डॉ. अपूर्वा जोशी

खरं तर हा काळ उत्साहाचा नाही, सर्वत्र करोनामुळे वातावरण थंडावले आहे. व्यवसाय थंड आहेत आणि स्टार्टअप्सपण याला अपवाद नाहीत. अनिश्चिततेच्या या काळात सगळीच गणितं बदलताना दिसत आहेत.

किराणा, प्रवास, हॉटेल किंवा कार्यक्रम आयोजन संबंधित व्यवसायांना दिलेली इंटरनेटची जोड असे साधारण भारतातल्या यशस्वी स्टार्टअप्सचे स्वरूप होते. पण येत्या काही दिवसांत ते बदलायची शक्यता दिसायला लागली आहे. सरकारी पातळीवरून करोनाशी लढायची उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना सहायता पॅकेजेस जाहीर  झाली आहेत. करोना लॉकडाऊननंतरचा काळ हा स्टार्टअप्ससाठी खडतर असण्याची चिन्हं दिसायला लागली आहेत. ‘न्यूज इंटरप्रेटेशन’ या संस्थेच्या मते करोनाचा कठीण काळ संपल्यानंतर अनेक स्टार्टअप्सचे पुनर्मूल्यांकन होणं अपरिहार्य आहे.

फ्लिपकार्ट असेल, ओला असेल,ओयो असेल, बिग बास्केट असेल किंवा स्वीगी असेल या सगळ्या कंपन्यांचे विक्रीचे आकडे सध्या नाटय़मयरीत्या खालावले आहेत हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. फ्लिपकार्ट सोडून इतरांच्या व्यवसायाला खूप मोठय़ा प्रमाणात गुंतवणूकदारांचा पैसा लागतो पण तो ओघ आता मंदावला आहे. मी अनेक संस्थापकांशी बोलते आहे, ज्यांना आता पुरवठा धक्कय़ाबद्दल काळजी आहे आणि भविष्यातील योजनांमध्ये त्या कशा विचारात घ्याव्यात यावरही त्यांचा विचारविनिमय सुरू आहे.  हे विशेषत: ज्यांच्याकडे उत्पादनांद्वारे किंवा उत्पादनांचा काही भाग चीनमधून येत आहे अशा सर्वांसाठी संबंधित आहे.

या कंपन्यांनी आजवर केवळ वाढीव खप दाखवून कोटीच्या कोटी मूल्यांकनाची उड्डाणे केली, पण आता मात्र गुंतवणूकदारांवर या व्हॅल्युएशनचा विचार करायची वेळ आली आहे. अर्थव्यवस्था चांगली असताना देखील या कंपन्या कधी नफा कमावू शकल्या नव्हत्या, त्यांचा सगळा व्यवसाय चालायचा तो भविष्यातले विक्रीचे आकडे दाखवून. करोनाला किंवा करोनासारख्या आपत्तीला, भविष्यातल्या विक्रीचे आकडे मांडताना किती कंपन्यांनी गृहीत धरलं होतं यावर आता बरंच काही अवलंबून आहे.

भारतात काय होईल हे सांगणं अवघड असलं तरी  काही गुंतवणूकदार करोनाचे वादळ संपले की स्टार्टअप्समधील गुंतवणूक काढून घ्यायचा विचार करतील. जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करतात तेव्हाच ते हे पण ठरवतात की आपण बाहेर कधी आणि किती मूल्यांकन असताना पडायचं.

खरं तर स्टार्टअपचं मूल्यांकन हा सगळ्यात खडतर विषय असतो. स्टार्टअप्सचे मूल्यांकन करायला कोणतेच ठोकताळे नसतात, कोणती अकाऊंटिंग स्टँडर्ड्स नसतात, ना कोणते ठरलेले फॉम्र्युले. स्टार्टअपचे  मूल्यांकन हे माणूस पाहून केलं जातं, मूल्यांकन करताना कंपनीच्या प्रवर्तकांची समज, व्यवसायाची पद्धती, त्यांची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असते, म्हणून आपण पाहतो की आयआयएम किंवा आयआयटीच्या विद्यार्थ्यांंनी चालू के लेल्या स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांचा प्रतिसाद हा नेहमी चांगलाच असतो.

याशिवाय गुंतवणूक करताना पाहिला जाणारा घटक असतो तो म्हणजे संधी. म्हणजे व्यवसायाची संधी जितकी मोठी तितकी मूल्यांकन मोठं असायची शक्यता जास्त. किराणा माल अवघ्या देशात विकणे ही खूप मोठी संधी होती, त्यामुळेच फ्लिपकार्ट मूल्यांकनाची उड्डाणे करत गेलं. भारतातल्या प्रत्येक शहरात टॅक्सी उपलब्ध करून देणे ही मोठी संधी होती म्हणून ओलाचे मूल्यांकन वाढत वाढत वाढतच चाललं आहे.

यानंतर गुंतवणुकीचा तिसरा महत्त्वाचा घटक असतो तो तंत्रज्ञान. तुम्ही तुमचे उत्पादन अथवा सेवा देताना कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरता यामध्ये देखील गुंतवणूकदारांना रस असतो. बऱ्याचदा पायथॉन वापरले आहे का रुबी ऑनरेल, अमेझॉन क्लाउड वापरला का अझुरेचा क्लाउड या गोष्टी इंटरनेट आधारित स्टार्टअपसाठी महत्त्वाच्या ठरतात. तर उत्पादन बनवण्यासाठी तुम्ही अद्ययावत अथवा काळाच्या पुढचे तंत्रज्ञान वापरता आहात का यातदेखील गुंतवणूकदारांना रस असतो. जर गुंतवणूकदारही त्या क्षेत्रातील मोठी कंपनी असेल तर त्यांना आपल्या कंपनीचा या उत्पादनामुळे कसा फोयदा होईल हे पाहण्यात जास्त रस असतो.

आणि सर्वात शेवटचा घटक असतो तो गुंतवणूकदाराला त्या स्टार्टअपबद्दल वाटणारा विश्वास. किती वर्षांंनी निर्गुंतवणूक करताना अंदाजे  किती मूल्यांकन मिळू शकेल याचा अंदाज घेऊन गुंतवणूकदार एखाद्या स्टार्टअपचे आजचे मूल्यांकन ठरवत असतात. आजच्या मूल्यांकनाला स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये ‘प्री-मनी’ तर गुंतवणूकदाराने पैसे टाकल्यानंतर होणाऱ्या मूल्यांकनाला ‘पोस्ट-मनी’ असे म्हणतात. समजा, गुंतवणूकदाराला ३ वर्षांंनी एखाद्या स्टार्टअपचं मूल्यांकन ५ कोटी रुपये मिळेल असे वाटत असेल तर गुंतवणूकदार ५० लाख रुपयांची बोली लावतात. यानंतर थोडी घासाघीस होऊन एक मूल्यांकन ठरते.

तोटय़ात असलेल्या कंपन्यांचं मूल्यांकन जगात कुठेच वाढत नाहीत, पण स्टार्टअपमध्ये जितका जास्त तोटा तितकं मूल्यांकन मोठं हे आपण फ्लिपकार्टच काय, पण बाकीच्या इंटरनेट आधारित स्टार्टअपमध्ये पाहतो. कारण स्टार्टअपचे मूल्यांकन करताना केवळ मी वर उल्लेखलेलेच परिमाण वापरले जातात आणि त्यात नफा कमावणारी कंपनी असणे हे तितकंसं चांगलं मानलं जात नाही.  पैसे निर्माण करा आणि खर्च करा असा या स्टार्टअपचा मूळ आधार आहे.

viva@expressindia.com