केदारनाथ, बद्रीनाथ परिसरात आलेल्या महापुराच्या तडाख्यात अडकलेल्या भाविकांपैकी जिल्ह्य़ातील सोळा भाविक सुखरूप परतले, अन्य ५६ परतीच्या वाटेवर आहेत. मात्र, ११ जणांचा अजूनही संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
बीड जिल्ह्य़ातून चारधाम यात्रेसाठी ८३ भाविक गेल्याची नोंद प्रशासनाकडे झाली. १६ जून रोजी झालेल्या महाप्रलयात मोठय़ा संख्येने भाविक अडकले. जिल्ह्य़ातून गेलेल्यांपैकी ५६ जणांशी संपर्क होऊ शकला. हे भाविक लष्कराच्या कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. यातील सोळाजण परतले असून, अजूनही परळी येथील लाहोटी व झंवर कुटुंबांतील ११ जणांचा संपर्क झाला नाही. या कुटुंबातील राजेश झंवर सोमवारी औरगाबाद येथे पोहोचले. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण पुरात वाहून गेल्याने बेपत्ता झाले. त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागला नाही. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे माजलगाव, शिरूर, अंबाजोगाई भागातील यात्रेकरू सुखरूप परतल्याची माहिती आहे. उर्वरित यात्रेकरूंच्या नातेवाईकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.