आषाढाचा पहिला दिवस म्हणजे महाकवी कालिदास दिन. वरवर पाहता मेघदूत फक्त प्रेमकाव्य वाटू शकेल, पण खरंतर ही भारतीय मॉन्सूनच्या वाटचालीची कहाणी आहे.
दरवर्षी मे अखेरीचा उकाडा असह्य होतो. जून लागतो. बातमी येते, ‘मॉन्सून केरळला पोहोचला’. मग एक दिवस अचानक आकाश भरून येतं, वारा सुटतो, सरी कोसळतात. भजी, गाणी, भिजणं सुरू होतं. काही दिवस मुसळधारा बरसतात. बळीराजा सुखावतो. हळूहळू कौतुक ओसरतं, वैताग सुरू होतो. नंतर त्याचीही सवय होते. काही महिन्यांनी पाऊस काढता पाय घेतो. मॉन्सून देशाबाहेर गेला, अशी दुर्लक्षित बातमी कुठल्याशा कोपऱ्यात येते. संपला पावसाळा.

खरंतर हा फक्त ऋतू नाही. हे भारतीय मॉन्सूनचं एक व्यापक, गुंतागुंतीचं नैसर्गिक चक्र आहे. जून ते सप्टेंबर या काळात हमखास पडणारा मोसमी पाऊस आपल्या देशासाठी नैसर्गिक वरदान आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ म्हणून आपल्याला त्याचं फार काही अप्रूप नसलं तरी मॉन्सून भाग्यात नसणाऱ्या देशातील प्रवाशांना, संशोधकांना, कलावंतांना मात्र मॉन्सूनने भुरळ घातली आहे. इराणचा विद्वान अल-बेरुनी, मोरोक्कोचा प्रवासी इब्न बत्तूता किंवा इटलीचा भटक्या मार्को पोलो असे अनेक परदेशी आपल्या भारतातील प्रवास वर्णनात मॉन्सूनच्या वार्षिक लयबद्धतेची नोंद आवर्जून घेताना आढळतात.

असाच एक भटक्या ब्रिटिश लेखक होता अलेक्झांडर फ्रेटर. लहानपणापासून तो हौशी हवामान अभ्यासक असणाऱ्या आपल्या वडिलांकडून भारतीय मॉन्सूनची अद्भुत कहाणी ऐकत आला होता. हे पावसाचं चक्र कसं अख्ख्या उपखंडाचं जीवन बदलवून टाकतं, याचं त्याला अमाप कुतूहल होतं. याच उर्मीतून पुढे ट्रॅव्हल रायटर म्हणून काम करत असताना त्याने हा मॉन्सून प्रत्यक्ष अनुभवायचं ठरवलं. भारतातील ट्रॅव्हल एजंट मिस्टर बॅप्टिस्ता यांना भेटून त्याने आपली कल्पना सांगितली. त्यांनी त्याला पावसाचं वर्णन असणाऱ्या एका संस्कृत काव्याचं इंग्रजी भाषांतर ऐकवलं. यातून कदाचित त्याला नेमकी प्रेरणा मिळावी असावी. केरळच्या किनाऱ्यावरून सुरू झालेला त्याचा पावसाचा पाठलाग चक्क चेरापुंजीपर्यंत पोहोचला. या विलक्षण अनुभवातूनच जन्माला आलं, ‘Chasing the Monsoon’ हे त्याचं अजरामर पुस्तक.

मध्ययुगीन प्रवासी ते आजच्या डॉक्युमेंट्री निर्मात्यांपर्यंत अनेकांनी भारतीय मॉन्सूनचं लेख, पुस्तकं, व्हिडीओ डॉक्युमेंट्री, रिसर्च पेपर्स अशा विविध माध्यमांतून दस्तऐवजीकरण केलं आहे. चौथ्या शतकातही असंच एक आगळंवेगळं दस्तऐवजीकरण झालं होतं. विषय होता : मॉन्सूनचा मध्य भारत ते हिमालयापर्यंतचा प्रवास. पण हे केवळ रुक्ष माहितीचं चित्रण नव्हतं. यात भौगोलिक स्थळं, तिथला निसर्ग आणि मानवी जीवनावर पहिल्या पावसाचा होणारा परिणाम हे सगळं अलंकारिक आणि रसपूर्ण शैलीत मांडलं गेलं. हे वर्णन अधिक जिवंत, अर्थवाही वाटावं म्हणून त्याला एका विरहग्रस्त यक्षाची प्रेमकथा जोडली गेली. महाकवी कालिदासाचं ‘मेघदूत’, हेच ते संस्कृत काव्य, ज्यातून प्रेरणा घेऊन फ्रेटर मॉन्सूनच्या मागावर निघाला होता.

