मितेश जोशी

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. मालिकेत लतिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक ही मूळची गोव्याची असून तिला गोव्याची माती, गोव्याची माणसं आणि गोव्यातले चटकदार खाद्यपदार्थ अधिक जवळचे वाटतात.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

अक्षयाच्या दिवसाची सुरुवात मेथीचं पाणी, जिऱ्याचं पाणी, लिंबू पाणी तर कधी नारळ पाणी पिऊन होते. ऋतुमानानुसार ही पेयं बदलत असतात. त्यानंतर काही तासांनी अक्षयाची न्याहारी होते. पोहे, उपमा, थालीपीठ असा पारंपरिक भारतीय नाश्ता तिच्या ताटात असतो. कधीतरी समोसा आणि चहा ही नाश्ता जोडीदेखील तिला आवडते. अक्षयाचे तऱ्हेतऱ्हेचे  डाएट फॉलो करून झाले आहेत. या सगळय़ातून तिने अखेर पारंपरिक पदार्थाना आपलंसं केलं आहे. लग्नात जेवणाच्या ताटात जसं परिपूर्ण चमचमीत जेवण असतं तसं अक्षयाच्या ताटात रोज चमचमीत जेवण असतं. लोणचं, पापड, कोशिंबीर, चमचमीत भाज्या, पोळय़ा आणि वरण भात तुपाचा थाट अक्षयाच्या दुपारच्या ताटात दिसतो. दुपारची चहाची तलफ भागून झाल्यानंतर लागलेली भूक अक्षया सेटवर आलेल्या स्नॅक्सवर भागवते. सेटवर येणारे खूप वेगवेगळे व स्वादिष्ट स्नॅक्स हे कलाकारांना एक प्रकारे रात्रीच्या जेवणाचीच अनुभूती देतात, असं सांगणारी अक्षया रात्री भूक लागली तर हळद दूध पिऊन भूक शमवण्याचा प्रयत्न करते.    

अक्षया ही मूळची गोव्याची आहे. तिच्या आईचं गाव कोकण आणि वडिलांचं गाव गोवा आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या समृद्ध खाबूगिरीसाठी अक्षया कायमच उत्सुक असते. याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘उत्तर दिशेला असलेल्या केरी नावाच्या समुद्रकिनाऱ्यापासून गोव्याची सुरुवात होते. एका बाजूला अखंड असलेल्या अरबी समुद्राने गोव्याला वैभव प्राप्त करून दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला उंच नारळाची झाडं आणि सोबतीला हिरव्यागार शेतीने गोवन खाद्यसंस्कृती वृध्दिंगत झाली आहे. लोकांचा गैरसमज असतो की गोव्याची खाद्यसंस्कृती म्हटलं की फक्त मासेच त्यात असतात. तसं नाही आहे खरं तर.. गोव्याची शाकाहारी खाद्यसंस्कृतीसुद्धा अतिशय व्यापक आहे. ज्याप्रमाणे पुणे, नाशिक, कोल्हापूरची स्वतंत्र अस्तित्व असलेली मिसळ आहे. तशीच आम्हा गोवेकारांची ‘तोणाक पाव’ नाव असलेली मिसळ आहे. तोणाक ही एकप्रकारची उसळच असते, त्यात शेव फरसाणचा लवलेशही नसतो. गोव्यात जागोजागी तोणाक पावाच्या गाडय़ा दिसतात. अंबाडय़ाची भाजी म्हटलं की शहरातल्या खवय्यांच्या डोळय़ासमोर पालेभाजी अंबाडी येते, पण गोव्यात अंबाडी नावाचं एक फळ मिळतं. ज्याची भाजी केली जाते. कैरीचा चुलत लहान भाऊ असं आम्ही त्याला गमतीने म्हणतो. या अंबाडीच्या भाजीची शाखा फक्त गोव्यातच आहे, इतर कुठेही नाही’. गोवन शिवराक जेवणात हळसाणे उसळ, वालाची भाजी, तांबडी भाजी, अंबाडय़ाची चटणी, बिंबलाचं लोणचं असे वेगळेच पदार्थ असतात. इथल्या उसळीचेही दोन-तीन प्रकार आहेत, असं अक्षयाने सांगितलं. 

