एक होत्या ठमाबाई. त्यांना शेअरिंगची भारी हौस. नवं काय घेतलं, नवं काय घातलं, चुलीपाशी काय रांधलं नि अंगणात काय बांधलं… सगळ्याचं प्रदर्शन करण्यासाठी नवनव्या युक्त्या शोधायच्या. आपल्या आयुष्यात घडणारं सगळं काही अख्ख्या गावाला कळायलाच हवं अशी त्यांची तळमळ. एकदा त्यांनी घेतल्या सोन्याच्या बांगड्या. त्या मैत्रिणींना दाखवायला हव्याच म्हणून किटी पार्टीला बोलवलं. हातवारे करून बसा बसा म्हटलं. हात पसरून पोहे दिले, तरी बांगड्यांकडे कोणाचं लक्ष काही जाईना. ठमाबाईंची तगमग वाढली. चिडून त्यांनी अंगणातली गवताची गंजी दिली पेटवून… आग विझवायला जेव्हा बायका धावल्या, ठमाबाई हातवारे करत सांगू लागल्या- ‘‘इथे पाणी ओता, तिथे ओता.’’ तेव्हा कुठे एकीनं विचारलं, ‘‘अगं बाई नव्या बांगड्या वाटतं.’’ ठमाबाईचा चेहरा खुलला. म्हणाल्या, ‘‘हे आधी पाहिलं असतं तर इतका उद्याोगच लागला नसता!’’

आपलंही कधी कधी ठमाबाईंसारखं वागणं होतं का? विशेषत: सोशल मीडियावर! आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट बऱ्याचदा सगळ्यांना कळवलीच पाहिजे असं आपल्याला वाटतं. घरी उपमा केलाय किंवा हॉटेलमध्ये जाऊन पास्ता मागवला आहे. आधी ‘फोटोबा’ मग पोटोबा केला जातो. पुस्तक हातात घेतलं, १० मिनिटंसुद्धा वाचलं नाही, पण तेवढ्यात १० स्टोरीज टाकल्या जातात. ट्रिपला निघालोय, तरी पॅकिंगपासूनच स्टेट्स टाकणं सुरू. एअरपोर्टला पोहोचताच चेक-इन, बोर्डिंग पास, विंडो सीट असे ओळीने फोटो, मग विमानाच्या खिडकीबाहेरचे ढग. हॉटेलमध्ये पोहोचताच बॅग उघडण्याआधी इन्स्टाग्राम उघडलं जातं. रूमटूर ते अख्ख्या ट्रिपमध्ये काय खाल्लं, कुठे गेलो, एक एक मिनिटाचे अपडेट्स सोशल मीडियावर टाकले जातात.

शेअरिंग म्हणजे संवाद. आणि संवादच माणसाला समाजाशी जोडतो. आपले अनुभव, भावना, यश-अपयश, भावभावना हे शेअर करणं ही आपल्या नात्यांची गरज असते. एखाद्या ट्रेकमध्ये टिपलेला सुंदर क्षण, वाचलेलं छान पुस्तक, मिळालेलं यश किंवा सामाजिक उपक्रमातला सहभाग हे सगळं शेअर करावंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा खास भेटून गप्पा मारायला वेळ मिळत नाही, तेव्हा सोशल मीडियावरचे हे छोटे अपडेट्स आपल्या जिवलगांना आपली ख्यालीखुशाली कळवण्याचं काम करतात. पण जेव्हा हे शेअर करणं एका सीमारेषेपलीकडे जातं. प्रत्येक क्षण स्टोरीत पकडणं, आपण जिथे प्रत्येकाला वैयक्तिक ओळखतही नाही अशा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आपलं दु:ख, रडणं, अपयश, अगदी वैयक्तिक भावनाही सविस्तर मांडणं, कधी समोरच्याची आवड, वेळ यांचं भान न ठेवता भारंभार पोस्ट पाठवण्याच्या या सवयी ‘ओव्हरशेअरिंग’ ठरतात. चांगल्या शेअरिंगचा हेतू असतो संवाद; ओव्हरशेअरिंगचा हेतू अनेकदा असतो ‘माझ्याकडे पाहा’ असं सतत सांगणं. फरक सूक्ष्म असला तरी परिणाम मोठा असतो.