मेघदूत हे अवघ्या १२१ श्लोकांचं खंडकाव्य. कोणा यक्षाला कर्तव्यात कसूर केल्यामुळे प्रेयसीपासून वर्षभर दूर राहण्याची शिक्षा मिळते. रामगिरीवर विरहाचे आठ महिने काढल्यानंतर आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला दूर डोंगरावरून पावसाचा ढग दिसतो. हा प्रेमवेडा चक्क त्या ढगालाच आपला निरोप्या बनवतो, त्याला रामगिरी ते अलका नगरीपर्यंतचा मार्ग सांगतो आणि प्रेयसीसाठी निरोप पाठवतो. ही आहे ‘मेघदूत’ची मुख्य कथा.

वरवर पाहता ही फक्त प्रेम आणि विरहाची गोष्ट वाटेलही, पण हे एक निसर्गकाव्य आहे. यात डोंगर-दऱ्या, नद्या, झरे, पानंफुलं, पशुपक्षी, गावं-शहरं यांचं चित्रमय वर्णन आहे, पण त्याहीपलीकडे ही भारतीय मॉन्सूनच्या वाटचालीची कहाणी आहे. हे समजून घ्यायचं तर भारतीय मॉन्सूनचा प्रवास बघणं गरजेचं ठरेल. उन्हाळ्यात भारतातील विस्तीर्ण भूभाग तापतो, यामुळे दक्षिण गोलार्धातील समुद्रावरून दमट वारे भारताकडे वाहू लागतात. जून महिन्याच्या सुमारास हे बाष्पयुक्त वारे भारतात प्रवेश करतात आणि काही काळातच संपूर्ण देश व्यापून टाकतात. मात्र त्यांच्या मार्गात अनेक पर्वतरांगा अडथळा ठरतात. पश्चिम घाट, सातपुडा, विंध्य यांसारख्या रांगा या वाऱ्यांना वर चढायला भाग पाडतात. उंची वाढल्याने तापमान कमी होतं. ढगांतील बाष्पाचं संघटन होऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हेच वारे मग उत्तर भारताच्या विस्तीर्ण मैदानांमध्ये पसरतात आणि अखेर हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचतात. हिमालय ही नैसर्गिक भिंत असल्यामुळे हे वारे पुढे जाऊ शकत नाहीत आणि हिमालयाच्या पायथ्याशी जोरदार पर्जन्यवृष्टी होते.

१ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून. साधारणत: १०-१५ जून दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भात पोहचतो. याच काळात म्हणजेच आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी रामगिरीवर म्हणजे आजच्या नागपूर जवळील रामटेकवर असलेल्या यक्षाला दूर डोंगरावरून पावसाचा पहिला मेघ येताना दिसतो. मग इथपासून कालिदास आपल्याला मॉन्सूनचा प्रवास काव्यातून सांगू लागतात. हा प्रवास हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन पूर्ण होणार आहे हे कालिदासाला ज्ञात आहे. मेघदूतातील यक्ष ढगाला ‘गन्तव्या ते वसति अलका’ असं सांगत त्याचं गंतव्य हिमालय असल्याची आठवण करून देतो. तिथपर्यंत मेघाने कसं जायचं याचंही उत्तर तयार आहे, ‘मन्दं मन्दं नुदति पवन: चानुकूलो यथा त्वां’. हळूहळू वाहणारे हे मोसमी वारेच मेघाला तिथं घेऊन जाणार आहेत. मार्गात येणाऱ्या विविध पर्वतरांगांमुळे मोसमी वारे वर चढतात आणि त्यांना गती मिळते. ‘शिखरिषु पदं न्यस्य’ असं सांगत यक्ष मेघाला दमून गती कमी झाल्यावर पर्वतांवर टेकत टेकत जायला सांगतो.

हिमालयापर्यंतच्या प्रवासाचा तपशीलवार मार्ग पुढील काही श्लोकात दिसतो. रामगिरीवरून निघालेला मेघ प्रथम आम्रकूट, म्हणजे अमरकंटक पार करतो. तिथून तो विंध्य पर्वतरांगांवरून चढत नर्मदेच्या पात्रात उतरतो. पुढे तो विदिशा नगरीत जातो, वेत्रवती म्हणजे बेतवा नदी ओलांडतो आणि उज्जयिनीला येतो, जिथे तो क्षिप्रा नदी पार करतो. पुढे मेघ चंबळ नदीच्या खोऱ्यातून प्रवास करत कुरुक्षेत्र गाठतो. मग हरिद्वारमार्गे हिमालयाच्या दिशेने रवाना होतो आणि अखेर कैलास पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या अलका नगरीत पोहोचतो, हा भारतीय मॉन्सूनचा मार्ग आहे.

