समुद्रात विमान कोसळणं, जहाजाला आग लागणं, जहाज कोसळणं या आणि अशा अनेक दुर्घटनांचा सामना करत भारतीय तटरक्षक दल नेहमीच यशस्वी ठरले आहे; पण अशा दुर्घटनाप्रसंगी तटरक्षक दल नेमकेकसे कार्यरत असते याविषयीच्या कवायतींची प्रात्यक्षिकं अरबी समुद्रात दाखवण्यात आली. त्या प्रात्यक्षिकांविषयी.

सकाळचे साधारण आठ वाजलेले. मुंबई विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाकडून तटरक्षक दलाला विमान दुर्घटनेची माहिती मिळते. मुंबईहून सिंगापूरला निघालेले १९६ प्रवासी असलेले विमान बेपत्ता होते आणि समुद्रात कोसळते. या माहितीचा संदेश मिळताच आपत्कालीन नियंत्रण कक्ष असलेल्या तटरक्षक दलाच्या गस्तीनौकेवरील हालचालींना वेग येतो. हेलिकॉप्टरचा आवाज घोंगावू लागतो. दुसरीकडे टेहळणी विमानाचा आवाज येतो. नौकेवर असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण संदेशांची देवाणघेवाण सुरू असते. एरव्ही शांत, संथ असलेल्या समुद्रावरील घडामोडींना त्या वेळी मात्र प्रचंड वेग घेतो. संथ दिसणाऱ्या निळशार पाण्यात मोठमोठय़ा लाटा दिसू लागतात. अरबी समुद्रात पडलेल्या प्रवासी विमानाला मदत करण्यासाठी तटरक्षकाच्या आठ गस्तीनौका, नौदलाची युद्धनौका, हेलिकॉप्टर, विमाने असा मोठा ताफा समुद्रातील त्या संभाव्य दुर्घटनास्थळी पोहोचतो. मग सुरू होते शोध आणि बचावकार्य.

23-lp-senaसमुद्रात कोसळलेल्या विमानातून प्रवासी आणि मृतांना बाहेर काढण्याचे तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरू असतात. हेलिकॉप्टर येते आणि शिडीच्या साहाय्याने एकेक प्रवाशांना वर खेचून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते. एकानंतर दुसरे, मग तिसरे अशी हेलिकॉप्टर्स येत राहतात. त्यामध्येच नौदलाचं टेहळणी विमान येतं. दुर्घटनस्थळाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे विमान एक फेरफटका मारतं. डुंगी (बचावनौका) विमानाच्या आजूबाजूला फिरत असतात. पाण्यात पडलेल्या प्रवाशांना या नौका मेडिकल शिपपर्यंत पोहोचवतात. दुर्घटनास्थळी तातडीने एक मेडिकल शिपही तैनात करण्यात आलेली असते. डुंगी रंगीत बाण सोडून हेलिकॉप्टर, गस्तीनौका, विमाने यांना घटनास्थळ नेमकं कुठे आहे हे सुचवतात. मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल रुग्णालय आयएनएचएस अश्विनी, महालक्ष्मी रेसकोर्स, गिरगाव चौपाटी या ठिकाणी जखमी आणि मृत प्रवाशांना पोहोचवण्यात येते. हे सगळं प्रचंड वेगात घडतं.

हा प्रसंग कोणत्याही सिनेमा किंवा कादंबरीमधला नाही, तर गेल्या आठवडय़ात भारतीय तटरक्षक दलाने मुंबईनजीकच्या अरबी समुद्रात ‘शोध आणि बचावकार्य’च्या कवायतींची प्रात्यक्षिके भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. समुद्रात कोसळलेले विमान हे बनावट होते. त्या अपघातामुळे समुद्रात पडलेले प्रवाशी हे तटरक्षक दलातील नौसैनिकच होते. त्यांनी जखमी प्रवाशांचे रूप धारण केले होते. एखादं विमान समुद्रात कोसळल्यानंतर तटरक्षक दल कशा प्रकारे कार्य करतात हे दाखवण्यासाठी या कवायतींचं आयोजन केलं होतं. काही वर्षांपूर्वी समुद्रमार्गे येऊन दहशतवाद्यांनी मुंबई हादरवलेली होती. त्यामुळे सागरी सुरक्षा आणखी उत्तम करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल नेहमीच प्रयत्नशील असते. केवळ दहशतवादी हल्ल्यासाठीच नव्हे, तर विमान अपघात, नैसर्गिक आपत्ती अशा घटना घडल्या तर तटरक्षक दल बचावकार्यासाठी सज्ज असायला हवे यासाठी ‘शोध आणि बचावकार्य’च्या कवायती पार पडल्या. समुद्रातील अशा प्रकारच्या बचावकार्यात अनेक यंत्रणा सहभागी असतात. अशा घटनास्थळी अनेक यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय साधला जातो. त्यामुळे दुर्घटनाप्रसंगी या विविध यंत्रणांची पावलं योग्य पद्धतीने पडावीत, योग्य दिशेने त्यांनी हालचाल करावी, महत्त्वपूर्ण संदेशांची देवाणघेवाण योग्य वेळेत व्हावी, संभाव्य अडचणींवर कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि यंत्रणांच्या समन्वयातून बचावकार्य योग्य प्रकारे व्हावे या उद्देशाने ‘शोध आणि बचावकार्य’च्या कवायतींचे आयोजन केले होते. नंतर या कवायतींचे समीक्षण केले जाते. कोण कुठे चुकलं, कोणी काय करायला हवं होतं, कामाचा वेग आणखी वाढवायला हवा का, अशा अनेक गोष्टी त्यातून समजतात. समीक्षणातून पुढे आलेल्या गोष्टींचा अभ्यास केल्याने त्याचा फायदा प्रत्यक्ष घटना घडल्यावर होतो.

