समकालीन कलेत जनकला किंवा समूहाबरोबर एकत्रितपणे केलेली कलानिर्मिती या कलाप्रकारांनी वेगळं स्थान कलाजगतात निर्माण केलं आहे. त्याचे अनेक आयाम आज कलाकारांच्या कामातून, चिंतनातून आणि लिखाणातून उलगडताना दिसत आहेत. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात या प्रकारचं काम नवजोत अल्ताफ यांनी सुरू केलं. त्यासाठी त्यांची तेव्हाची सामाजिक परिस्थिती आणि त्यांची राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक पाश्र्वभूमीही कारणीभूत होती.

१९७० च्या दशकात सामाजिक चळवळींनी जोर धरलेला असताना नवजोत यांचे डाव्या विचारांच्या प्रोग्रेसिव्ह युथ मूव्हमेंटशी अगदी जवळिकीचे संबंध होते. ‘प्रोयोम’मधल्या कार्यकर्त्यांच्या सहवासामुळे नवजोतच्या जडणघडणीत रशियन लेखक, कलाकार, तिथल्या कलाचळवळी यांचाही सहभाग होता. या गटामार्फत केल्या गेलेल्या सामाजिक-सांस्कृतिक कामांत त्यांनी सहभाग घेतला. स्टडी सर्कल, ७२ मध्ये दुष्काळग्रस्तांसाठी काम असो, ‘ललकार’सारख्या नियतकालिकासाठी रेखाटनं वा पोस्टर्स बनवणं असो, तेच त्यांच्या चित्रातही उमटत होतं. त्यांची चित्रं कामगारवर्गीय जाणिवेतून आकाराला येत होती. कधी त्यात थेटपणा होता. उदाहरणार्थ, ‘रेड हॅण्ड’मधली वळलेली मूठ ही कामगारवर्गाच्या लढय़ाचं आणि जागृतावस्थेचं प्रतीक बनली. ‘अवर लीडर’मध्ये गांधी टोपी घातलेला नेता एका कामगाराला वेटोळं घालून त्याचं रक्त आणि ताकद शोषून घेतो. याउलट, कधी या चित्रणात तरलपणाही होता, सूक्ष्मात जाऊन पाहाणं होतं. ‘अ ब्रेक फ्रॉम इनसाइड’मध्ये नेहमीचा शोषित कामगार दिसत नाही. कॅनव्हासभर चकाकदार लाल रंग पसरलेला दिसतो आणि त्यातून गप्पा मारणाऱ्या कामगारांच्या धूसर आकृत्या वर येतात. त्या स्वप्नवत वाटणाऱ्या अवकाशात एका कामगाराला पंखही फुटलेले दिसतात. ‘स्क्वीझ्ड’ या चित्रात पसरलेल्या काटेरी दोऱ्या किंवा वेली माणसाला वेढून टाकतात, तो ताकद पणाला लावून त्यातून सुटका करू पाहतो, ही आणीबाणीवर भाष्य करणारी रेखाटनं १९७७ मध्ये त्यांनी काढली. त्या काळातल्या त्यांच्या चित्र-वृत्ती आणि प्रवृत्ती त्यांच्या समकालीन सुधीर पटवर्धन, विवान सुंदरमसारख्या कलाकारांशी मिळत्याजुळत्या होत्या. पण गीता कपूर आणि विवान सुंदरम यांच्या पुढाकारातून आकाराला आलेल्या कसौली आर्ट सेंटर किंवा प्लेस फॉर पीपल हे प्रदर्शन यांसारख्या गोष्टींतून मात्र त्यांना बरेचदा बाजूला ठेवलं गेलं. डाव्या विचारसरणीतल्या प्रवाहांमध्ये असलेल्या मतभेदांचं ते प्रतििबब होतं.

