माहितीच्या अधिकाराचा वापर अधिकाऱ्यांचा बदला घेणे, त्याला खिजवणे, डिवचणे अशा कारणांसाठी करू नये, तसे केल्यास सामाजिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांना ते त्रासदायक तर ठरतेच, शिवाय त्यातून दुरूपयोग होत असल्याचे लक्षात येऊन कायद्याबाबत नाराजी निर्माण होते, असे प्रतिपादन माहिती अधिकार तज्ञ नयनेश डोळस यांनी केले.
नगर व्यासपीठ व नागरिक मंच यांच्या वतीने शहर सहकारी बँकेच्या सभागृहात डोळस यांच्या माहिती अधिकार कायदा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अनिल राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, शशिकांत चंगेडे, डॉ. अरविंद गुगळे, अशोक सब्बन, सुशील शाह आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेला उपस्थित नागरिकांनी यावेळी डोळस यांना अनेक प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. विविध कार्यालयांशी कशाप्रकारे संपर्क साधायचा, कायद्यातील कलमे काय आहेत, त्याचा वापर कसा करायचा याची माहिती डोळस यांनी दिली. आमदार राठोड, बारकुंड, गुंदेचा यांची यावेळी भाषणे झाली. सुधीर मेहता यांनी प्रास्ताविक केले. महेश देशपांडे यांनी स्वागत केले.