24-lp-senaपत्रकारांना घेऊन जाणाऱ्या ‘सीजीएस समर्थ’ या गस्तीनौकेतून प्रवास करत ही सगळी प्रात्यक्षिके अनुभवता आली. एरव्ही टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून अशा दुर्घटनांबाबत ऐकीव-पुस्तकी माहिती मिळत असते. भारतीय तटरक्षक दलाच्या दहा नौका बचावकार्यासाठी तैनात, तटरक्षक दलाला बचावकार्यात यश, विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात तटरक्षक दल यशस्वी; या आणि अशा अनेक बातम्या तटरक्षक दलाचे कौतुक करणाऱ्या असतात. तटरक्षक दल नेमकं काम कसं करतं, त्याचं बचावकार्य कसं पार पडतं हे प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव घेता आला. विमान कोसळलेलं ठिकाण हेलिकॉप्टर, विमानांना कळवण्यासाठी त्या परिसरात आजूबाजूला संकेत देणारी केशरी रंगाची अग्निरेखा फवारली जाते. शिवाय गडद गुलाबी रंगाचे पॅराशूटही सोडले जातात. मुंबई विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाकडून विमान दुर्घटनेचा संदेश मिळाल्यानंतर तटरक्षक दलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर, विमानं कार्यरत होतात. या हेलिकॉप्टर आणि विमानं यांना घटनास्थळं शोधण्यास विलंब होऊ नये यासाठी पॅराशूटची गडद खूण केली जाते. फायर फायटिंगचेही प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले. समुद्रातच एखाद्या जहाजाला आग लागली तर त्यावर काय आणि कशी उपाययोजना करावी याचं प्रात्यक्षिक दाखवले. आग लागलेल्या जहाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दोन जहाजांमधून पाण्याचे फवारे सोडले जातात. हे फवारे प्रचंड वेगाने आग लागलेल्या जहाजावर मारा करत असतात.

गेल्या काही वर्षांत भारतीय तटरक्षक दलाच्या ‘शोध आणि बचावकार्य’ मोहिमेमध्ये झालेली वाढ प्रकर्षांने दिसून येते. आता यात आणखी वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. चेतक हे २.२ टन वजन वाहणारे हेलिकॉप्टर आहे, तर अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर म्हणजे एएलएच हे ५.५ टन वजन वाहणारे हेलिकॉप्टर आहे. तटरक्षक दलाची यंत्रणा आणखी सक्षम होण्यासाठी अधिक हेलिकॉप्टर्सची गरज आहे. म्हणूनच येत्या काही काळात आणखी १६ एएलएच हेलिकॉप्टर्सची मागणी केली जाईल, असे दिसते. तसंच १० टनांपर्यंत वजन वाहणाऱ्या हेलिकॉप्टर्सची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी महापालिकेचे आरोग्य प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा, खासगी रुग्णालये, वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस यांच्या समन्वये प्रात्यक्षिकं दाखवली गेली. या प्रात्यक्षिक मोहिमेत तटरक्षक दलाप्रमाणेच नौदल, हवाई दल, विमान कंपन्या, मुंबई हवाई नियंत्रण कक्ष, विमानतळ प्राधिकरण, मुंबई महापालिका, व्यापारी जहाजे या यंत्रणांचा सहभाग होता.

ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, मॉरिशस, सेशेल्स, मालदीव, संयुक्त अरब अमिराती अशा अनेक देशांचे प्रतिनिधी या प्रात्यक्षिक कवायतीसाठी उपस्थित होते. प्रवासी विमानाची दुर्घटना आणि त्यातील प्रवासी आणि मृतांना विविध यंत्रणांच्या समन्वयाने बाहेर काढण्याचा सराव या वेळी करण्यात आला. आठ गस्तीनौका, अटकाव नौका (इंटरसेप्टर), एक हॉवरक्राफ्ट, डॉर्निअर गस्ती विमान, नौदलाचे हेलिकॉप्टर, चेतक हेलिकॉप्टर, हवाई दलाचे एमआय १७ हेलिकॉप्टर, एएलएच हेलिकॉप्टर, असा ताफा सज्ज होता. हॉवरक्राफ्ट वाळूतही कार्यरत असते. त्यामुळे ही हॉवरक्राफ्ट गिरगाव चौपाटीवरील वाळूत उतरविणे शक्य होते. गिरगाव चौपाटीबाहेरील रुग्णालयांची संख्या जास्त असल्याने हॉवरक्राफ्टमधून अधिकाधिक जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेणे सोयीचे होते.

‘शोध आणि बचावकार्य’च्या कवायतींमुळे त्यात सहभागी असलेल्या यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी या साऱ्यांचाच आत्मविश्वास वाढतो. अशा कवायतींमुळे त्यांचा सराव होत असल्याने प्रत्यक्ष घटनेच्या वेळी बचावकार्यात काम करताना त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. तसंच अशा प्रात्यक्षिकांमुळे सर्वसामान्य लोकांना भारतीय तटरक्षक दलाबद्दल विश्वास वाटतो. एखादी दुर्घटना घडली तरी तटरक्षक दल सज्ज असल्याची भावना सर्वसामान्यांना आश्वस्त करते.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, tiwtter – @chaijoshi11