पोर्तुगीजांनी गोव्यात ४५० वर्ष राज्य केलं, त्यामुळे साहजिकच गोव्याच्या राहणीमानासोबतच खाद्यसंस्कृतीवरही पोर्तुगीजांचा प्रभाव दिसतो. पोर्तुगीजांनी शिकवलेली महत्त्वाची कला म्हणजे बेकिंग. पोर्तुगीज खाद्यपदार्थाविषयी सांगताना अक्षया म्हणाली,‘गोव्यात पावाचाही सढळ हाताने वापर करतात. भारतात सर्वप्रथम पावाची निर्मिती गोव्यात पोर्तुगीजांकडून झाली. त्यामुळे गोव्यातल्या खाद्यसंस्कृतीमध्ये पावाला विशेष महत्त्व आहे. ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत वेगवेगळय़ा पद्धतीचे पाव इथे खाल्ले जातात. पाव, उंडे, कातरे, काकणा, पोई यातला एखादा तरी प्रकार गोवन माणसाच्या ताटात हमखास दिसतोच. ‘चेरीस पाव’ हा मांसाहारी स्नॅक्स प्रकारात मोडणारा पदार्थ इथे चवीने खाल्ला जातो. ‘चेरीस’ हा ‘सॉसेज’चा एक प्रकार आहे. बीफ, पोर्क, चिकन, प्रॉन्स यापासून तयार केलेले वेगवेगळे सॉसेज म्हणजेच चेरीस होय. या सॉसेजचे बारीक पातळ काप करून कधी ते छान खरपूस फ्राय करून तर कधी तसेच खाल्ले जातात. पावात कांदा, गाजर यांच्या सलाडबरोबर सॉसेजचे पातळ काप घालून सोबत वेगवेगळय़ा चटण्या घालून खायला दिले जाते’. ‘सोरपोतेल’ हादेखील एक वेगळा पोर्तुगीज पदार्थ गोव्यात फेमस आहे. पोर्कच्या मटणाची बनवलेली चमचमीत भाजी म्हणजे सोरपोतेल. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, व्हिनेगर, लाल मिरच्या आणि गरम मसाला या मिश्रणात शिजवलेलं पोर्क मटण म्हणजे सोरपोतेल होय, असं तिने सांगितलं. 

मुबलक नारळ, भातशेती, उकडा तांदूळ यामुळे गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत एक आपलेपणा जाणवतो. समुद्रकिनाऱ्यामुळे मासे म्हणजे माझ्या दृष्टीने रोजच्या जेवणातला ‘हिरो’ असं म्हणणारी अक्षया मत्स्य प्रेमाविषयीही भरभरून बोलते. ‘मासे म्हणजे आमचे ‘नुसते’. नुसत्याशिवाय जेवण अपूर्ण आहे. बहुसंख्य गोंयकार पट्टीचे मासेखाऊ असतात. आज आम्ही जरी मुंबईत राहत असलो तरीही श्रावणात आम्ही चिकन सोडू, पण मासे सोडणं काही जमणार नाही. मासे ही मूलभूत गरज आहे. ते मिळाले नाहीत तर एकप्रकारची अस्वस्थता येते. चोणक, तांबोशी, बांगडे, तार्ले, काळुंद्रे, पापलेट, इसवण (सुरमई), मोरी, मुड्डूशे, लेपो, तिसऱ्यो (शिंपल्या), सुंगटा (कोलंबी), शिणाणे आणि बारक्या माशांच्या असंख्य जाती गोवन मत्स्यसंस्कृतीचा भाग आहेत. तेलाचा आणि मसाल्यांचा मारा न केल्याने प्रत्येक कालवणात आणि तळलेल्या माशातही त्या, त्या माशाची वेगळी चव टिकून राहते हेच गोवन माशांचं वैशिष्टय़ आहे. इथे माशांचं तोणाक किंवा हुमण म्हणजेच रस्सा केला जातो. आज बार्बेक्यू कबाब आवडीने खाल्ले जातात, पण चारशे वर्षांपूर्वीचा बेक बांगडा हा प्रकार गोव्यात सर्रास केला जायचा. त्याचं तेव्हा नाव होतं ‘कावाल दु फोरनो’. पीक कापल्यावर उरलेलं गवत वाळल्यावर या गवतात मीठ, लिंबू लावून मिरची घालून बांगडा भाजायला टाकला जायचा आणि मग त्या गवताला आग लावली जायची. त्याचा घमघमाट गावभर पसरायचा, अशी आठवण अक्षयाने सांगितली.    

अक्षया सांगते, ‘माझी भूक खूप नाही. मला मोजूनमापून खायला आवडतं. लहानपणी मला व माझ्या बहिणीला भाज्या खायचा वीट यायचा. यावर आमच्या हुशार आईने एक युक्ती केली. ती आम्हाला वेगवेगळय़ा शेपमध्ये व्हेजिटेबल कटलेट बनवून द्यायची, त्याचबरोबर पराठय़ांच्या माध्यमातून भाज्या पोटात जायच्या. नुसती पोळीभाजी खायला जिवावर यायचं.

