गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सपशेल खोटे बोलतात. चुकीची आकडेवारी सांगतात, असा आरोप करतानाच गुजरातपेक्षा आज व पूर्वीही महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक व उद्योगांची वाढ कायम आहे. विकासदरातही महाराष्ट्रच आघाडीवर आहे, असे मत सिंग यांनी व्यक्त केले. गुजरातेत २००३ मध्ये सत्तेवर आल्यास २४ तास वीज देण्याचे आश्वासन मोदींनी गुजरातच्या जनतेला दिले होते. परंतु सत्ता हाती आल्यावर ते पाळले नाही. गुजरातचा शैक्षणिक विकास पिछाडीवर आहे. मानवसंसाधन निर्मितीतही गुजरात अकराव्या स्थानावर आहे. केवळ भाषणबाजी करणारे मोदी सतत खोटे बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिग्विजयसिंह गुरुवारी तुळजापूरला तुळजाभवानी दर्शनासाठी आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले. केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग सरकारने सर्व राज्यांना विकासनिधीत २८ वरून ३३ टक्के वाढ केली. त्यामुळे विकासाची गती वाढण्यास मदत होणार आहे, असे सांगून सिंह यांनी मोदी यांनी गुजरातवरून सुरू केलेले विकासाचे वादळ निव्वळ घोषणाबाजी आहे. गुजरातच्या विकासाची आकडेवारी खोटी असल्याचा आरोप केला. मोदी यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपण बोलत नाही. परंतु जातीच्या राजकारणासाठी मोदी जे बोलतात त्याला माझा आक्षेप आहे. मोदींसोबत माझी वैचारिक लढाई आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
दिग्विजयसिंह म्हणाले की, आपण दरवर्षी तुळजाभवानी व पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनास येतो. आपण िहदूविरोधी नाही. मानवाच्या कल्याणात धर्म आहे. मी मुस्लिम व ख्रिश्चन यांचा द्रष्टा व िहदूविरोधी असा प्रचार होत असला, तरी आपण निधर्मी आहोत. सर्व धर्माना समान पातळीवर पाहताना िहदूंचा मुस्लिमांवर व मुस्लिमांचा िहदूंवर विश्वास निर्माण व्हायला हवा. धर्मापेक्षाही गरीब, सहिष्णुता व विकास यांना प्राधान्य देणारे राजकारण काँग्रेस करीत आल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची कामगिरी व सरकारची पाठराखण करताना सिंह यांनी सामान्य माणसाला मागील ९ वर्षांत अनेक उत्तम अधिकार या सरकारने दिले. खासदार व आमदारांना जसा माहिती घेण्याचा अधिकार आहे, तसा अधिकार वेगवेगळे कायदे करून सामान्य जनतेलाही दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला निश्चितच लाभ होणार असल्याचा विश्वासही दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केला.
मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार व्ही. एल. कोळी यांनी त्यांचा सत्कार केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जि. प. सदस्य अॅड. धीरज पाटील, पं. स. सभापती मनीषा पाटील, उपसभापती प्रकाश चव्हाण, सद्गुरू ट्रस्टचे कैलास चिनगुंडे, सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, आर. आर. पाटील विचारमंचचे अध्यक्ष कुमार नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.