मितेश रतिश जोशी

मुंबई-लंडन-मुंबई ही दुहेरी बाइक सफर यशस्वी करणाऱ्या, एक नाही, दोन नाही तर तब्बल २७ देशांच्या अंतरंगात डोकावून आलेल्या आणि ही जगावेगळी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील आजच्या घडीला एकमेव असलेल्या सांगलीच्या शेतकरी पुत्राचा भन्नाट सफरनामा!!

light pollution effect on human health
अंधेरा कायम रहे!!
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

सफर प्रत्येकालाच आवडते. कोणी आपल्या खासगी वाहनातून प्रवास करतो, तर कोणी बस, रेल्वे, विमान अशा सार्वजनिक वाहनातून.. प्रत्येकाची आपापली अशी फिरण्याची पद्धत असते. काहींना प्रसिद्ध स्थळांना भेटी द्यायला आवडतं, तर अनेक जण खिडकीच्या बाहेर डोकं काढून आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळण्यात धन्यता मानतात. मात्र, या सगळयांपेक्षा एक वेगळी जमात या भूतलावर अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे बाइक राइडर्सची. या अवलियांना आपल्या दुचाकीवरून अवघं जग फिरून यायचं असतं. आपल्याला पाहिजे ते सामान बाइकवर लादायचं आणि कधी ठरल्याप्रमाणे तर कधी वाट मिळेल तिथं सुटायचं. वाटेत मिळेल त्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा आणि कंटाळा आला की थांबायचं. इतकी साधी सरळ सोपी मांडणी वाटत असली तरी या प्रवासाची गणितं मात्र कठीण असतात. अशीच एक भन्नाट बाइक राइड सांगलीच्या योगेश आलेकारी या शेतकरी पुत्राने केली आहे.       

बाइकवरून फिरणं हा योगेशचा छंद होता. या छंदाचं रूपांतर कालांतराने पॅशनमध्ये झालं. सुरुवातीला मित्राच्या बाइकवरून त्याने भारतभ्रमंती केली. त्यातून त्याला पुढच्या राइडसाठी आणखी ऊर्जा मिळाली. पुढे त्याने हिमालयन रॉयल एनफिल्ड विकत घेतली. स्वत:च्या बाइकवरून कुठे तरी दूरदेशी जावं या विचारातून त्याने पहिली मुंबई ते सिंगापूर ही राइड केली. या राइडनंतर त्याला जगभ्रमंती करण्याचा ध्यास लागला आणि त्याने २७ देशांच्या बाइकवारीसाठी पूर्वतयारी सुरू केली. ही तयारी नेमकी कशी केली याविषयी सांगताना योगेश म्हणाला, ‘या राइडचा चार वर्षे मी अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय राइड ही फार वेगळी असते. आपल्याच देशात राइड करताना आपण मुक्त असतो, पण दुसऱ्या देशात राइड करताना भरपूर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्येक देशाच्या हवामानाचा अभ्यास, त्या त्या देशाचा सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक आढावा घेतला. या अभ्यासामुळे मला त्या देशाला भेट देण्याची अधिक ओढ लागली. प्रवासासाठीची सरकारी कागदपत्रं तयार करणं, प्रत्येक देशातील वाहतुकीचे नियम समजून घेणं, माझ्या गैरहजेरीत घरच्यांची गैरसोय होऊ नये त्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करून मी माझ्या प्रवासाची नांदी केली.’

हेही वाचा >>> फॅशन वीकचा डार्क समर

योगेशच्या प्रवासाची सुरुवात २७ जुलै २०२३ पासून झाली. सर्वप्रथम त्याने इराण हा देश गाठला. मग पुढे तुर्की, ग्रीस, अल्बानिया, बल्गेरिया, मोंटेनिग्रो, बोस्निया, क्रोएशिया, सर्बिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम, इंग्लंड, स्कॉटलंड, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, जॉर्जिया, अझरबैजान, आर्मेनिया, दुबई, बहरीन असे अनेक देश फिरून हा फिरस्ती पुन्हा भारतात आला. या प्रवासादरम्यान अनेक किस्से घडले. याविषयी सांगताना योगेश म्हणाला, ‘माझ्या आर.सी. बुकवर ‘गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र’ असं नाव होतं. ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ असं नाव नसल्याने एका ब्रिटिश अधिकाऱ्याने मला अडवून धरलं. त्याला मी गूगलवर महाराष्ट्र हे भारतातीलच एक राज्य असल्याचे पुरावे दाखवले, तरीसुद्धा त्याने प्रश्नांचा भडिमार कमी केला नाही. खूप शांतपणे दोन तास मी ती परिस्थिती हाताळली.’ वेगवेगळया देशात भाषेच्या अडचणीही यायच्या, असं त्याने सांगितलं. ‘दुभाषिकांची काही ठिकाणी मदत व्हायची. काही ठिकाणी हातवारे करून संवाद चालायचा. काही ठिकाणी हातवारेही कळायचे नाहीत. एकदा इराणमध्ये पैसे संपले, तिथे डॉलर स्वीकारले जात नव्हते. अशा वेळी रात्री अकरा वाजता तेथील दुभाषिकाने मला पैशांची मदत केली. बऱ्याच देशात माझं जंगी स्वागत झालं. इस्तंबूलमध्ये रोटरी क्लबने केलेलं स्वागत व अंकारा येथे भारताचे राजदूत डॉ. एस. पोल यांनी अतिशय उत्साहात तुर्कीमध्ये केलेलं स्वागत न विसरण्याजोगं आहे’ असं तो म्हणतो.     

