अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या नऊ जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाटय़ाला चार जागा आल्या असल्या तरी समितीवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसला चार, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन, तर भाजपला एक जागा मिळाली. महापालिकेतून सात आणि जिल्हा परिषदेतून चौदा जागांवर उमेदवार याआधीच अविरोध निवडले गेले आहेत. दोन जागा रिक्त आहेत.जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषदेतून निवडल्या जाणाऱ्या पाच जागांसाठी, तसेच नगर परिषदेतून निवडल्या जाणाऱ्या चार, अशा नऊ जागांसाठी सोमवारी निवडणूक झाली होती. आज मतमोजणी पार पडली. जिल्हा परिषदेच्या इतर मागासवर्गीय पुरुषांच्या ३ जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यात बसपचे अभिजित ढेपे, रवींद्र मुंदे, काँग्रेसचे उमेश केने निवडून आले. भाजपचे सदाशिव खडके यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. या निवडणुकीत अपक्ष सतीश हाडोळे यांचा पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती महिला मतदार संघातील दोन जागांसाठी तीन उमेदवार लढतीत होत्या. या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवार परस्परांविरोधात रिंगणात आल्याने चुरस निर्माण झाली होती. या लढतीत काँग्रेसच्या श्वेता वंजारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा गवई या विजयी झाल्या. काँग्रेसच्या सरिता मकेश्वर यांना मात्र पराभव पत्करावा लागला.नगर परिषदेतून निवडल्या जाणाऱ्या चार जागांसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक चुरशीची झाली. सर्वसाधारण मतदार संघातून भाजपचे रूपेश ढेपे निवडून आले. अनुसूचित जाती मतदार संघातून काँग्रेसचे बंडू आठवले, सर्वसाधारण स्त्री मतदार संघातून काँग्रेसच्या रेश्मा उमाळे आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा बर्वे यांना विजय मिळाला. अमरावती महापालिकेतून निवडून जाणाऱ्या सात जागांची निवडणूक याआधीच अविरोध झाली होती. महापालिकेतर्फे काँग्रेसच्या संगीता वाघ, भारत चव्हाण, राष्ट्रवादीचे हमीद शद्दा, जयश्री मोरे, जनविकास काँग्रेसच्या डॉ. सुजाता झाडे, भाजपचे संजय अग्रवाल आणि शिवसेनेचे डॉ. राजेंद्र तायडे प्रतिनिधित्व करणार आहेत.जिल्हा परिषदेतही काही मतदार संघांमध्ये चौदा सदस्यांची विनविरोध निवड झाली. त्यात काँग्रेसचे गिरीश कराळे, मोहन सिंघवी, महेंद्र गैलवार, चित्रा डहाणे, संगीता सवई, विनोद डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बापुराव गायकवाड, शिवसेनेच्या ममता भांबूरकर, भाजपचे मनोहर सुने, प्रहारचे प्रवीण मुंधडा यांचा समावेश आहे. दोन जागांसाठी एकही नामांकन न आल्याने या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, बसप, प्रहार आणि अपक्ष या आघाडीची सत्ता आहे. या आघाडीला छेद देण्यासाठी काँग्रेसने व्यूव्हरचना आखली. या निवडणुकीच्या निमित्ताने जास्त जागा पदरात पाडून घेण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी ठरला. एकूण ३२ जागांपैकी जिल्हा परिषदेचे २१, महापालिकेचे ७, तर नगर परिषदेचे ४ सदस्य नियोजन समितीवर निवडले गेले आहेत.