दयानंद लिपारे

‘अवनि’ म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. बालकामगार, बाल भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन हे संस्थेचे मुख्य काम. संस्थेने आतापर्यंत १२ हजारांहून अधिक मुलांना शिक्षणगंगेत सामावून घेतले आहे. आता उपेक्षित महिलांच्या विकासापर्यंत ‘अवनि’ने कार्यविस्तार केला आह़े   या सर्वाच्या उन्नतीचा ध्यास घेतलेल्या या संस्थेला बळ देण्याची गरज आहे.

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी

बालपणी कमालीचे दारिद्रय़..  पण शिक्षणाचा प्रकाश दारिद्रय़ाच्या अंधाराला भेदून प्रगतीचा मार्ग खुला करतो,  याची पक्की जाण.. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत अनुराधा भोसले यांनी समाजकार्याची पदवी घेतली. काही शहरांत नोकरीच्या अनेक संधीही चालून आल्या. पण,  वंचित, शालाबा मुलांच्या कल्याणाची आंतरिक ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांना कोल्हापुरात निश्चित कामाची दिशा मिळाली.  आताचे ‘अवनि’ या सेवाभावी संस्थेचे स्वरूप हे त्यांच्या चार दशकांच्या प्रयत्नांचे फळ.  एका मर्यादित स्वरूपात काम करून वंचितांच्या विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत आणि त्यांच्या प्रगतीचे ध्येय साध्य होणार नाही, हे भोसले यांनी जाणले होते. सर्व शाळाबा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य आहे, या सत्याची लोकांना प्रचीती आल्यानंतर हळूहळू या कार्याची व्याप्ती वाढवण्यात आली. आता संस्थेने राज्यभरात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा ध्यास घेतला आहे.

अनुराधा भोसले मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत गरीब अशा ख्रिस्ती कुटुंबातील. घरात शब्दश: डझनभर भावंडे. त्यात अनुराधा यांचा क्रमांक अकरावा. दोन-चार घरची धुणी-भांडी उरकून शाळा शिकायची हा त्यांचा शालेय वयातला शिरस्ता. श्रीरामपूरमध्ये बारावीचे शिक्षण घेत असताना त्यांना शौचालयाच्या साफसफाईचे काम करावे लागले. मुंबईत ‘निर्मला निकेतन’मध्ये आश्रय मिळाल्यानंतर त्यांनी समाजकार्याची पदवी प्राप्त केली आणि पुणे, जळगाव, औरंगाबाद येथे नोकरी केली. पण, त्यांचे मन नोकरीत रमत नव्हत़े  विवेक पंडित यांनी ‘श्रमजीवी संस्थे’द्वारे केलेल्या कामापासून प्रेरणा घेऊन अनुराधा यांनी बालकांच्या उत्कर्षांसाठी काम करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. तिथेही प्रारंभी अवहेलनाच वाटय़ाला आली. आंतरजातीय विवाह केल्यानंतर दहा वर्षांचा संसार सुखाचा झाला. पण, नंतर त्यांना वेगळी वाट धरावी लागली.

सांगली जिल्ह्यत वेरळा विकास प्रकल्पाचे काम प्रा. अरुण चव्हाण आणि सहकाऱ्यांनी आरंभले होते. १९९४ साली त्यांनी ‘अवनि’ संस्थेची स्थापना केली. अनुराधा यांनी या संस्थेत नोकरी स्वीकारली. कामाचा झपाटा पाहून चव्हाण यांनी त्यांना कोल्हापुरात स्वतंत्रपणे काम सुरू करण्याचा सल्ला दिला. १९९७ च्या ऑक्टोबरमध्ये ‘अवनि’च्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत मिळाली तेव्हा अनुराधा भोसले यांच्या सामाजिक कार्याचे खऱ्या अर्थाने बीजारोपण झाले. त्यांनी कामात अक्षरश: झोकून दिले. पण ‘नवऱ्याला टाकून आलेली’ असे टोमणे पिच्छा सोडत नव्हते. त्रस्त अनुराधांनी समाजकार्य सोडण्याचा विचार बोलून दाखवल्यावर ज्येष्ठ कामगार नेते गोिवद पानसरे, साहित्यिक, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यांची समजूत काढली आणि निराशेपासून परावृत्त केले. त्यानंतर अनुराधा यांनी ‘अनाथांची नाथ’ होण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर कर्नाटक भागांतून कोल्हापूर जिल्ह्यत वीटभट्टी, ऊसतोड, बांधकाम कामगार असे स्थलांतरित मजूर हजारोंच्या संख्येने येतात. ते दिवसभर कामांत गुंतून राहतात. आपल्याबरोबर मुलांनाही हाताखाली कामाला घेतात. त्यांना मिळणाऱ्या चार पैशांची भुरळ पडते. परिणामी शाळेकडे पाठ फिरवली जाते. मालकांनाही कमी मोबदल्यात राबणारी मुले हवी असतात. शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेल्या अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हे मोठे आव्हान होते. त्यासाठी वीटभट्टीवर जाऊन मजुरांना मानसिकदृष्टय़ा तयार करावे लागले. वीटभट्टी मालकांनी विरोध केला. प्रसंगी मारहाणीचे प्रसंग ओढवले. बाल कायद्यातील तरतुदीचा धाक दाखवल्यावर मात्र त्यांचा विरोध मावळू लागला.़ १९९७-९८ साली सर्व शिक्षा अभियानाने जोर धरला होता. ‘अवनि’ने त्यात सहभाग घेऊन शाळा सुरू केल्या. या वेळी एक बाब प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रत्येक शाळाबा मूल बालकामगार असते. त्यामुळे ‘अवनि’ने बालकामगार या शोषणपद्धतीचे उच्चाटन करण्याचा निर्धार केला. व्यापक स्वरूपात विधायक आंदोलनेही केली. ही जबाबदारी शासनाची आहे, याची जाणीव करून देऊन संबंधित यंत्रणेला महिन्यातून किमान दोन धाडसत्रे राबविण्यास भाग पाडले. या संघर्षांतून २००२ मध्ये अनुराधा यांनी वीटभट्टीवरील पहिली शाळा दोनवडे येथे सुरू केली. पुढे एकामागून एक शाळा उभ्या राहिल्या. छोटे खोपटे, पडकी खोली, झाडाखालचा पार अशा ठिकाणी शाळांचा मोडकातोडका संसार सुरू झाला. शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली.

 सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी ‘डे केअर सेंटर’ चालवले जाते. ७ ते १४ वयोगटातील मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात ‘अवनि’ संस्थेतर्फे सध्या ८० ‘डे केअर सेंटर’ चालवले जातात. संस्थेने आतापर्यंत १२ हजारांहून अधिक मुलांना शिक्षणगंगेत सामावून घेतले आहे. बस स्थानके, रेल्वे स्टेशन, हॉटेल, सिग्नल, गर्दीची ठिकाणे, चौपाटी, मंदिरे अशा ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या मुलांना शासकीय यंत्रणांच्या मदतीने सोडवून शाळेत आणले जाते. कचरावेचक कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही ‘अवनि’ हाताळते. अशा कुटुंबात मुलांच्या अभ्यासाकडे पालकांचे पुरेसे लक्ष नसते. अशा वस्त्यांमध्ये अभ्यास वर्ग सुरू करून सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले जाते. या कुटुंबातील मुलांकडे स्मार्ट फोन नसल्याने करोनाकाळात संस्थेने या मुलांसाठी प्रत्येक वस्तीवर कॉम्प्युटर व इंटरनेटची सोय करून अखंडित शिक्षणाची व्यवस्था केली. अवांतर वाचनासाठी संस्थेने फिरते ग्रंथालय सुरू केले आहे. प्रत्येक वस्तीवर पुस्तकांची गाडी पोहोचते.

अनाथ, वंचित मुलींसाठी ‘अवनि’ने बालगृह चालवण्याचा निर्णय घेतला. १८ वर्षांपूर्वी अरुण चव्हाण यांनी देऊ केलेल्या जिवबा नाना पार्क भागात एका छोटेखानी जागेत नवा संसार सुरू झाला. जागा अपुरी पडू लागल्याने सध्याच्या हणबरवाडी येथे संस्थेने एक एकर जागा खरेदी केली. सामान्य लोकांनी मदतीचा हात पुढे केला. वंचित कोवळी पाने फुलू लगली. हणबरवाडी येथे लोकवर्गणीतून इमारत बांधण्यात आली असून, तिथे ४० मुली राहतात. त्यांना निवास, भोजन, शिक्षण व संस्कार तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण आदी परिपूर्ण सुविधा देण्यात आल्या आहेत. किशोरवयीन मुला-मुलींसाठी वस्ती व शालेय स्तरावर लिंगभाव समानता कृती कार्यक्रम राबवला जातो. वर्षांतून दोन वेळा वीटभट्टी, साखर शाळा येथील मुले, कचरावेचक वस्त्यांमधील मुलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाते. कचरावेचक महिलांचे संघटन करण्यात आले आहे. त्यांना कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. या नैसर्गिक खताची मागणी वाढत असून, महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. विधवा, परित्यक्ता महिलांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संस्थेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. आता १० हजार महिलांना या अनुदानाचा लाभ मिळत आहे.

सेवाभावी, सामाजिक संस्था या त्या संस्थेसाठी नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या समर्पणावर उभ्या राहतात.  या समर्पणातूनच वंचितांसाठी आशेचा प्रकाशकिरण दिसतो. ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले, संजय पाटील, जयसिंगराव कदम, स्कॉट कफोरा, डॉ. सूरज पवार, प्रा. डॉ. अर्चना जगतकर, सोहन शिरगावकर, प्रा. ज्ञानदेव माने, प्रा. नंदकुमार साखरे, प्रा. विजय पाटील या पदाधिकाऱ्यांनी प्रतिकूलवर मात करून संस्थेला नावारूपाला आणले आहे. त्यांच्या कामाला बळ देण्याची गरज आहे.  ‘अवनि’च्या कामाचा आवाका पाहता सध्याची इमारत अपुरी पडत आहे. आणखी बांधकाम करण्यासाठी संस्थेची धडपड सुरू आहे. करोना टाळेबंदीनंतर मदतीचा ओघ खूप कमी झाला आहे. अशा स्थितीतही मुलींचे जेवण, कपडे, शिक्षण यात काही कमी राहू दिले जात नाही. नवी इमारत आणि अन्य उपक्रम सुरू करण्यासाठी १ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार आहे. आर्थिक मदतीचा स्रोत आटत असताना खर्च -कामाचा व्याप वाढत आहे. वंचितांघरच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दानशुरांनी मदतीचे हात पुढे करायला हवेत.

अवनि – M/S AVANI

संस्थेपर्यंत कसे जाल?

कोल्हापूरपासून गारगोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, हणबरवाडी येथे संस्थेची इमारत आहे.

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र. 088050109359, (कॉसमॉस बॅंक – कोल्हापूर शाखा)

आयएफएससी कोड : COSB0000088

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय        संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००