या प्रवासादरम्यान मुद्दाम काही ठिकाणी योगेशने भेट दिली. ‘ब्रिटनमधील हे-ऑन-वाई हे गाव जगातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रातील भिलारची भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून ओळख निर्माण झाली. म्हणून मी खास त्या गावी भेट दिली. लंडनमध्ये मला मुद्दाम ब्रायटनच्या किनाऱ्यावर जायचं होतं, कारण तिथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला’ ही कविता लिहिली होती. त्याच ब्रायटनमध्ये एक राजवाडा आहे, त्याचा दरवाजा पटियालाच्या राजाने बसवला आहे. पहिल्या महायुद्धामध्ये पटियालाच्या राजाचे सैनिक इंग्रजांबरोबर लढत होते. भारतीय सैनिकांची देखभाल ब्रिटिश सैनिकांनी चांगली केल्यामुळे खूश झालेल्या पटियालाच्या राजाने तिथल्या राजाला हा दरवाजा भेट म्हणून दिला. आजही तिथे या घटनेची माहिती देणारी पाटी आहे. त्याचबरोबर मला सुवर्णदुर्ग कॅसेलला भेट द्यायची होती. कारण या कॅसेलच्या इतिहासाची मुळं थेट सुवर्णदुर्ग किल्ल्याशी जोडली गेली होती’ अशा काही खास भेटींच्या आठवणी योगेशने सांगितल्या.     

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: सुरिली मैथिली

योगेश इराण, दुबई मार्गे भारतात येणार होता, पण युद्धसदृश्य परिस्थितीमुळे त्याला मार्ग बदलावा लागला. युद्धसदृश्य परिस्थितीमुळे या देशातील ट्रॅन्झिट व्हिसा योगेशला मिळाला नाही, त्यामुळे त्याला अनेक अडथळे आले. इजिप्त, जॉर्डन, इस्रायलसारख्या ऐतिहासिक देशांमध्ये मनापासून जायची योगेशची इच्छा होती. मात्र युद्धामुळे मनात इच्छा असूनही त्याला तिथे राइड करता आली नाही. तरीही, शहरांमधील ‘शांततामय’ गोंधळाचा, तिथल्या असाधारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, अनोख्या खाद्यसंस्कृतीचा, फुलांनी, पक्ष्यांनी बहरलेल्या हिरव्यागार मैदानांचा अनुभव योगेशने युरोपमध्ये घेतला. ‘एक बार ठान ली तो बस्स ठान ली’ या उक्तीप्रमाणे मुंबई- लंडन- मुंबई असा प्रवास योगेशने चक्क त्याच्या लाडक्या हिमालयन बाइकने करायचं स्वप्न पाहिलं होतं. खरं तर असं स्वप्न पाहणंदेखील महाकठीण गोष्ट आहे, पण त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही’ हे शिवशाहिरांचे कथन तो या राइडच्या माध्यमातून अहोरात्र जगला. मुंबई ते लंडन आणि पुन्हा मुंबई असा १३६ दिवसांत २७ देश, २ खंड आणि थोडाथोडका नाही तर २९,००० किमीचा जबरदस्त प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून योगेश १६ डिसेंबर २०२३ला मायदेशी परत आला.      

