कुर्ला ते परळ दरम्यान मध्य रेल्वेचा पाचवा आणि सहावा मार्ग तीन वर्षांंत पूर्ण होण्याची शक्यता शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांमध्ये या प्रकल्पाचा अंतर्भाव असून त्यासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
 छत्रपती शिवाजी टर्मिनस ते परळ या मार्गावरही पाचवा-सहावा मार्ग टाकण्यात येणार असला तरी कुर्ला ते परळ या टप्प्यातील मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. या टप्प्यातील मार्गासाठी जमीन उपलब्ध असून परळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान जमीन उपलब्ध नसल्याने ती खासगी व्यक्ती अथवा संस्थांकडून अथवा सरकारकडून हस्तांतरित करावी लागणार आहे.
सध्या कुर्ला ते ठाणे दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग सुरू झाला असून ठाणे ते कल्याण दरम्यानच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण होताच कुर्ला ते परळ दरम्यानच्या प्रकल्पाला सुरूवात होणार असून पुढील तीन वर्षांंत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर परळ ते कल्याणदरम्यान स्वतंत्र पाचवा ते सहावा मार्ग सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.