लातूर जिल्हय़ात २०५ गावे टंचाईग्रस्त असून आतापर्यंत ५४ विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. देवणी, औसा व लातूर तालुक्यांत टँकरची संख्या ११वर पोहोचली असून उदगीर, जळकोट, लातूर तालुक्यांतील प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी सांगितले.
बनसोडे यांच्या दालनात झालेल्या या पत्रकार परिषदेस कार्यकारी अभियंता एस. एस. चारथळ उपस्थित होते. जिल्हय़ात १९१ गावे व १४ वाडय़ा असे एकूण २०५ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. ३३५ अधिग्रहणाची मागणी सरकारकडे केली आहे. पैकी १५० प्रस्ताव सादर केले आहेत. १८७ शिफारशी झाल्या आहेत. ९२ गावांमधील १२२ अधिग्रहण मान्य झाले आहे. उर्वरित ५२ गावांचे या आठवडय़ात सर्वेक्षण होणार आहे.
 एक महिना टँकरसाठी जवळपास ६० ते ७० हजार खर्च लागतो. टँकरचा खर्च वाचवण्यास वर्षभरात ५४ विंधन विहिरी घेतल्या. पैकी एक विंधन विहीर कोरडी गेली. उर्वरित ५३ विंधन विहिरींना चांगले पाणी लागले. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१२ या कालावधीत जवळपास ३६ विंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. दि. १ जानेवारी ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत १ हजार ३७४ उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने ४१८ पूरक आराखडा तयार केला. ३ हजार ४६४ प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. सर्व योजनांसाठी जवळपास २० कोटी खर्च अपेक्षित आहे.