लातूर तालुक्यातील भोयरा गावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी समाजकंटकांनी पेटवून दिल्या. महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने या जळीतग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
शेतरस्त्याच्या वादाचे पर्यवसान धनगर समाजाच्या सोयाबीनच्या गंजी पेटवून देण्यात झाले. या घटनेत १४जणांचे १६ लाख ४५ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने जाहीर केले. घटनास्थळी अनेक मंडळींनी भेटी दिल्या. मात्र, कोणीही आíथक मदत केली नाही. प्रशासनाकडून सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल, त्यानंतर प्रत्यक्ष मदत कधी मिळेल ते सांगता येत नाही. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना भेटावयास जातानाच आíथक मदत करायची, असा निर्णय घेतला. पक्षाचे प्रमुख अॅड. अण्णाराव पाटील, श्रीरंग शेवाळे, बसवंतअप्पा उबाळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोले यांच्या उपस्थितीत सर्व जळीतग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. आमच्या क्षमतेप्रमाणे लोकांना आíथक मदत करीत आहोत. सरकारदरबारी मदत मिळवून देण्यास आपण प्रयत्न करणार असल्याचे अण्णाराव पाटील यांनी या वेळी सांगितले.
जळीतग्रस्तांनी या मदतीबद्दल अॅड. अण्णाराव पाटील व सहकाऱ्यांचे आभार मानले.