रोहन अंबिके सुधा मूर्ती, या नावात वेगळीच जादू आहे. त्यांची ओळख के वळ ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्ष आणि नारायण मूर्ती यांच्या पत्नी इतकीच मर्यादित नाही. आजच्या तारखेला सुधा मूर्ती यांनी लेखिका म्हणूनसुद्धा आपले वेगळे स्थान आणि नाव कमावले आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्त्वाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मूर्ती दाम्पत्य होय. त्या जितक्या साध्या राहतात तशाच साध्या, सोप्या पद्धतीचं लिखाण करतात. याचाच प्रत्यय त्यांचे ‘वाइज अॅण्ड अदरवाइज: अ सॅल्यूट टू लाइफ’ हे पुस्तक वाचताना येतो. काही वर्षांपूर्वी ‘न्यू संडे एक्स्प्रेस’साठी लिहिलेल्या छोटय़ा स्तंभांमधील निवडक कथांचं हे पुस्तक आहे. यात मूर्ती यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांच्या खजिन्यातून त्यांना विचारात पाडणारे किस्से लिहिले आहेत. खरं म्हणजे या अगदी सामान्य लोकांच्या कथा आहेत, परंतु त्यातील लोकांचे आयुष्य, त्यांनी केलेल्या गोष्टी सामान्य नाहीत. या सर्व ५१ कथा जरी लहान असल्या तरी प्रत्येक कथा स्वत:च्या अधिकारात अद्वितीय आहे. उच्च शहरीकृत भूप्रदेशांपासून ते खेडय़ापाडय़ात, जिथे प्राथमिक शिक्षण मिळणे आणि इतर सामग्रीचा आभाव आहे अशा विरोधाभास असलेल्या आपल्या देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांच्या कथा यात आहेत. हे पुस्तक बरेच विरोधाभासांबद्दल आहे. अगदी आधुनिक समाजातील बदलत्या हालचालींपासून ते मानवी कमकुवतपणाबद्दल आणि त्या फुगलेल्या अहंकाराबद्दल मूर्तीनी या पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकात आयुष्याचा एक स्पेक्ट्रम लेखिकेने काढला आहे. एका बाजूला अन्यायकारक पद्धतींचा अवलंब करण्याच्या प्रकाराबद्दल तर दुसऱ्या टोकाला अचानक कुणी दाखवलेल्या अनपेक्षित नम्रतेबद्दल या पुस्तकात लिहिलेलं आहे. लहान मुलांचा प्रामाणिकपणा त्यांना जास्त भावतो. पण इतरांच्या खर्चावर शोषण करण्याचा मार्ग जेव्हा त्यांना नजरेस पडतो तेव्हा त्यांची अंत:करणापासून झालेली चिडचिड त्या व्यक्त करतात. त्याच कथेत पुढे, चांगल्या प्रकारे विचार केल्याने, केवळ आपल्या स्वत:च्या जीवनाचं नव्हे, तर आपण ज्या ज्या जीवनाला स्पर्श करतो, त्या जीवनाचे रूपांतर कसे घडवून आणू शकतो हे सुंदरपणे मांडलं आहे. मूर्ती यांनी इन्फोसिसच्या आधी एका महाविद्यालयात प्राध्यापकी केली होती. त्यावेळच्या काही आठवणीसुद्धा त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या ‘महाश्वेता’ या पुस्तकामुळे एक लग्न कसं मोडता मोडता वाचलं ही पुरुषप्रधान मानसिकतेवरची आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारी कथा वाचण्यासारखी आहे. ‘कुमारी माता’ या संवेदनशील तरीही विस्फोटक मुद्दय़ावरची कथा खूप काही सांगून जाते. आपली एक विद्यार्थिनी कुमारी माता राहिल्याने समाजाच्या दबावाखाली आत्महत्या करते तर नॉर्वे या देशात हाच मुद्दा किती सहजरीत्या, कुठलाही बाऊ न करता सोडवला जातो याचा अनुभव मनाला चटका लावणारा आहे. प्रत्येक व्यक्तीला निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि तो दिल्याने अनेक आयुष्य वाचू शकतात हेच या कथेतून मूर्ती अधोरेखित करतात. तापणाऱ्या चुलींबद्दलची कथा गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींबद्दलची आहे, ज्यांना सासरच्यांनी हुंडा दिल्याबद्दल त्रास दिला आहे. ज्या मुली आज बऱ्यापैकी कमावत्या आहेत त्यांनी गप्प बसून अन्याय सहन करावा याचं आश्चर्य लेखिकेला वाटल्यावाचून राहात नाही. सुधा मूर्ती यांच्या मते आत्मनिर्भरता ही एक अशी गोष्ट आहे जी वर्तमान शिक्षण आणू शकत नाही - ही एक भावना, एक विचार प्रक्रिया आहे जी सध्या आपल्या समाजव्यवस्थेत आढळून येत नाही. आज ‘स्त्रीवादा’च्या या कल्पनेच्या उदयाबरोबरच स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची कृत्ये ओसंडून वाहत असल्याने चर्चेचा विषय ठरतात. परंतु बऱ्याचदा हे देखील लक्षात येते की स्त्रिया इतर स्त्रियांपेक्षा जास्त नाराज आहेत. एका सासूने आपल्या मुलावर तिच्या प्रभावाचा वापर केला आहे, त्यामुळे मुलगा पत्नीला हुंडय़ासाठी छळ करतो, बायकोने तिच्या प्रभावाचा उपयोग घरच्या जबाबदाऱ्यांमधून स्वत:ची सुटका करण्यासाठी केला आहे. ‘यात कोणाचा दोष आहे?’ मला वाटते की ही सामूहिक चूक आहे, असं मूर्ती म्हणतात. विचारांमधला स्पष्टपणा प्रत्येक कथेच्या शेवटी लेखिकेने जाणवून दिला आहे. एक प्रामाणिक महिला म्हणून सुधा मूर्ती यांचं वेगळं रूप आपल्याला दिसतं. जेव्हा त्यांच्या स्वत:च्या काही मित्र आणि ओळखीच्या लोकांचे जीवनाकडे दुर्लक्ष होते तेव्हा त्यांना जाणवलेलं आश्चर्य आणि नैराश्य, एक वाचक म्हणूनही आपल्याला लक्षात येते. या लघुकथांमधून ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ करत असलेल्या कार्याबद्दल आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. पुस्तक वाचताना असं वाटू शकतं की सुधा मूर्तीनी काही ठिकाणी परखडपणे लोकांना सुनावलं आहे. या पुस्तकातील प्रत्येक कथा हृदयस्पर्शी आणि आश्चर्यकारक आहे. या पुस्तकाचं कुठलंही पान काढून वाचलं तर असं लक्षात येतं की बऱ्याच बाबींमध्ये आयुष्यातले अनुभव आपल्यापेक्षा खूप मोठे असतात आणि त्यांच्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना जीवन आणि लोकांकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग सापडेल. या पुस्तकातून लोकांना समजेल की त्यांच्या छोटय़ा छोटय़ा घटना मानवी गुणांचे आणि दुर्गुणांसह मनुष्यांचे असंख्य स्वरूप कसे असते ते समजून घेण्याची संधी असू शकते. त्याच वेळी, एका लेखकाप्रमाणे आपण आपले लक्ष आणि विचार दिला तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि आपल्या लहान लहान घटना कशा प्रेरणादायक व समृद्ध होऊ शकतात हे एका वाचकाला कळू शकते. viva@expressindia.com