मुंबईतील सर्व उत्तुंग इमारतींनी आपल्याकडील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करून तसा अहवाला अग्निशमन दलाकडे सादर करावा. दर सहा महिन्यांनंतर असा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र सादर केलेला अहवाल योग्य आहे किंवा नाही, हे संबंधित इमारतीला लागलेल्या आगीनंतरच स्पष्ट होत आहे. अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे या प्रत्येक अहवालाची जातीने तपासणी करण्याची असमर्थता मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी वर्तविली आहे.मुंबईत सध्या सध्या ६० मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या दोन इमारतींचे काम सुरू आहे. या इमारतींमध्ये स्वत:ची अग्निशमन यंत्रणा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे या इमारतींना आग लागली तरी तेवढय़ा मजल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाची सज्जताच नसल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत ४०० हून अधिक उत्तुंग इमारती असून या इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा योग्य असल्याचे त्यांनी सादर केलेल्या अहवालावरून आम्ही मान्य करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक इमारतीने वर्षांतून जानेवारी आणि जुलै या महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शहर आणि उपनगरात अग्निशमन प्रतिबंधात्मक यंत्रणेची तपासणी करणारे असे १८० परवानाधारक अधिकारी आहेत. आमच्याकडे इमारतींकडून जी प्रमाणपत्रे सादर केली जातात, त्याची नोंद आम्ही ठेवतो. तसेच आमचे अधिकारीही वेळोवेळी अचानकपणे अशा इमारतींना भेट देऊन तेथील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेची पाहणी करत असतात. इमारतींच्या अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेत काही त्रुटी आढळून आल्या तर त्यांना त्याबाबत सांगितले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पिण्याच्या पाण्याचा पंप बिघडला तर त्याची तातडीने दुरुस्ती केली जाते, पण अग्निशमन प्रतिबंधात्मक यंत्रणेत काही बिघाड झाला तर त्याकडे पुरेशा गंभीरपणे पाहिले जात नसल्याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
अलीकडेच कफ परेड येथील ‘जॉली मेकर्स’या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या निमित्ताने मुंबईतील गगनचुंबी इमारतींची अग्निप्रतिबंधक सुरक्षा आणि उपाययोजना हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अग्निशमन दलाकडे २० ते २५ मजल्यांपर्यंतच पोहोचणारी अग्निप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध असताना शहर आणि उपनगरात मात्र ७० मीटरहून अधिक उंची असलेल्या (३० मजल्यापर्यंत) ७८ इमारतींच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात येते.     
* मुंबईत शहर आणि उपनगरात १५० मीटर्सपेक्षा जास्त उंचीच्या (६० मजली ) इमारतींचे बांधकाम सुरू
* ८० ते १५० मीटर उंचीच्या (३५ ते ६० मजली) ८० इमारती
* ७० ते ८० मीटर उंचीच्या (३० मजली) ३०० इमारती
* अग्निशमन दलाकडे २० ते २५ मजल्यांपर्यंत पोहोचू शकेल, अशी स्नॉर्केल यंत्रणा
*  अलीकडेच ३० मजल्यापर्यंतच्या ७८ इमारतींच्या बांधकामाला मंजुरी
* अग्निसुरक्षा प्रतिबंधक उपाययोजनेच्या देखरेखीसाठी अवघे ७६ कर्मचारी!
* उंच इमारतींकडून अग्निसुरक्षा प्रतिबंधक उपायांचा अहवाल सादर नाही

‘फायर ऑडिट’ करण्यात
सोसायटय़ांची चालढकल
मुंबईतील बऱ्याच सोसायटय़ांनी वर्षांनुवर्षे फायर ऑडिट केलेले नाही. अग्निशमनदलाने अशा १००० पेक्षा जास्त सोसायटय़ांना नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद थंडच आहे.
मुंबईतील सुमारे १८० अधिकृत संस्थांची ‘फायर ऑडिट’साठी नोंदणी करण्यात आली आहे. पण बऱ्याच सोसायटय़ांनी गेल्या कित्येक वर्षांपासून फायर ऑडिट केलेलेच नाही. दुसरीकडे शहरात वर्षांला लहान मोठय़ा सुमारे चार हजार ठिकाणी आगी लागतात. बऱ्याच आगी शॉट सर्किटमुळे लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अग्निशमन दलाची सध्याची परस्थिती, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्याकडील अत्याधुनिक यंत्रणा आदी बाबींचे एक सादरीकरण नुकतेच महापालिकेमध्ये करण्यात आले. नागरिक अग्निसुरक्षेबाबत पुरेसे गंभीर नसल्याची खंत या वेळी ज्येष्ठ अग्निशमन अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.