समतावादी सांस्कृतिक चळवळीचे पाचवे समतावादी साहित्य संमेलन येत्या २ व ३ फेब्रुवारी रोजी निपाणी (जि. बेळगाव) येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी दिली.
आमदार काकासाहेब पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनात समतावादी साहित्य-वास्तव आणि अपेक्षा, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सामाजिक-सांस्कृतिक संघर्ष, स्त्रीशोषणाचे बदलते संदर्भ, जनआंदोलने : प्रक्षोभासाठी, प्रसिद्धीसाठी की परिवर्तनासाठी? अशा चार परिसंवादासह कथाकथन, कविसंमेलन होणार आहे. त्यात डॉ. राजन गवस, गोविंदराव पानसरे, डॉ. अच्युत माने, प्रा. विश्वनाथ गायकवाड, अनंत दीक्षित, विजय चोरमारे, चंद्रकांत वानखेडे, अ‍ॅड. मंगला पाटील, प्रा. विजया चव्हाण, डॉ. आशा मुंढे आदी मान्यवर लेखक, विचारवंत, कवी सहभागी होणार आहेत. भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन निखळ समतावादी विचार आणि साहित्याची चर्चा संमेलनात होणार आहे, तरी समतावादी लेखक, विचारवंत, साहित्यिक, रसिक यांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.