रझिया पटेल

महात्मा गांधी यांच्या कृतिशील चिंतनातून स्त्री-स्वातंत्र्याचा विचार पुढे जाण्याच्या दिशा मिळतात; त्यांचा हा पुनशरेध..

‘सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समतेचे आहे. अशा काळात स्त्रीवर्गाला अपमानास्पद होणारा भेदभाव करणे हे काळाशी सुसंगत नाही. मुलगा जन्मला म्हणजे हर्षांने बेहोश व्हावे आणि मुलगी जन्मली म्हणजे शोक करीत बसावे याचे कारण काही माझ्या ध्यानात येत नाही. दोन्ही ईश्वराची देणगी होत. दोघांनाही जगण्याचा सारखाच हक्क आहे आणि जगाची रहाटी चालू ठेवण्यासाठी दोघांचीही सारखीच गरज आहे.’

‘पुत्राइतकाच वारसाहक्क कन्येला मिळावा’

‘पतीची कमाई ही पती-पत्नीची सामाईक जिंदगी होय. कारण घरकाम करून पत्नी पतीला द्रव्यार्जनात मदत करीत असते.’

‘स्त्री-पुरुषांच्या वेतनात विषमता असू नये.’

‘पुरुषाचे स्त्रीवरील प्रभुत्व संपुष्टात आले पाहिजे.’

वरील वाक्ये वाचताना हा स्त्री मुक्तीवादी संघटनेने धरलेला आग्रह आहे वा युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जाहीरनाम्यातील घोषणा आहेत, असे वाटेल. परंतु वरील सर्व विधाने महात्मा गांधीजींची आहेत आणि युनोच्या जाहीरनाम्यांमध्ये ती अलीकडील काळात आली आहेत.

गांधीजी स्त्रियांना चूल आणि मूल इतक्यापुरतेच मर्यादित ठेवू इच्छित होते, स्त्रियांची पारंपरिक भूमिकाच गांधींना अपेक्षित होती, अशा प्रकारची टीका गांधीजींवर काही लोकांनी केली आहे. ती गांधीजींचा स्त्री-पुरुष समताविषयक विचार नीट समजून न घेता केली आहे, असे लक्षात येते.  दुसरे म्हणजे गांधीविचार समजून घेताना गांधींच्या ‘कालच्या भूमिकेऐवजी आजची भूमिका समजून घेणे’ आवश्यक असते. कारण गांधीविचार हा निरंतर सत्याचा शोध आहे. तो सतत उत्क्रांत होत गेलेला विचार आहे. तिसरे म्हणजे गांधीजी जी भाषा वापरतात ती काहीशी पारंपरिक वाटली तरी त्यातला संदेश अतिशय क्रांतिकारक आहे. मात्र त्यांनी मांडलेला स्त्री-स्वातंत्र्याचा विचार आज दुर्लक्षित राहिल्याचे दिसते आहे.

स्त्रियांच्या समाजातील हीन आणि दुय्यम स्थानाच्या बाबतीत गांधीजी म्हणतात की, रूढी आणि कायदे बघता स्त्रियांचा दर्जा सर्वत्र हीन आहे आणि तो आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. तत्कालीन शारदा बिलाला होणाऱ्या विरोधाबाबत त्यांनी ‘स्त्रीवर्गाच्या हक्कांच्या बाबतीत मी कसलीही तडजोड करायला केव्हाही तयार नाही’ अशी स्पष्ट भूमिका घेतली होती.

बालविवाह, हुंडापद्धती, पडदापद्धती या अंतिमत: स्त्रीविरोधी रूढी आहेत म्हणून त्या समाजासाठीही पोषक नाहीत, असे ते म्हणतात. अतिशय महत्त्वाचे म्हणजे ‘कोणतीही गोष्ट प्राचीन आहे म्हणून ती चांगली आहे, असे मी मानत नाही. पुराण परंपरेपायी आपण आपली ईश्वरदत्त तर्कशक्ती गहाण टाकावी, असा मी आग्रह धरत नाही. कोणतीही रूढी कितीही जुनीपुराणी असली तरी नीतितत्त्वाशी तिचा विरोध असेल तर भूतलावरून उच्चाटन होण्यास ती पात्र आहे’ अशी परखड आणि नि:संदिग्ध भूमिका गांधीजी घेतात.