समाजशास्त्रज्ञ बेन अॅगर यांनी ‘ओव्हरशेअरिंग : प्रेझेंटेशन्स ऑफ सेल्फ इन द इंटरनेट एज’ या पुस्तकात ही संकल्पना स्पष्ट करताना इंटरनेट, सोशल मीडियामुळे खासगी आणि सार्वजनिक आयुष्याची सीमारेषा पुसट झाली आहे. प्रत्येक जण जणू स्वत:चाच पब्लिक रिलेशन्स मॅनेजर बनून स्वत:चं आयुष्य सतत मांडत असतो. हे करताना जेव्हा वैयक्तिकपणा हरवतो, कुठे काय व किती शेअर करावं याचं भान सुटतं, तेव्हा ते ‘ओव्हरशेअरिंग’ ठरतं, असं म्हटलं आहे.

कळत-नकळत ‘ओव्हरशेअरिंग’ अनेक प्रकारे होतं. एक प्रकार म्हणजे फोटो डम्प. सुट्टी, ट्रिप, बर्थडे किंवा कुठल्याही प्रसंगाचे इन्स्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअॅप स्टेटसवर १५-२० फोटो टाकून मोकळं होणं! काही बहाद्दर तर मोबाइलमधले सगळे फोटो तसेच्या तसे सोशल मीडियावर टाकतात. फोटो डम्प म्हणजे एकच दृश्य, फक्त वेगवेगळ्या कोनातून किंवा तोच चेहरा, वेगवेगळ्या फिल्टर्ससह टाकले जातात. काही जण तर ‘ Because I couldn’t choose’ असं कॅप्शन लावून १०-१२ सारख्याच सेल्फी टाकतात. शिवाय, एखाद्या प्रसंगातलं ‘अथ’पासून इति’पर्यंत प्रत्येक घडामोड फोटोसकट सादर! म्हणजे पाहणाऱ्याला क्षणभर वाटावं, हे ट्रिपला फिरायला गेले होते की डॉक्युमेंट्री शूटिंगसाठी?

काही जण अक्षरश: इन्फॉर्मेशन डम्प करतात! मुद्देसूद नसलेल्या किंवा एकमेकांशी संबंध नसलेल्या भरमसाट गोष्टी शेअर करणं. उदाहरणार्थ, फेसबुकवर ट्रिपबद्दल लिहायचंय पण सुरुवात होते : ‘सकाळी ५.३० ला उठलो. आधी चहा केला. बायकोनं साखर कमी घातली होती. मग सामान भरलं. गाडीत पेट्रोल टाकायला गेलो, तिथे गर्दी होती…’ अशा वीसेक वाक्यांनंतर मुख्य ट्रिप सुरू होते. काही जण व्हॉट्सअॅपवर सतत शुभ सकाळचे सुविचार, नंतर आरोग्य टिप्स, मग राजकीय मेसेज, एखादा जोक, काही तरी धार्मिक, एखादी हृदयस्पर्शी कविता असे मेसेजेसचा रतीबच घालतात. जेव्हा पालक आपल्या मुलांचे प्रत्येक क्षण- पहिलं हसू, पहिला घास ते शाळेचं टाइमटेबल, डेंटिस्ट अपॉइंटमेंटपर्यंत सगळे अपडेट्स सोशल मीडियावर टाकतात तेव्हा याला ‘शेअरेंटिंग’ म्हटलं जातं. सतत शेअरिंग करत केलेलं पॅरेंटिंग! डब्यात आज काय आहे हे शाळेत बबड्याने डबा उघडायच्या आधी सोशल मीडियाला कळलेलं असतं. आईबाबा खरं तर प्रेमातूनच हे सगळं करतात, पण यात केअरिंगपेक्षा शेअरिंगचं प्रमाण जास्त असतं.