या प्रत्येक ठिकाणी पहिला पाऊस आल्यावर निसर्गात होणारे सूक्ष्म बदल मेघदूतमध्ये कालिदासाने अलवार टिपले आहेत. आम्रकूट पर्वतावर झाडंच्या झाडं आंब्याने लगडली आहेत. नर्मदेच्या काठावर जांभळाची वनं बहरली आहेत. कुठे हिरवट पिवळी कदंबाची फुलं डवरली आहेत. पाणथळी जवळ, पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने रानकर्दळीला नाजूक कळ्या फुटल्या आहेत. मृदुगंधाच्या ओढीने हत्ती जमिनीकडे सोंड नेऊन ती हुंगत आहेत. कुठे ककुभ म्हणजे आईनाचे जंगल बहरलं आहे, तर कुठे उंबराचा घमघमाट आसमंतात दरवळतो आहे. आणि हिमालयाच्या पायथ्याशी? तिथे देवदाराच्या फांद्यांना घासून पेटलेला वणवा पावसाच्या शिडकाव्याने हळूहळू शांत होत जातो.

पावसाच्या आगमनाबरोबर निसर्गात केवळ झाडं-फुलं नव्हे, तर पक्ष्यांच्याही वागण्यात लक्षणीय बदल होतो. पाईड क्रेस्टेड कुकू म्हणजेच चातक पक्षी, र्नैऋत्य मोसमी पावसासोबत आफ्रिकेतून भारतात स्थलांतरित होतो. हा काळ बगळ्यांच्या विणीच्या हंगामाचा असतो. कावळे घरटी बांधण्यात व्यग्र असतात, तर मोर केकारव करत नृत्य प्रदर्शन करतात. या साऱ्या दृश्यांची झलक मेघदूतमध्ये आहे. याचबरोबर शेतात काम करणाऱ्या कष्टकरी स्त्रिया वा उज्जैनीच्या नगरातली सुंदर रमणी, पहिल्या पावसाचे मानवी मनावर उमटणारे तरंगही मेघदूतात नाजूकतेने टिपले आहेत. थोडक्यात, पावसाच्या आगमनाबरोबर भारतातील विविध भागात बहरणारा निसर्ग, फुलणारी सृष्टी, आणि याचे मानवी मनावर उमटणारे प्रतिबिंब यांचं काव्यात्मक रूप म्हणजे मेघदूत. भारतीय मॉन्सूनचं याहून सुंदर आणि सजीव दस्तऐवजीकरण अजून काय असणार?

मेघदूत वाचताना असं सतत जाणवत राहतं की, ही केवळ कल्पनेची गुंफण नाही. यामागे सकस अनुभवाची जोड आहे. पण मग प्रश्न पडतो, या प्रत्येक ठिकाणी पहिला पाऊस पडताना काय घडतं, हे कालिदासाला एवढं नेमकं कसं ठाऊक? कदाचित कालिदास दरवर्षी या मार्गावरच्या एकेका ठिकाणी गेला असेल. तिथं पहिल्या सरींचा स्पर्श त्याने अनुभवला असेल. तिथल्या फुलांचे गंध श्वासात भरून घेतले असतील. प्राणी-पक्ष्यांचं गुज, ढगांचा गडगडाट, कानात साठवून ठेवले असतील.

राजकन्या प्रभावती गुप्ताच्या मदतीसाठी विदर्भात आलेल्या कालिदासाला इथल्या असह्य ग्रीष्मदाहाने व्याकुळ केलं असणार. रामटेकच्या टेकडीवर एकटा बसला असताना आकाशात अचानक ढग दाटून आले असतील. थंड वाऱ्याची एक झुळूक त्याला स्पर्शून गेली असेल. टपटप पडणाऱ्या पावसाच्या सरी मंदाक्रांत वृत्त होऊन कानात रुंजी घालत असतील. आजवर अनुभवलेले पहिल्या पावसाचे सारे क्षण, सारे रंग, सारे गंध त्या क्षणी एकत्र उफाळून आले असतील. आणि मग, त्याच्या ओठांवर सहज शब्द उमटले असतील —

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं,

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com