हुंडा प्रथेचा व जात-बंदिस्तीचा संबंध स्पष्ट करून त्यासाठी आंतरजातीय विवाह हाच उपाय असल्याचे गांधीजी सांगतात. जोपर्यंत एका विशिष्ट जाती समूहातील तरुण-तरुणींमधूनच निवड करायची आहे तोवर हुंडापद्धतीला आधार राहील, असे ते म्हणतात. विवाह ही वैयक्तिक बाब असली तरी आंतरजातीय विवाहांना बंदी करता कामा नये. ‘ज्या विवाहातील एक पक्ष हरिजन नसेल त्या लग्नाला हजर राहायचे नाही किंवा आशीर्वाद द्यायचा नाही, हे मी यापूर्वीच ठरवले आहे आणि तसा नियम केला आहे’ असे ते नमूद करतात.

स्त्री-स्वातंत्र्याचा विचार गांधीजींनी समग्र परिवर्तनाशी जोडला आहे, असे दिसून येते. त्यासाठी ‘सुशिक्षित भारतीय महिलांनी या विषमतेच्या मूळ कारणांचाच विचार केला पाहिजे,’ असे ते सुचवतात. तर दुसरीकडे पुरुषांमध्ये असलेली स्त्रीविषयी प्रभुत्वाची, स्वामित्वाची असलेली भावना नाहीशी होऊन स्त्रिया या आपल्या मित्र आणि सहकारी आहेत, ही भावना वाढीस लागली पाहिजे. पुरुषाने स्त्रीवर जे अन्याय केले आहेत, ते बघून मी क्षुब्ध होतो. ‘स्त्री आणि पुरुष एकच आहेत, म्हणून त्यांचे प्रश्न वेगवेगळे असता कामा नयेत, तेही एकच असले पाहिजेत,’ हा स्त्री-पुरुष समतेकडे नेणारा मार्ग ते सांगतात.

दक्षिण आफ्रिकेतील लढय़ात स्त्रियांच्या निर्भय सहभागाचा मोठाच प्रभाव गांधीजींवर पडला. त्यानंतर भारतात परतल्यावर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महिला मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाल्या, त्या ‘सार्वजनिक, राजकीय जीवनात स्त्रियांचा सहभाग असणे आवश्यक आहे’ या गांधीजींच्या भूमिकेमुळे. या चळवळीतून सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, अवंतिकाबाई गोखले, दुर्गाबाई देशमुख, उषा मेहता, अरुणा असफअली, राजकुमारी अमृतकौर, बीबी अमतुस्सलाम अशा किती तरी महिला नेतृत्वस्थानी आल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संविधान समितीतही १५ महिलांचा समावेश होता. या साऱ्या महिला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेल्या होत्या.

हे असले तरी ही एका भीषण समस्येची जाणीव गांधीजींना होती, ती म्हणजे वाढती धर्माधता आणि जातीयता याची मोठी किंमत स्त्रिया चुकवतात याची. गेल्या दोन दशकांत भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दंगली मग ते मुंबई असो, गुजरात की मुजफ्फरनगर, आपण बघतो आहोत की स्त्रियांवर दंगलींचे भीषण आघात झालेले आहेत. त्याही पुढचं आव्हान म्हणजे काही ठिकाणी दंगलीमध्ये स्त्रियांच्या सहभागाची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या पाश्र्वभूमीवर देशाच्या फाळणीच्या काळात हिंदू-मुस्लीम स्त्रियांवर झालेल्या अत्याचारासंबंधी स्त्रियांशी बोलताना गांधीजी म्हणाले, ‘सध्याच्या जातीय हलकल्लोळात स्त्री समाजाला ज्या यातना सोसाव्या लागत आहेत त्यामुळे माझे अंत:करण पिळवटून जाते, पण तुम्हाला सोसाव्या लागणाऱ्या अत्याचारांच्या दोषारोपापासून तुम्हीही मुक्त नाही. माता, पत्नी, भगिनी म्हणून तुम्ही आपल्या पुरुष मंडळींवर दडपण टाकले असते तर जी लाजिरवाणी कृत्ये घडली ती टळणे शक्य होते. आपल्या प्रिय माणसांना आपण घराबाहेर जी अनैतिक कृत्ये करण्यास प्रोत्साहन दिले तीच कृत्ये ते आपले प्रियजन आपल्या घरीच आपल्याशी व्यवहार करताना करतील, हे त्यांनी ध्यानात ठेवावे.’ गांधीजींचे हे सर्व विचार आणि संवाद ऐकताना गांधीजी जणू आजच्या काळातील स्त्रियांच्या समस्यांबद्दलच बोलत आहेत, असे जाणवत राहते आणि म्हणून ते महत्त्वाचे ठरते.