राग, संताप, दु:ख किंवा प्रेम अशा आपल्या तीव्र भावना जवळच्या व्यक्तीपुढे व्यक्त करणं यात काहीच गैर नाही. पण जेव्हा याच भावनांचं थेट सोशल मीडियावर प्रदर्शन मांडलं जातं, तेव्हा ते ‘इमोशनल डंपिंग’ ठरतं. ब्रेकअपनंतर दु:खद कोट्स, रडक्या गाण्यांचे रील्स तर प्रेमात असताना ‘वर्ल्ड्स बेस्ट हबी’ लिहून भरभरून रोमँटिक फोटो अपलोड होतात. काही जण तर दिवस कसा गेला याच्या भावनिक उतारचढावानुसार रील्स, कोट्स शोधून व्हॉट्सअॅप स्टोरीला लावतात. आणि मग एक दिवस अचानक डीपी गायब… स्टेट्स म्हणतो, ‘कधी कधी शांत राहणंच योग्य असतं.’ असं स्टेट्स खरं तर ओरडून ओरडून जगाला तुमच्या मनाची अस्वस्थता सांगत असतं.

फेसबुकसारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना आपल्या पोस्टचा ‘प्रेक्षकगट’ कोण आहे, याचा अंदाज न आल्यामुळे होणारा घोळ म्हणजे ‘कॉन्टेक्स्ट कोलॅप्स’. फेसबुकवर कॉलेजच्या मित्रांसाठी टाकलेला विनोदी मीम तुमच्या काकूंनी पाहून त्यावर नमस्काराचा इमोजी टाकला! बॉसने तुमचं मंडे ब्लुचं स्टेटस पाहून मीटिंगमध्ये विचारलं, ‘काय सोमवारी कामाचा मूड नाही का?’ वेगवेगळ्या सामाजिक संदर्भातून पाहिलं गेल्यामुळे साधं शेअरिंगही ओव्हरशेअरिंग ठरतं.

मुलूखभर माहिती शेअर करणं म्हणजेच ओव्हरशेअरिंग असं नाही. अनेकदा कितीपेक्षा काय आणि कुठे शेअर केलं हा कळीचा मुद्दा असतो. मित्राशी खासगीपणे झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट मीम म्हणून पोस्ट करणं, कुणाच्या निकालानंतर त्याच्या मार्कशीटचा फोटो फेसबुकवर शुभेच्छा म्हणून टाकणं, नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर घरातील सदस्यांचे वैद्याकीय अहवाल शेअर करणं. हे सगळं नकळत खासगीपणावर आघात करणं ठरतं. यामागचा हेतू वाईट नसतो, मुद्दा असतो संमतीचा आणि मर्यादेचा.

ओव्हरशेअरिंगचं एक मुख्य कारण म्हणजे डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि सीमारेषांची जाणीव नसणं. अनेकांना सोशल मीडियावर काय, कोणाशी, किती शेअर करावं, काय टाळावं याची स्पष्टता नसते. अनेक जण सहजतेने आपला पत्ता, संपर्क क्रमांक, प्रवासाचं वेळापत्रक, अगदी बँकेच्या व्यवहारांची माहितीसुद्धा नकळत शेअर करतात. आपल्याला मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपल्या कामाबद्दल, एखाद्या उत्पादनाविषयी कोणी वैयक्तिकरीत्या कळवलेला रिव्ह्यू… याचा स्क्रीनशॉट खरं तर जगजाहीर करायची गरज नसते. किमान त्यांचं नाव, नंबर पुसट करून टाकावं, हे ध्यानातही येत नाही. यातल्या धोक्यांची त्यांना कल्पना नसते.

FOMO हे ओव्हरशेअरिंगचं आणखी एक मोठं कारण म्हणता येईल. इतरांचे फोटो, व्हिडीओ, स्टोरीज पाहून आपणही काही तरी टाकलं पाहिजे, असा एक दबाव तयार होतो. माझंही आयुष्य हॅपनिंग आहे, हे दाखवण्याच्या नादात सेल्फी, खरेदी केलेल्या वस्तू, मित्रांबरोबर पार्टी, फिटनेस अपडेट्स, रोजच्या लहानसहान गोष्टी शेअर केल्या जातात. काही वेळेस मात्र मनातली अस्वस्थता ओव्हरशेअरिंगच्या रूपाने व्यक्त होत असते. एकटेपणा, संवादाची कमतरता, नात्यांमधला दुरावा किंवा स्वत:चं अस्तित्व सतत सिद्ध करण्याची गरज अशा भावना कधी कधी नकळतपणे पोस्ट, स्टोरी किंवा कॅप्शनमध्ये उतरतात. काही वेळेस लक्ष वेधून घेण्याच्या तीव्र इच्छेतून ओव्हर शेअरिंग होतं.