‘राइडला निघण्यापूर्वी पूर्वतयारी अत्यंत आवश्यक असते. कुठेही बाहेर जाताना आपण स्वत: तयार होतो तसंच बाइकलादेखील आपण तयार केलं पाहिजे. रायिडगसाठी बाइक फिट असली पाहिजे. जेणेकरून प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्हाला मदत मिळू शकेल. वेळच्या वेळी बाइक सव्‍‌र्हिस करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. कंपनीच्या सव्‍‌र्हिस सेंटरवर जाऊन बाइक सव्‍‌र्हिस करून घ्या. या वेळी तुम्हाला बाइकमधील लहान-मोठया अडचणी समोर येतील, त्यांची दुरुस्तीही होईल. बाइकची हेडलाइट, टेल लाइट, इंडिकेटर देखील तपासून घ्या. जेव्हा तुम्ही लांबच्या बाइक राइडला जाता, तेव्हा सोबत एक रिकामा कंटेनर ठेवा. प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही जेव्हा बाइकमध्ये पेट्रोल भराल तेव्हा त्या कंटेनरमध्ये देखील पेट्रोल भरून घ्या. अनेकदा अशा ठिकाणी आपल्या बाइकमधलं पेट्रोल संपतं, जिथे आसपास पेट्रोल पंप नसतो. तसंच तुम्हाला तिथे कोणतीही मदत मिळत नाही. अशा वेळी त्या कंटेनरमध्ये भरलेलं पेट्रोल तुमच्या कामी येईल. कंटेनरमध्ये अर्धा लिटर पेट्रोल जरी असलं तरी त्यानंतर तुम्ही २५ ते ३५ किलोमीटपर्यंतचा प्रवास करू शकता’ असं योगेश सांगतो. शिवाय, बाइक रायिडगची तयारी करताना बाइक सव्‍‌र्हिस केल्यानंतर दोन स्पार्क प्लग, टायर पंक्चर किट, टायरमध्ये हवा भरण्यासाठी मॅन्युअल इन्फ्लेटर, फर्स्ट एड बॉक्सदेखील बरोबर ठेवा. या वस्तू ठेवण्यासाठी थोडी जागा लागेल, परंतु या वस्तू लाँग ड्राइव्हच्या वेळी खूप उपयोगी पडतात, असं त्याने सांगितलं.

ऋतुमानानुसार बाइक रायडर्सना स्वत:ची काळजी घ्यावी लागते, असंही त्याने सांगितलं. उन्हाळा व हिवाळयाच्या दिवसात बाइक राइड करण्यापूर्वी तुमचं संपूर्ण शरीर झाकलेलं असेल याची काळजी घ्या. कपडयांच्या दोन ते तीन लेयर्स असायला हव्यात. जेणेकरून तुम्हाला थंडी व ऊन लागणार नाही. तसंच तुमचं डोकं, मानदेखील झाकलेली असली पाहिजे. उन्हाळयात सकाळी लवकर राइडला सुरुवात करावी. शक्यतो दुपारी बारानंतरचा प्रवास टाळायला हवा. यादरम्यान, बारा ते चार आराम करा. आहार आणि पाणी याकडे विशेष लक्ष द्या. उन्हाळयात प्रचंड घाम आल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाण्यामध्ये ओ.आर.एस मिसळून ठेवा. जेणेकरून डिहायड्रेशनपासून संरक्षण होईल. उन्हाळयात बाइक चालवताना शक्यतो टाइट कपडे न घालता मोकळेढाकळे कपडे घालायल हवेत. जास्तीत जास्त सुती कपडे वापरा. यामुळे शरीरातील घाम सहज शोषला जातो. तसंच उष्णतेपासून तुमचं पूर्ण संरक्षण व्हावं या उद्देशाने पूर्ण बाह्या असलेले कपडेच घालायला हवेत. हातांमध्ये ग्लोव्ह्ज आणि पायात चांगले बूट असले पाहिजेत, अशा महत्त्वाच्या टिप्सही त्याने दिल्या.     

स्पीड ब्रेकर आला की आपण तो हळूच क्रॉस करून पुन्हा स्पीड पकडून पुढे जातो. आयुष्यातही प्रॉब्लेम आल्यावर थोडं स्लो होऊन प्रॉब्लेमला सामोरं जाऊन पुन्हा स्पीड पकडून पुढे जायचं असतं. राइडला निघाल्यावर डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत कितीही प्रॉब्लेम आले तरी त्यावर मात करून तिकडे आपण पोहोचतो. तसंच आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यावर मात करून पुढे जायचं असतं. बाइक ही रायडर्ससाठी फक्त एक मशीन नसून एक इमोशन आहे, हे योगेशसारख्यांच्या बाइक भ्रमंतीवरून पुन:पुन्हा सिद्ध झालं आहे.

viva@expressindia.com