समाजातील स्त्री-पुरुष विषमता व अन्याय नष्ट करण्याचा एक उपाय गांधीजींनी सुचवला, त्याकडे देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात कधीही गंभीरपणे पाहिले गेले नाही वा अमलात आणला गेला नाही. ‘आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये भारतातील समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुष संबंध कसे असतात, एकंदर समाजामध्ये स्त्रीचे स्थान काय आहे याचा विचार केला गेलेला नाही,’ असे ते नमूद करतात. शिक्षणात हा विचार येणे गांधीजींना महत्त्वाचे वाटत होते. नई तालीमचा विचार देणाऱ्या गांधीजींनी प्राथमिक शिक्षणासाठी एक बालपोथी तयार केली होती, जी आज अडगळीत  गेली असेल; पण स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आई आणि मुलांच्या संवादरूपात असलेल्या या बालपोथीत एक पाठ ‘घरकाम’ या विषयावर आहे. मुलगा म्हणतो- ‘ताई तर मुलगी आहे. मुलाने खेळायचे आणि शिकायचे.’ ताई म्हणते, ‘आम्हाला नसते वाटते खेळायचे नि शिकायचे?’ मुलगा म्हणतो, ‘मी थोडाच नको म्हणतोय, पण त्याबरोबरही कामही करायचे’. आई म्हणते, ‘आणि मुलाने काम करायचे नाही? जितकी गरज घरकाम शिकण्याची ताईला आहे, तितकीच तुलाही आहे.’ लक्षात घ्या, १९२२ मध्ये गांधीजींनी ही बालपोथी लिहिली आहे आणि आजतागायत स्त्री-पुरुष समतेचा विचार शिक्षणातून रुजवण्याचा ठोस प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत नाही.

शेवटी गांधीजींनी स्त्रियांच्या संदर्भात असा विश्वास व्यक्त केला होता की, ‘स्त्री त्याग आणि शांतीची मूर्ती आहे आणि युद्धसंस्था नष्ट करून जगात शांतता निर्माण करण्याचे सामर्थ्य तिच्याच अंगी आहे.’ गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहात स्त्रियांच्या सहभागातून त्यांचा हा विश्वास दृढ झाला होता आणि त्यांचा हा विश्वास अनाठायी नव्हता याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे पुलावामा येथील दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर काही वर्तमानपत्रांमध्ये काही वीरमाता आणि वीरपत्नींनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या अंतर्मुख करणाऱ्या आहेत. या महिला म्हणतात, ‘भारत आणि पाकिस्तान ही एकाच घरातील दोन भावंडे. काही कारणाने घर फुटलं आणि दोन भाऊ वेगळे झाले. आता धाकटय़ा भावाने कुरापती थांबवून गुण्यागोविंदाने नांदावं.’ सारखा शत्रुत्वाचा घोष आणि युद्धाचे वातावरण या पाश्र्वभूमीवर या वीरमाता काय म्हणत आहेत ते ऐकणं महत्त्वाचं आहे. त्यांची भाषा महत्त्वाची आहे. ‘युद्ध नको, शांतता हवी. दोन देशांमधील प्रश्न संवादाने सुटावेत,’ अशी भावना पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव दलाच्या बबलू संतरा यांच्या पत्नीने व्यक्त केली. पण चिंतेची बाब अशी आहे की, या शहीद वीरपत्नीने घेतलेल्या युद्धविरोधी भूमिकेवरदेखील टीका झाली. तिकडे पाकिस्तानातही युद्धाच्या विरोधात आणि शांततेची मागणी करणारे मोर्चे आणि सभा यांत तेथील स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर सहभागी आहेत. शांततेची वैश्विक भूमिकाच या स्त्रिया मांडीत आहेत. शांततेच्या त्या प्रतिनिधी आहेत. एका अर्थाने गांधीजींनी स्त्रियांवर दाखवलेला विश्वास सार्थ होताना दिसतो आहे.

८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या संदर्भाने आज गांधीजींची आठवण आणि त्यांच्या विचारांचे जागरण किती अपरिहार्य आहे, याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे.

लेखिका स्त्री-सबलीकरणाच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यां  आहेत. ईमेल:

raziap@gmail.com