माझी आई उत्तम सुगरण आहे. ती लग्नानंतर स्वयंपाक बनवायला शिकली. माझ्या आईने आयुष्यात कधीच चिकन खाल्लं नाही, पण ती जबरदस्त चिकन डिश बनवते.आईला सगळय़ांना खाऊ घालायला आवडतं. रुईया कॉलेजमध्ये असताना मला सगळेजण मिनी कॅन्टीन या नावाने हाक मारायचे, कारण आमच्या मातोश्री माझ्यासोबत सगळय़ांसाठी डबा पाठवायच्या. सुरुवातीला दोनजणांसाठी डबा यायचा. मग पाच नंतर दहा अशी संख्या वाढतच गेली. एकदा रवींद्र नाटय़ मंदिराच्या कलांगणात आईने तीस जणांची पंगत बसवलेली. आमचा रवींद्र नाटय़ मंदिरात इव्हेंट होता आणि त्या धावपळीत मुलं उपाशी राहू नयेत म्हणून माझ्या आईने माझ्या सगळय़ा टीमसाठी पापड, मसाले भात, काळय़ा वाटाण्याचं सांबार, कोशिंबीर आणि पुरी असा स्वयंपाक एकटीने केला होता. आणि माझ्या टीमने तिच्या हातच्या पदार्थावर यथेच्छ ताव मारला होता. ही पंगत माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, त्यामुळे आमच्या घरून कोणीही उपाशी जात नाही’.

खाण्याभोवती अनेक आठवणी आहेत असं सांगणारी अक्षया रुईया कॉलेजमधल्या आठवणीही सांगते. ‘मी सुरुवातीला कॉलेजमध्ये डबा घेऊन जायचे. इव्हेंटला तर साक्षात आई डबा घेऊन यायची. कॉलेज कॅन्टीनमध्ये शेअिरगमध्ये खूप वेगवेगळे पदार्थ खाल्ले जायचे. रुईया कॉलेजच्या आजूबाजूला कॅफे, हॉटेल आणि ठेल्यांची एकच गर्दी आहे. ‘रामाश्रय’ ही माझी फेव्हरेट जागा होती. आठजणांच्या सीटवर आम्ही तेरा ते चौदा जण घुसून बसायचो. आम्हाला बऱ्याचदा तिथून जाहीर अपमान करून हाकलवण्यात आलं आहे. आम्ही लग्नामध्ये फ्री जेवायला जायचो. ‘आयईएस’मध्ये लग्नाच्या सीझनमध्ये सतत कोणाचं ना कोणाचं तरी लग्न असायचं. एकदा कॉलेजमध्ये कार्यक्रम होता, त्यामुळे आम्ही छान नटूनथटून गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर गाड़ीत बसताना आमच्या ग्रुपमधला एक मित्र कळवळून म्हणाला, मला खूप भूक लागली आहे. मला कोणी हॉटेलमध्ये नेलं नाही तर मी आता या लग्नात जाऊन जेवेन. आमच्या मित्राने गाडी थांबवत जाऊन दाखवच असं आव्हान त्याला दिलं. तो खरंच उतरला, त्याच्यापाठोपाठ आम्हीही पाच जण त्या लग्नसमारंभात शिरलो आणि जेवलो. दुसरा किस्सा तर कायम लक्षात राहील असा.. सतत लोकांच्या लग्नात किंवा सत्संगमध्ये फुकट जेवण्याचा आम्हाला दांडगा अनुभव आला होता. आम्ही सहजपणे कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने जाऊन जेवायचो. एकदा रविवारी आम्ही सत्संग समजून जेवायला गेलो आणि र्अध जेवण झाल्यावर लक्षात आलं की हे कोणाच्या तरी श्राद्धाचं जेवण आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण तपासून जायचो, पण खाणं काही सोडलं नाही’, असं ती गमतीने सांगते.     

अक्षयाच्या मते खाणं म्हणजे नुसतं उदरभरण नव्हे. ‘तो रंग, रूप, रस, गंध, चव या सगळय़ा संवेदनांना तृप्त करणारा अनुभव असतो. तुम्हाला जे आवडेल ते खा. रोज खा. मनापासून खा. माझ्यासाठी माझ्या ताटातला हिरो म्हणजे मासा आहे. तुमच्या ताटातला हिरो कोण आहे याचा नक्की शोध घ्या’ असंही ती आवर्जून सांगते.