नाईकांच्या वेगाने खपणाऱ्या बंदुकबाज नायकांपेक्षा शब्दवेधी या नायकाचे वेगळेपण हे त्याच्या धनुर्धारी कौशल्यात होते. या कादंबऱ्यांत बंदुक जवळपास हद्दपार आहे. काळ हा बहुदा इंग्रज भारतात आले तेव्हाचा आहे. पण गोलंदाजाच्याही शे-दीडशे वर्षे आधी जी राजेशाही भारतात होती, तेव्हाचे सारे जगणे आहे. गुजरात, वडोदरे, सुरत हा भौगोलिक परिसर यात येतो. वडोदराच्या राजाचे मांडलिकत्व झुगारणाऱ्या राजपिपलाच्या राजघराण्याचा सूरज हा इथला नायक. धनुष्यनिपुण आणि राजपिपलाच्या भवतालच्या परिसराचे रक्षण करणारा.  मजबूत भिल्लांची आवाढव्य फौज असल्याने त्याच्या राज्याकडे फिरकण्याची चोर-दरोडेखोरच नाही, तर दुसऱ्या सरदारांचीही हिंमत होत नाही. ज्याची हिंमत होते, त्याला यमसदनी पाठविण्यासाठी राजपिपलामधील प्रत्येक सैनिक आतुर असतो. 

नाईकांचा सागर सदानंद प्रकाशनाद्वारे झळकला आणि गुरुनाथ-शिलेदार प्रकाशन काळात बहरला. जीवन सावरकर ऊर्फ सागर हा या कथेचा नायक. समुद्र मार्गावरून होणारी दांडचोरी म्हणजेच तस्करी हा एकमेव अवैध उद्योग उलटून लावणे, समुद्री चाच्यांचा खात्मा करणे आणि देशात समुद्रामार्गे होणारे परकीय आक्रमण थोपवणे हा सागरचा दुय्यम छंद. कारण जमीनीवर त्याचा प्रचंड मोठा उद्योग असल्याने तो त्याचा जगण्याचा प्रमुख आधार. पण सागरसाहसांशिवाय त्याला चैन पडत नाही. आपली सागरकन्या पाणबुडी समुद्रात लोटून तो पोलीस आणि नौदलाला छुपी मदत करतो.

धुरंदर लिमये हा नाईकांचा स्कॉटलंड यार्डमधून प्रशिक्षण घेतलेला प्रशिक्षित डिटेक्टिव्ह. प्रशिक्षण घेऊन तो मुंबईत डिटेक्टिव्ह एजन्सी काढतो. विमान मार्गाने होणारी तस्करी ही सत्तरच्या दशकात फार नवी बाब होती. कोटातून, बॅगेतून हीरे, सोने, मौल्यवान वस्तू विविध राष्ट्रांतून आणल्या जात. परदेशातून भारतात अत्यंत चलाखीने आणल्या जाणाऱ्या या वस्तूंपैकी फारच थोड्या कस्टमच्या हाती लागत. धुरंदर कथांमध्ये तस्करीत अडकलेल्या किंवा तस्करांनी अडकविलेल्या अनेक भोळ्या-भाबड्या व्यक्ती येतात. त्यांना सोडविण्याचे काम धुरंदर करतो. गाड्यांचा पाठलाग, तस्करांचे अड्डे आणि आंतरराष्ट्रीय स्मगलर्सचा मुंबईतील धुमाकूळ असलेल्या या कथा रंजक असल्या तरी नाईकांच्या मुख्य हिरोंइतक्या गाजल्या नाहीत.  नाईकांनी  विजय खेर हा भूतांना पाणी पाजणारा संशोधक तयार केला.  शिवकाळात आजच्या तोडीची हेरगिरी करताना दाखविल्या जाणाऱ्या ‘बहिर्जी’ कथा स्वराज्यावर घाला घालू पाहणाऱ्या दुष्मनांचा बिमोड करीत वाचकांमध्ये स्फूरण चढविण्याची कामगिरी करतात.

याशिवाय इंटरपोलमधून निवृत्ती स्वीकारून खासगी डिटेक्टिव्ह एजन्सी काढून गुन्ह्यांची उकल करणाऱ्या रंजन बॅनर्जी या नायकाची रंजन कथा आणि इंटरपोलमधील वातावरणाची ओळख करून देत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या मुसक्या बांधणाऱ्या इंटरपोल कथा असा नाईकांचा कुणाही वाचकाला दमवून टाकणारा लेखनप्रवास आहे.