सोशल मीडियावर ओव्हरशेअरिंग काहीसं निरुपद्रवी वाटू शकतं, पण याचे काही गंभीर, दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. गोपनीयता आणि सुरक्षितता या दृष्टीने हा मुद्दा विशेष महत्त्वाचा ठरतो. आपल्या पोस्टमधून कळत-नकळत आपला पत्ता, नातेवाईकांची नावं, कॉलेज, ऑफिसची माहिती दिसते. प्रवास करताना पासपोर्ट, बोर्डिंग पासचा फोटो शेअर केल्यास त्यातून जन्मतारीख, पत्ता, पासपोर्ट क्रमांक अशी संवेदनशील माहिती दिसते. अशा माहितीचा वापर आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग, आपली फेक आयडेंटिटी तयार करून इतरांना फसवणे अशा सायबर गुन्ह्यांसाठी होऊ शकतो. याशिवाय, ओव्हरशेअरिंगचे नातेसंबंधांवरदेखील परिणाम होऊ शकतात. भावनेच्या भरात शेअर केली गेलेली एखादी पोस्ट, नातेसंबंधातील जाहीर केलेल्या तक्रारी यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक सोहळा, मित्रांचे गेट टूगेदर, खास कॉफी डेट, आपल्या जिवलगांसोबतचे सगळेच क्षण जर आपण जगजाहीर करत असू तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ शकतो.

मनातल्या भावना सोशल मीडियावर मांडल्यावर त्यावर सुरुवातीला सहवेदना व्यक्त होतात, पण सतत असं होत राहिलं तर नंतर मात्र लोक दुर्लक्ष करतात. भरमसाट फोटो किंवा माहिती देत राहिल्यास पूर्णपणे वाचलं किंवा पाहिलं जात नाही. व्यावसायिक आयुष्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. आपले सहकारी, ग्राहक किंवा व्यावसायिक परिचित हेदेखील आपल्याशी सोशल मीडियावर जोडलेले असू शकतात. आपल्या अति वैयक्तिक किंवा वादग्रस्त पोस्ट्समुळे व्यावसायिक प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो.

ओव्हरशेअरिंग टाळायचं असेल तर काही साध्या पण आवश्यक गोष्टी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम खासगी आणि सार्वजनिक आयुष्याची सीमारेषा आपणच नीट आखून घ्यायला हवी. काहीही पोस्ट करण्याआधी ही माहिती कोण बघणार आहे? हे सगळ्यांसाठी आहे का? यात काही अतिशय वैयक्तिक तर नाही ना? असे प्रश्न स्वत:ला थांबून विचारणं आवश्यक आहे. एखाद्या प्रसंगाचे सगळेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची गरज नसते. त्यातले निवडक क्षण शेअर करणं अधिक परिणामकारक ठरतं. इतरांची माहिती, फोटो, किंवा चॅट शेअर करताना त्यांच्या परवानगीशिवाय काहीही पोस्ट करणं टाळायलाच हवं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर सगळं काही ‘Public’ ठेवण्याची गरज नसते. प्रायव्हसी सेटिंग्ज समजून घेणं आणि वापरणं ही आजची डिजिटल गरज आहे. काही अपडेट्स फक्त जवळच्या मित्रमंडळींसाठी किंवा कुटुंबासाठी असाव्यात, याचं भान महत्त्वाचं. आजच्या डिजिटल जीवनात जसा आपल्यावर माहितीचा भरमसाट मारा होतो आहे, तसंच आपणही नकळत अनेक गोष्टी जगजाहीर करत आहोत. TMI- टु मच इन्फॉर्मेशन. या नाण्याची एक बाजू आहे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, तर दुसरी आहे ओव्हरशेअरिंग. म्हणूनच शेवटी एकच मंत्र उपयोगी ठरतो ‘अति सर्वत्र वर्जयेत।’
viva@expressindia.com