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी आजही पंचांगातून वर्तवण्यात येणाऱ्या पाऊसमानावर विश्वास ठेवणारा वर्ग ग्रामीण भागात पाहण्यास मिळतो. अनेक कंपन्यांसह भारतीय हवामान खातेही वाऱ्याची दिशा, वेग अंदमान निकोबारमधील नैसर्गिक स्थिती, दख्खनच्या पठारावर वाढलेले तापमान यातून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. मात्र, पूर्वीच्या काळी नैसर्गिक बदलावरून, प्राण्यांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज बांधला जात होता. अचानक काळय़ा मुंग्यांची सुरू झालेली धावपळ असो वा आकाशात झुंडीने येणारे पखांचे घोडे असो ही पावसाच्या आगमनाची वर्दी देत असतात. पिंपळाच्या झाडावर कावळीने बांधलेले घरटे किती उंचावर, कोणत्या दिशेला आहे यावरही पुढील हंगामातील पर्जन्यमानाचा अंदाज बांधला जात होता. तसेच चिंचेचे पीक मुबलक असेल तर पाऊस खूप आणि आंब्याचा बहार मुबलक असेल तर पावसाची गती आणि स्थिती धोकादायक असू शकते असा कयास आजही ग्रामीण भागातील शेतकरी बांधतो. मुंग्याच्या वारूळाचे मुख कसे आहे, कोणत्या दिशेला आहे यावरही पाऊसमान वर्तवणारे लोक आजही ग्रामीण भागात आहेत. मात्र, आधुनिक शास्त्र यावर विसंबून न राहता, उन्हाळय़ात वाढलेले तापमान, वाऱ्याचा वेग आणि दिशा यावर अंदाज वर्तवत असते. अलीकडच्या काळात हवामान खात्याने वर्तवलेले वादळाचे आणि पावसाचे अंदाज खरे ठरल्याने यावर शेतकरीही विसंबून राहू लागला आहे. गुढी पाडव्यावेळी गावोगावी पारकट्टा, ग्रामपंचायती इमारतीपुढील मैदान याठिकाणी सामूहिक पंचांगवाचन झाले. गावातील मानकरी यांच्या हस्ते पंचांगाचे पूजन केल्यानंतर गावच्या भटजीकडून हे पंचांग वाचन करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आधुनिक युगातही चालू आहे. जमलेल्या शेतकऱ्यांना गूळ, खोबरे, कडूलिंबाचा पाल, हरभरा डाळीचे भिजावणे याचे मिश्रण असलेला प्रसाद दिल्यानंतर या पंचांगातील पावसाचा अंदाज सांगितला जातो. यंदाच्या हंगामामध्ये मृग, आद्र्रा, पूर्वा आणि उत्तरा ही चार नक्षत्रे समाधानकारक पावसाची सांगण्यात आली आहेत, तर पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, हस्त आणि चित्रा ही नक्षत्रे कमी पावसाची असल्याचे सांगण्यात आले. पर्जन्यमान कमी अधिक समजण्यासाठी त्या नक्षत्राचे वाहन कोणते हे पाहिले जाते. यंदाचे मृग नक्षत्र आठ जूनला सुरू होत असून याचे वाहन गाढव आहे. तर मृगानंतर येणाऱ्या आद्र्रा या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. या दोन नक्षत्रामध्येच खरिपाची पेरणी करणे फायदेशीर ठरते आणि वक्तशीरही आहे. यामुळे खरिपाचा पेरा घातीला साधेल असे सांगण्यात आले. तर यानंतर येणारी नक्षत्रे आणि त्यांचे वाहन पुढीलप्रमाणे पुनर्वसू (तरणा) -उंदीर, पुष्य (म्हातारा)- कोल्हा, आश्लेषा (आसळका) - मोर, मघा (सासू - घोडा, पूर्वा (सून) - मेंढा, उत्तरा (रब्बी)- गाढव आणि हस्त (हत्ती)- उंदीर. मेंढा, गाढव, हत्ती हे वाहन असेल तर पाऊसमान चांगले समजले जाते. तर मोर वाहन असेल तर पाऊस केवळ नर्तन करणारा ठरू शकतो. घोडा जसा उधळतो तसा पाऊसही उधळू शकतो. आणि कोल्हा जसा कोल्हेकुई करून फसवणूक करतो तसे वाहन असलेल्या नक्षत्राचा पाऊस केवळ हुलकावणी देण्याचे काम करतो असा समज आहे. येत्या हंगामात मृग, आद्र्रा या दोन नक्षत्रांचा पाऊस समाधानकारक असून रब्बी हंगामासाठी महत्त्वाचे असलेले नक्षत्र उत्तरा असून या नक्षत्राचे वाहन गाढव असल्याने चांगला पाऊस होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. अन्य नक्षत्रांमध्ये पाऊस पडेल मात्र तो खंडित स्वरूपाचा असेल. आसळका नक्षत्रापर्यंतचा पाऊस हा पश्चिमेकडील वाऱ्यामुळे होतो, तर अन्य नक्षत्रांचे पाऊस हे पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे होतात. यालाच परतीचा पाऊस असेही संबोधले जाते. यामुळे हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरतो. पश्चिम घाट परिसरात प्रामुख्याने अरबी समुद्रावरून म्हणजेच पश्चिम दिशेने येणाऱ्या ढगाद्वारे पाऊस पडतो, तर परतीचा पाऊस हा बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याने येतो. याशिवाय रोहिणी, चित्रा आणि स्वाती ही नक्षत्रेही आहेत. यापैकी रोहिणी नक्षत्राचा पाऊस उन्हाळी अथवा मान्सूनपूर्व पाऊस म्हणून ओळखला जातो. या पावसाने नांगरटीच्या रानात पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जात असल्याने याचा विचार प्राधान्याने केला नाही. तर चित्रा आणि स्वाती या दोन नक्षत्रांचा पाऊस बेभरवशाचा असून त्याचा पिकांना उपयोग तर होतच नाही, मात्र नुकसानकारक ठरू शकतो. थंडीचा हंगाम याचवेळी सुरू होत असल्याने रब्बी पिकांना पोषक हवामान यावेळी तयार झालेले असते.