१९९० च्या दशकात कला क्षेत्रात जोरदार बदल होऊ लागले. माध्यमं, आशय, आवाका, अर्थव्यवस्था सगळंच पालटलं. या काळात कलासंग्राहक आणि कलादालनांनी काही उपक्रमही घेतले. नवीन तंत्राची ओळख आणि कलाकारांचा सहयोग अशा दोन्ही गोष्टी यात अनुस्यूत होत्या. यातला एक उपक्रम होता ‘सर्किलग द स्क्वेअर’. दृश्य कलाकार आणि कारागीर यांनी एकत्र येऊन शिल्पं बनवावीत ही यामागची कल्पना. पण त्यानिमित्ताने समाजात मुळातच अस्तित्वात असलेला नात्यातला असमतोल प्रखरपणे पुढे आला. कलाकारांनी सूचना द्यायच्या व त्याप्रमाणे कारागिरांनी कलाकृती उभी करायची अशी सुटसुटीत प्रक्रिया झाली. त्यात ना कुठला संवाद होता, ना देवाणघेवाण. नवजोत मात्र यामुळे कमालीच्या निराश झाल्या. या प्रकारच्या उतरंड असलेल्या रचनेला प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केली. कला क्षेत्रात अशा प्रकारचे प्रश्न उभे करणाऱ्या त्या अगदी मोजक्याच कलाकारांपकी असाव्यात. यातूनच पुढच्या काळात बस्तरच्या आदिवासी भागात ‘डायलॉग’ या प्रकल्पाची उभारणी झाली.

सामाजिक न्यायाची बाजू उचलून धरणाऱ्या नवजोत म्हणतात की, ‘कलाकार म्हणून काम सुरू केलं अगदी तेव्हापासून मी कायमच सामाजिक प्रश्न हाताळणारी किंवा सामाजिक आशय असलेली कलानिर्मिती करीत आलीय. सीमांतीकरण झालेल्या समाजातील घटकांचा राजकीय व सामाजिक संघर्ष आणि त्यातली व्यामिश्रता माझ्या कलाकृतीतून टिपणं, हे माझ्या त्या विषयातील रुची आणि बांधिलकी यातूनच घडत गेलंय.’ हे त्यांनी मुंबई-दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमध्ये प्रदíशत केलेल्या स्त्रीवादी भूमिकेतून बनवलेल्या त्यांच्या विविध मांडणी-शिल्पांतून दिसून येतंच. ठरावीक साच्यात न अडकता त्यांच्या कलाविष्कारासाठी त्यांनी वापरलेली माध्यमांची वैविध्यता हे त्यांचं वैशिष्टय़. चित्रकलेपासून मांडणीशिल्पाकडे त्यांचा प्रवास याच भूमिकेतून सुरू झाला. समाजातल्या शोषित, दुर्लक्षित घटकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या कलावस्तू होत्या. हे भान जपत त्यांनी कलानिर्मिती केली असली तरी ती कुठेही प्रचारकी थाटाची होत नाही. ‘बिट्वीन मेमरी अ‍ॅण्ड हिस्टरी’ या मांडणीशिल्पात त्या फाळणी, दंगली, हॉलोकास्ट यातून भोगाव्या लागलेल्या वेदनांच्या संदर्भात भाष्य करतात. त्यात विसरणंही असतं आणि ते बरेचदा प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक असतं. त्या क्लेशदायी आठवणींना दाबून टाकणं असतं. यात अर्धचंद्राकार जाळीदार भतीवर हजारो चिठ्ठय़ा बांधलेल्या दिसतात. प्रेक्षक त्या चिठ्ठय़ा उघडून वाचू शकतात. त्यावर ‘माझ्या आईने मला काही सांगितलं नाही आणि आम्ही मुलांनीही तिला काही विचारलं नाही’ किंवा ‘माझ्याव्यतिरिक्त ‘इतर’ कुणाला तरी मी कसं जाणून घ्यायचं आणि जो भूतकाळ मी जगलेच नाही तो कसा समजून घ्यायचा?’ यांसारखी वाक्यं वाचायला मिळतात. या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असणं आणि त्यांच्या अनुभवातून इतरांनी त्याचे साक्षीदार बनणं यात नेमकं काय घडतं, हेही त्या शोधू पाहतात. या चिठ्ठय़ांच्या गाठी सोडवणं म्हणजे इतिहासाच्या अवघड गाठी सोडवणंच जणू असंही त्या सुचवू पाहतात. अर्थात, अनेकदा दग्र्याच्या भतीची आठवण करून देणाऱ्या या गाठींच्या प्रतीकातून एक प्रकारचा आशावादही जाणवतो.

