|| विद्याधर कुलकर्णी
उत्तम ‘करिअर’ म्हणजे स्पर्धा परीक्षेनंतर मिळणारी शासकीय नोकरी किंवा उत्तम कंपनीत खासगी नोकरी, असा ठाम समज सर्वत्र दिसतो. मग शहरातच राहणे अपरिहार्य ठरते. या पार्श्वभूमीवर वेदपाठशाळांमधील शिक्षण आणि त्या शिक्षणानंतरचे ‘करिअर’ मात्र अगदीच निराळे..
‘आम्हा न कळे ज्ञान
न कळे पुराण
वेदांचे वचन
न कळे आम्हा’
ही पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातून लोकप्रिय झालेली महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत चोखामेळा यांची रचना सर्वश्रुत आहे. आता संगणक आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वेदांचे अध्ययन कोण करीत असेल, असा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. मात्र, एकविसाव्या शतकातही वेदाध्ययनाची परंपरा अखंडित सुरू आहे. एवढेच नव्हे, तर अनेक युवक वेदांचे अध्ययन करण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे. घनपाठी विद्वानांना समाजामध्ये प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळत आहे, हेही वास्तव आहे. आम्हा ‘कळे वेदांचे वचन!’ असेच वेदाध्ययन करणाऱ्यांना अनुभवावयास येते. पौरोहित्य करणाऱ्या मुलांना लग्नाच्या बाजारामध्ये मुलींची नापसंती असते, हे वास्तव आहे. मात्र, बी. ए., बी. कॉम., आणि बी. एस्सी. अशी पदवी संपादन केलेल्या मुलांची तरी कुठे वेळेवर लग्नं होतात, असाही प्रश्न उपस्थित होतोच. अर्थात या परिस्थितीला काही प्रमाणात समाजव्यवस्थाही कारणीभूत आहे.
सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेदांचे अध्ययन करणे हे कितपत योग्य ठरते, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र, वेदपाठशाळांमध्ये आपले पारंपरिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी आसुसलेले विद्यार्थी पाहिल्यानंतर वेदाध्ययनाला चांगले दिवस आले आहेत, असे नक्कीच म्हणावे लागेल. सध्याच्या काळात केवळ पदवी हाताशी असेल तर अर्थार्जन करता येत नाही हे वास्तव ध्यानात घेऊन विद्यार्थी पदव्युत्तर पदवी संपादन करतात. मात्र, इतके शिक्षण घेतल्यानंतर मनाजोगती नोकरी मिळेल याची शाश्वती नसते. नोकरी मिळालीच तर किती काळासाठी ही चिंताही भेडसावत असतेच. कंत्राटी पद्धतीमध्ये दीर्घकाळच्या नोकरीची शक्यता बाद ठरते. ‘या सर्व शक्यतांपासून वेदाध्ययन करणारे विद्यार्थी मुक्त आहेत,’ याकडे वेदपाठशाळांचे चालक लक्ष वेधतात.
वेदपाठशाळांमधील हे शिक्षण अर्थातच इतर शिक्षणासारखे नाही, हेही खरे आहे. हे शिक्षण घ्यायचे तर वेदपाठशाळेतच राहायला लागते. पुण्यनगरीची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळील शताब्दी पार केलेली पुणे वेदपाठशाळा आणि स्थापनेचा अमृतमहोत्सव पार केलेली कोथरूडमधील वेदभवन येथे असलेली वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा या दोन जुन्या वेदपाठशाळा आहेत. पारंपरिक वेदाध्ययन करणाऱ्या आणि याज्ञिकी ज्ञान देणाऱ्या असे वेदपाठशाळांचे दोन प्रकार आहेत. वेदपाठशाळांमध्ये विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने वेदांचे अध्ययन करतात. वयाच्या आठव्या वर्षी सुरू होणारा वेदांचा अभ्यास हा विद्यार्थी किमान २२ व्या वर्षांचा होईपर्यंत पूर्णत्वास जातो. वेदांचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर यापैकी काही विद्वान पुण्यामध्येच वास्तव्य करतात. तर, काही आपल्या मूळ गावी जाऊन वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करतात, असा अनुभव आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जेवढे पैसे लागतात त्यापेक्षाही अधिक धनसंपदा त्यांना या ज्ञानाच्या बळावर लाभते, हेही वास्तव आहे.
याज्ञिकी वेदपाठशाळेमध्ये विवाह, उपनयन (मौजीबंधन), वास्तुशांत, सत्यनारायण महापूजा असे षोडष संस्कार शिकविले जातात. हा अभ्यासक्रमदेखील किमान सात-आठ वर्षांचा आहे. याज्ञिकी पाठशाळेमध्ये अध्ययन करणारे विद्यार्थी नंतर उपजीविकेसाठी पौरोहित्याकडे वळतात. अर्थात, पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना मागणी असल्यामुळे त्यांनाही चांगले उत्पन्न मिळते.
वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजी यांनी वेदपाठशाळा सुरू केली तेव्हा राज्यातील वेदपाठशाळांची संख्या सहा होती. त्यामुळे वेदांचे अध्ययन करण्यासाठी मुलांना पुण्यामध्ये यावे लागत होते, मात्र आता राज्यभरात ७० वेदपाठशाळा झाल्या असल्यामुळे परगावहून होणारे मुलांचे स्थलांतर काही प्रमाणात थांबले आहे. शिक्षण पूर्ण केलेले काही विद्यार्थी पुण्यात वास्तव्य करतात. तर काही विद्यार्थी त्यांच्या गावी जाऊन वेदांचा प्रचार करण्याचे काम करतात. येथून शिक्षण पूर्ण करून गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. अनेकांनी घरे आणि चारचाकी गाडय़ा घेतल्या आहेत, असे घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे वेदाचार्य मोरेश्वर घैसास सांगतात. एक अनुभव त्यांच्याकडून ऐकायला मिळाला. येथील दोन विद्यार्थ्यांना गणेशोत्सवामध्ये जपजाप्य करण्यासाठी दुबईला बोलावण्यात आले होते. चार दिवसांच्या कामाचे त्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये मानधन मिळाले.
पुणे वेदपाठशाळेमध्ये ऋग्वेद आणि कृष्ण यजुर्वेद या दोन शाखांचे शिक्षण दिले जाते. मुंज झाल्यानंतर प्रवेश घेतलेला विद्यार्थी १२ ते १४ वर्षांमध्ये दशग्रंथी घनपाठी विद्वान होतो. वेदांच्या अध्ययनाबरोबरच येथील विद्यार्थ्यांना सरस्वती विद्या मंदिर येथे नववीपर्यंतचे शिक्षणही दिले जाते. आधुनिक जगाबरोबर राहण्यासाठी त्यांना वेदपाठशाळेतच संगणकाचे प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. वेदाध्ययन झाल्यानंतर विद्यार्थी दोन-तीन वर्षांत याज्ञिकीचे शिक्षण घेऊन पौरोहित्य करू शकतात, असे वेदपाठशाळेचे सचिव प्रसाद जोशी यांनी सांगितले. वेद ही आपली परंपरा आहे. वेदांचे अध्ययन करून या परंपरेचा पाईक होण्यासाठीच मी या अभ्यासाकडे वळलो, असे मुंबईच्या दादर परिसरात वास्तव्यास असलेल्या वेदांग दुर्गाप्रसाद जडये या विद्यार्थ्यांने सांगितले. माझे वडील पौरोहित्य करतात. ते पाहूनच मला या विषयाची गोडी लागली. केवळ पौरोहित्य करण्यापेक्षाही वेदांचे अध्ययन करावे या इच्छेतूनच मी येथे प्रवेश घेतला. याच क्षेत्रात काम करण्याचा मानस असल्याचेही तो म्हणाला.
पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींचे विवाह ठरण्यामध्ये अडसर येतो हे काहीसे वास्तव आहे. हे ध्यानात घेऊन पुण्यामध्ये केवळ पुरोहितांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नोकरी करणाऱ्या मुलांचे तरी कुठे वेळेवर विवाह होतात, असा प्रश्न आहेच. पदवीधर मुलांना नोकरीमध्ये पगार कमी मिळतो. मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा तसेच मुलगा आणि मुलगी यांच्या पगाराचे व्यस्त प्रमाण ही विवाह वेळेत न होण्याची प्रमुख कारणे आहेत, याकडे लक्ष वेधत मोरेश्वर घैसास यांनी आता मुलगी सुखात नांदेल या भावनेतून पौरोहित्य करणाऱ्या मुलांना मुलगी देण्याकडे पालकांचा कल वाढत असल्याचीही माहिती दिली.
पूर्णवेळ पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींसाठी पुण्यात एक समूह (ग्रुप) कार्यरत आहे. ज्यांचा चरितार्थ केवळ पूजापाठ आणि पौरोहित्य करण्यावरच अवलंबून आहे असे पुणे परिसरातील तीन हजार पंडित, पुरोहित, गुरुजी आणि पुजारी या संस्थेचे सभासद आहेत. या समूहाने जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने ‘स्मार्ट गुरुजी विशेष कर्ज योजना’ सुरू केली आहे. त्याअंतर्गत गुरुजींच्या मागणीनुसार आणि त्यांची परतफेड करण्याची कुवत ध्यानात घेऊन बँकेकडून कर्ज मिळवून दिले जाते. आतापर्यंत ५५ गुरुजींना अशा स्वरूपाचे कर्ज मिळाले आहे.
गावांमधील असोत किंवा शहरांमधील सर्वच तरुण आज करिअरच्या मागे धावत आहेत. त्यातही स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. या पार्श्वभूमीवर वेदपाठशाळेतील शिक्षणाकडेही करिअर म्हणून बघितले जात आहे. मुख्य म्हणजे हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शहरात राहण्याचा आणि पुन्हा गावाकडे जाण्याचाही पर्याय इथे तरुणांना उपलब्ध आहे आणि दोन्हीकडे संधीही चांगली आहे.
vidyadhar.kulkarni@expressindia.com