त्यांनी बस्तर भागात केलेल्या स्थान-सापेक्ष आणि लोकसहभागातून पार पाडलेल्या कला प्रकल्पांमधून हे स्पष्टपणे दिसून येतं. त्याची सुरुवात जरी आदिवासी कलाकार आणि लहान मुलांसाठीच्या कार्यशाळांमधून झाली असली तरी पुढे हा संवाद वाढत गेला. आदिवासी कारागीर आणि कलाकार यांच्या सहयोगातून त्यांनी अनेक शिल्पंदेखील तयार केली. आदिवासी स्त्रिया, तिथले कलाकार, पंचायत यांना एकत्र आणून शासनाकडून दुर्लक्षिले गेलेले प्रश्न हाताळताना ‘नल पार’ आणि ‘पिलागुडी’ हे दोन प्रकल्प हाती घेतले. ‘नल पार’मध्ये त्यांनी आदिवासी संस्कृतीतली प्रतीकं, चिन्हं आणि प्रतिमा वापरून पाणी भरण्याकरिता हातपंपाची आखणी आणि बांधणी केली. पिलागुडी ही ‘गोटुल’च्या धर्तीवर उभारलेली वास्तू मुला-मुलींसाठी कृती-आधारित कार्यक्रम घेण्यासाठी वापरली जातेय. अर्थात, हे सगळं इतकं सोपंही नव्हतं. गावातल्या रूढी व प्रथांना त्यांना विरोध करावा लागला. बायकांना चेटकीण ठरवून बेदखल करायचं किंवा मारून टाकायचं हे सर्रास चालत होतं. गावातल्या लोकांचा इतर कामांत पािठबा असला तरी यात मात्र असायचाच असं नाही. याला प्रतिक्रिया म्हणून ‘इन रिस्पॉन्स टू’ या मांडणीशिल्पाची निर्मिती १९९८ मध्ये झाली. ‘चेटकिणीं’ना मारण्याच्या या प्रथेवरचा संशोधन निबंध त्यांनी संदर्भ म्हणून वापरला व त्याचा वापर मांडणीशिल्पात केला. या निबंधांची गुंडाळी सरकवलेला पाइप त्यांच्या नेहमीच्या शैलीतील गडद निळ्या रंगाच्या बाईच्या शिल्पाच्या हातामध्ये दिला. एकीकडे यात ज्ञानाचं वर्चस्व अधोरेखित होत होतं तर दुसरीकडे त्याच ज्ञानातून उमलणारी मुक्तीची जाणीव!

पर्यायी स्थळं निवडून सांस्कृतिक भान, काही सामाजिक गटांचं सीमांतीकरण, संवाद, सहयोग, वाटाघाटी, प्रतिरूपणातील समस्या, व्यक्तिकेंद्रित कला विरुद्ध समुदायातून उभी राहणारी कला यावर ऊहापोह करीत त्यातले विरोधाभास शोधत नवजोत यांचा कलाव्यवहार आकाराला आला. स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचे अधिकारी, पोलीस, शासन यांच्या परवानग्या मिळण्यावर (किंवा घेण्या- न घेण्यावर!) आणि स्थानिक नेते, रहिवासी यांचा सहयोग किंवा विरोध यावर या प्रकल्पांतून काय निष्पन्न होणार ते ठरतं. त्यातून मार्ग काढत नवजोतसारखे कलेचं सामाजिक भान असलेले असे कलाकार कलानिर्मितीच्या जुन्या चौकटी मोडून कलेच्या नव्या व्याख्या, संकल्पना आणि प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रिया घडवताना दिसतात.

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत. ईमेल:

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com